Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

2/26/2010

रितीच घागर नशिबी माझ्या..!

माझ्या नटरंग पुराणामुळे आता माझे मित्र, माझे घरचे सगळेच पकले आहेत, पण नटरंग बद्दल ऐकून, वाचून, पाहून आणि त्यातली गाणी ऐकून मी मात्र अजूनही पकलो नाही आहे. आणि कधी पकेनसं वाटत नाही. (अर्थात मतभेद असु शकतात).गाण्यांचा तर रतीब घालतोय मी स्वतःला. जवळपास सगळीच तोंडपाठ झाली आहेत. असो, मुद्दा तो नाही. प्रत्येक गाण्याचे श्रेय जितके अजय-अतुल चे आहे, तितकेच गुरु ठाकूर चे आहे. नुसतीच सुंदर शब्दरचना नाही तर, पात्राची मनस्थिती, काळ ह्या सगळ्याचं अप्रतिम मिश्रण जवळपास प्रत्येक गाण्यात आहे. मी प्रत्येक गाण्याबद्दल वेगळी नोंद लिहू शकतो, पण ते नंतर, आत्ता ज्या गाण्याबद्दल लिहिण्यासाठी कित्येक दिवसांपासून ठरवतोय, त्या गाण्याबद्दल.
'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' हे गाणं म्हणजे एक गवळण आहे. हे गाणं चित्रपटामध्ये गुणा कागलकरच्या पहिल्या तमाशातील आहे. गुणा शेतातील विहिरीचे पाणी काढून द्यायचे काम करतो. पण शेतांमध्ये विहिरीवर मोटर बसवल्याने गुणाला दुसर रोजगार शोधणे भाग पडते. आणि तो आपल्या कलेचा उपयोग करायचं ठरवतो.  पण परिस्थितीमुळे त्याला नाच्या बनावं लागतं. आता पहिलवान गुणा नाच्या बनलाय आणि आपल्या गावातल्यांसमोर, स्वतःच्या बायको-मुलासमोर आपला तमाशाचा धंदा सुरु करतोय - नाच्याच्या रूपात. अशा वेळी त्याच्या गवळणीतल्या ओळी असतात.
"नकोस फोडू कान्हा माझी, घागर आज रिकामी। हसेल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी॥
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे। रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले॥"
ह्या ओळींमधून तो देवाकडे लाज राखण्याचं आवाहन करतो. एक म्हणजे धंद्याची लाज आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाची(तो नाच्या बनल्यामुळे). अर्थात, हे सगळं सूज्ञ वाचकांना ठाउकच असेल, पण मला केव्हाचं डाचतंय आणि आज दोनदा गाणं ऐकल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही.
पुन्हा गुरू ठाकूर पाणी भरणार्‍या गुणा कागलकरच्या तोंडी रिकाम्या घागरीचं उदाहरण देतात, तेव्हा आपोआप दाद जाते. वाह!

2/23/2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी

कित्येक दिवसांपासून पहायचाय पहायचाय म्हणता म्हणता शेवटी रविवारी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला. गेल्या काही आठवड्यांमध्ये एकामागे एक असे उत्तम मराठी सिनेमे पाहिलेत. त्यामुळे 'हरिश्चंद्राची..' कडून अपे़क्षा फारच वाढल्या होत्या, पुन्हा ऑस्करवारीला जाऊन आल्यामुळे असलेल्या अपेक्षा वेगळ्याच. आणि 'हरिश्चंद्र' आपल्याबद्दलच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो.

भारतातील पहिलं चलतचित्र बनवणार्‍या एका कलंदर पण दूरदर्शी माणसाची झपाटलेली गोष्ट अतिशय हलक्याफुलक्या आणि नीट पाहिलं तर तितक्याच जबाबदारीने सांगण्यात दिग्दर्शक परेश मोकाशी शंभर टक्के यशस्वी होतात.

सिनेमा पाहणार्‍या विविध वयोगटातील, विविध आवड असणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला आपलंसं करेल अशी सिनेमाची हलकीफुलकी तरीही ह्रदयस्पर्शी मांडणी आहे. पण तरीही काही समीक्षकांच्या मते सिनेमा हलकाफुलका होण्याचा नादात फाळकेंच्या लढाईचं गांभीर्य थोड्या प्रमाणात नष्ट झाल्यासारखं वाटतं. पण मला मात्र ते मान्य नाही. कारण माझ्या मते सिनेमा हलकाफुलका आहे तो केवळ मोकाशींनी तसा बनवलाय म्हणून नव्हे तर फाळकेंचं व्यक्तिमत्वच तसं प्रतीत होतं. अगदी डबघाईची स्थिती असतानाही केवळ ज्याच्याशी भांडण केलं त्या जुन्या भागीदाराला दिलेल्या वचनापायी स्वतःची पूर्ण क्षमता असूनही नव्यानं धंदा करण्यास नकार देणार्‍या ह्या जगावेगळ्या माणसाचं आयुष्य असंच दिलखुलास असायचं. आणि आयुष्यातले अतिशय ताणाचे प्रसंगही मोकळेढाकळे होतात ते त्यांच्या विलक्षण प्रतिभाशाली पत्नीच्या पाठिंब्यामुळे. जर त्यांची पत्नी त्यांच्या प्रत्येक निर्णयात केवळ मूकपणानेच नाही तर सक्रिय सहभागी होत नसती तर कदाचित फाळकेंची कथासुद्धा तणावपूर्ण आणि दुःखाची किनार असलेली झाली असती. पण ती तशी न होता केवळ संघर्षपूर्ण आणि अर्थपूर्ण होते. मोकाशींनी त्यांच्या पत्नीचं पात्रही अतिशय ताकदीचं लिहिलं आहे. आणि जितक्या ताकदीने नंदु माधव फाळकेंची व्यक्तिरेखा उभी करतात, तितकीच तोलामोलाची साथ त्यांना विभावरी देशपांडे त्यांना त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत देतात.

केवळ दीड तासांच्या ह्या सिनेमात फाळकेंच्या बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची फार जवळची ओळख मोकाशी आपल्याला करून देतात. प्रत्येक प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेऊन जातो आणि त्या विश्वाचं दर्शन त्यांच्या नजरेने करून देतो. त्यांची निरागसता, असामान्य प्रतिभा, बेधडक स्वभाव आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर त्यासाठी झोकून देण्याची वॄत्ती नंदु माधव अतिशय समरसून दर्शवतात. त्या काळात असलेला वैज्ञानिक दॄष्टिकोन, स्त्री पुरुष समानतेची समज त्यांचं सुसंस्कॄत व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सारे पैलू अतिशय मोजक्या प्रसंगातूनही ठळक सामोरे येतात.

त्यांचं मुळातलंच मिष्किल असणं आणि कठीण प्रसंगातही शांत राहणं सिनेमालाही तसंच असायला भाग पाडतं. त्याकाळात लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळत असतानाही कायम वेगळी वाट चोखाळणारा हा माणूस जेव्हा भारतात हा व्यवसाय वाढावा म्हणून ती संधी नम्रपणे धुडकावतो, तेव्हा त्यांच्यातल्या सच्च्या देशभक्ताची चुणूक दिसते. त्यांची देशभक्ती व्यक्त करायची पद्धत फक्त वेगळी होती.

मी लिहिलंय त्याहून खूप जास्त अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा. जितक्या निरागसपणाने हा चित्रपट व्यक्त होतो, तितकाच प्रगल्भ आणि अर्थपूर्णही आहे; फक्त ते जाणवण्यासाठी ती दॄष्टी हवी.

2/07/2010

नटरंग

अप्रतिम. एवढा एकच शब्द माझ्या मनात आला, जेव्हा मी नटरंग बघितला.(अर्थात कुणाचे ह्याबाबतीत माझ्याशी मतभेद असू शकतात.) खरं म्हणजे काही गोष्टी शब्दांमध्ये वर्णन करणं शक्यही नसतं आणि योग्यही नसतं. कारण जर चित्रपटांचं वर्णन शब्दांमध्ये करता आलं असतं तर, कादंब-यांवर चित्रपट बनले नसते. पण ब्लॉग म्हटलं की शब्द आलेच. आणि शब्द म्हणजे माझं स्वतःला व्यक्त करण्याचं सध्या तरी एकमेव माध्यम आहे.

मी सिनेमांची परीक्षणं करणं केव्हाच सोडलं आहे. कारण मला प्रत्येक सिनेमामध्ये काहीना काही आवडतंच. पण मजा अशी झालीय, की मला नटरंगमध्ये सगळंच आवडलं. अगदी वेशभूषेपासून, ते अप्रतिम संगीतापर्यंत. पण नटरंग एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो, ते अतुल कुलकर्णींमुळे. अतुल कुलकर्णी "गुणा कागलकर" च्या व्यक्तिरेखेमध्ये अनेकानेक रंग भरत जातात आणि डॉ. आनंद यादवांची कादंबरी वेगवेगळ्या पातळ्या पार करत जाते. मी डॉ. यादवांची मूळ कादंबरी वाचली नाहीय, पण नक्कीच त्यांना स्वतःलाही ह्या सिनेमाचा अभिमान वाटला असेल यात वाद नाही.

रवी जाधव ह्यांचं दिग्दर्शन नवोदितासारखं वाटतंच नाही. आणि त्यांचा एडव्हर्टायझिंगचा अनुभव चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो.  सर्व प्रमुख कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. तो काळ, ते प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेउन जातात. एका सच्च्या कलावंताचं दुःखं आणि त्यायोगे त्याच्या नातेवाईकांच्या वाट्याला आलेलं दुःखं सगळं अंगावर येत राहतं. नशीबाचे विचित्र खेळ बघून मन सुन्न होतं. पण सगळ्या परिस्थितींमध्ये सुद्धा असलेली गुणाची निरागसता आणि सचोटी पाहून काळजाला पीळ पडतात आणि प्रेरणासुद्धा मिळते. हाच ह्या चित्रपटाचा विजय आहे, की ही एका प्रतिभावान, सच्च्या पण परिस्थितीने गांजलेल्या कलाकाराची विलक्षण कथा असूनही त्या कलेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या प्रेक्षकालासुद्धा आतपर्यंत स्पर्शून प्रेरणा देते.