त्यानंतर काल बीबीसीवर मी पाकिस्तानच्या पुरांची बातमी पाहत होतो. एक बाई गुडघाभर पाण्यातून चालत होती. कॅमेरा पहिल्यांदा मागून चालत होता. मग कॅमेरा पुढे गेला. तिच्या हातांमध्ये तिचं दोनेक वर्षांचं बाळ होतं. त्याच्या इवल्याश्या हाताला सलाईन लावलेलं होतं आणि त्या सलाईनची पिशवी त्या माऊलीनं हातात धरली होती. ती अथक रडत होती. बोलतानाही रडत होती. तिच्या बाळाला डायरिया झाला होता. तिला काही डॉक्टरांनी औषधं दिली होती आणि सलाईन दिलं होतं. पण पुढच्या इलाजासाठी हॉस्पिटललाच जावं लागेल असंही सांगितलं होतं. आता ती एकटीच हॉस्पिटल शोधत निघाली होती. बीबीसीवाल्यांनी तिची मदत केली की नाही, ते ठाऊक नाही, पण माझ्यासाठी ती पाकिस्तानी आहे हे सत्य क्षणभरासाठी बाजूला पडल्यागत वाटलं. त्या आईचा आपल्या मुलासाठी चाललेला जिवाचा आटापिटा पाहून क्षणभर काळीज हललं. पण मग बातमी बदलली.
मग दिवसभर बरंच काही केलं, वाचलं. पण विचार बदलत नव्हते. आई दोन आठवड्यापूर्वी १० दिवसांसाठी माझ्या एका मामेबहिणीकडे जाऊन आली. बाबा सांगत होते आईचं माहेरपण व्यवस्थित झालं तिथे. आईला खरंच छान आराम मिळाला. मग मी पुन्हा विचारात पडलो, की खरंच घरी आई किती राबत असते. मी सुट्टीवर गेलो की तर तिच्या लगबगीला उधाण येतं. तुला हे करून घालायचंय, तुला ते करून घालायचंय. मग जायच्या दिवशी तिला अचानक एखादी गोष्ट आठवते, जी राहून गेली. मग चुटपुटत बसते. दिवसभर काम करत राहते, पण तिला मदत नाही केली तर चालतं, फक्त , "आई किती दमलीस गं!" एव्हढं बोललेलंही पुरतं. पण आपण ते ही किती वेळा बोलतो. लहानपणापासून आजपर्यंतची एक क्विक रिकॅप आत्ता माझ्या डोळ्यासमोर येतेय. आनंदाचे क्षण, यशाचे क्षण, दुःखाचे क्षण, अपयशाचे क्षण; पण प्रत्येक वेळी आईच्या डोळ्यांत अश्रूच दिसताहेत मला. की मलाच धूसर दिसतंय सगळं!
आई नेहमी सांगते, लहान असताना, म्हणजे अगदी ४-५ वर्षांचा असताना तिनं मला एक गोष्ट सांगितली होती.
एक मुलगा त्याच्या आईचा फार लाडका असतो. तो मोठा होतो आणि लग्न करतो. पण त्याची बायको वाईट असते. एक दिवस ती त्याला त्याच्या आईचं काळीज घेऊन यायला सांगते. तो बर्याच विचारांती जातो आणि आईचं काळीज घेऊन परतीला निघतो. रस्त्यात त्याला ठेच लागून तो पडतो. तर आईच्या काळजातून आवाज येतो, "बाळा, लागलं तर नाही ना तुला?"
आई सांगते, त्या काहीच न कळण्याच्या वयात मी हमसून हमसून रडलो होतो. बराच वेळ रडत होतो. पण आता मोठा झालो ना. आता कळतं, की गोष्ट सिंबॉलिक आहे. त्यावेळेस निरागस असेन, आई हेच विश्व असतं त्या वयामध्ये. 'स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी' ह्या ओळींचे अर्थ तेव्हा जसे कळतात, तसे जग कळायला लागल्यावर कळेनासे होतात. मग आई मोठ्या विश्वाचा एक भाग बनून जाते. पण मग काही काही घटना दिसतात आणि पुन्हा जाणीव होत रहाते, की आपल्यासाठी आता आई मोठ्या विश्वाचा एक भाग असेल पण आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व असतं, कायमसाठी!
आणि आपण आईला किती गृहित धरतो!
(ही पोस्ट माझ्या आईसाठी आहेच, पण सगळ्याच आईंसाठी आहे, आणि माझ्या सगळ्याच तायांसाठी ज्या आईसुद्धा आहेत. खासकरून माऊताई जिच्यामुळे मी विचारात पडलो.)