7/19/2012

स्मृती -३(अंतिम)

भाग -१ आणि भाग -२ पासून पुढे


अमर दिवसेंदिवस खंगत चालला होता. जेमतेम दहा दिवस तो घरी होता पण पाच वर्षांनी वय वाढल्यासारख्या त्याच्या हातांवर सुरकुत्या आल्या होत्या. चेहरा ओढला गेला होता. कानाजवळचे केस पिकले होते. डोळे खोल जाऊ लागले होते. अभयनं डॉक्टरांनाही घरी बोलावलं होतं. पण डॉक्टरांनी स्ट्रेस कमी झाल्याशिवाय काही होणार नाही असं स्पष्टच सांगितलं होतं. अमरच्या तंद्र्‍या वाढत होत्या. स्किझोफ्रेनियाची शक्यता डॉक्टरांनी नाकारली नव्हती. पण किमान स्ट्रेस कमी व्हायची महिनाभर तरी वाट बघावी असं डॉक्टरांचं मत होतं. अभय आतून पार हादरला होता. अमरला स्किझोफ्रेनिया असता, तर रात्री-अपरात्री होणारे प्रसंग जस्टिफाईड होते पण म्हणजे त्याच्या सख्ख्या भावाला एक मोठा मनोविकार असल्याचं सिद्ध होत होतं. पण जर अमरला मनोविकार नसेल तर मग ते रात्रीचे प्रसंग म्हणजे काय? दोन्ही उत्तरं अभयसाठी भलीमोठी प्रश्नचिह्नंच होती.
त्याच दिवशी महत्प्रयासानं अभयला पुस्तक वाचताना झोप लागली. ती कृष्णपक्षाच्या चतुर्दशीची रात्र होती. चंद्र जवळपास विझल्यातच जमा होता. नेहमीसारखीच स्मशानशांतता सर्वत्र पसरलेली होती. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि मधेच एखाद्या सापाची सळसळ. आणि नेहमीसारखीच काहीतरी आंतरिक जाणीव होऊन अभयला जाग आली. त्यानं डोळे उघडले आणि अमर त्याच्या बाजूलाच बसून थेट त्याच्या चेहर्‍याकडेच जेमतेम एक फूटाच्या अंतरावरून पाहत होता. त्याचं हृदय जवळपास थांबलंच. डोळे रोखलेले, स्तब्ध. पापण्याही मिटत नसाव्यात असं त्या एकाच थिजलेल्या क्षणात अभयला वाटलं आणि तो एकदम धडपडत उठला. त्याबरोबर छातीवर राहून गेलेलं झोपतानाचं पुस्तक खाली पडलं आणि त्या आवाजानं अभय अजूनच दचकला. त्याची छाती जोराजोरात धडधडू लागली. अमर तसाच स्तब्ध त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याक्षणी अभयला त्यादिवशीच्या नजरेचा भास झाला नाही. पण ही नजरही अनोळखी आणि तशीच रूक्ष होती. त्यानं कसंबसं धैर्य गोळा केलं आणि विचारलं.
"अमर. काय झालं? इथे काय करतोयस?" त्याला दिवा चालू करायचंही भान राहिलं नव्हतं.
"का केलंस तू असं?" अमर वेगळ्याच आवाजात रूक्षपणे म्हणाला.
"काय?" अभयच्या घशाला कोरड पडली होती. आवाज जेमतेम फुटत होता.
"का वेगळं केलंस मला तिच्यापासून?"
"काय बोलतोयस तू?"
"तुला माहितीय मी काय बोलतोय ते. तिला कसायांच्या हातात देऊन तू मला फसवून इथे घेऊन आलास."
"मी कुणाला फसवलं नाही. आणि कुणालाही कसायांच्या हातात दिलं नाही."
"मग मला का तोडलंस तिच्यापासून?"
"आणि आपल्या आईकडे कोण बघणार होतं मग? आणि आपले बाबा? सगळे कष्ट त्यांनी अन मीच उठवायचे होते का? आणि तुलाही पटलं होतंच की."
"मी मूर्ख होतो. माझ्यात दम नव्हता. मीच तिला वार्‍यावर सोडलं." अमरचा आवाज थोडा बदलला. सौम्य झाला. त्याच्या आवाजाला सूक्ष्म कंप सुटला.
अभयमध्ये एकदमच थोडा जोर आला आणि त्याला दिवा लावण्याचं सुचलं.
दिवा लावल्याबरोबर अमर जागच्याजागी कोसळला.

-----

त्यातले काही कागद एका मॅटर्निटी होमच्या जुन्या हॅन्डमेड रिपोर्ट्सचे झेरॉक्स होते. काहींमध्ये व्हिजिटेशनच्या भरलेल्या फॉर्म्सचे झेरॉक होते. काहींवर काही डॉक्टरांचे पत्ते होते. आणि काही एका मेंटल हॉस्पिटलच्या व्हिजिटेशनचे फॉर्म्स आणि त्याच मेंटल हॉस्पिटलच्या काही रिपोर्ट्सचे झेरॉक्स. त्या दोघांनी त्या कागदांवरून एक नजर फिरवली आणि ते एका बाजूला करून ठेवले.
आता समोरच्या चळतीत थोडेसेच कागद उरले. तेव्हाच खिडकीच्या मोडक्या तावदानांमधून एक वार्‍याची झुळूक आत आली आणि मेणबत्तीची ज्योत फडफडली. तेव्हढ्याशा हालचालीनंसुद्धा खोलीत एकदम छायानृत्य झाल्यागत झालं आणि ते दोघे दचकले. त्याच झुळूकीमुळे जमिनीवर उरलेली पानं थोडीशी पसरली. मेणबत्ती पूर्ववत झाली आणि त्यांनी ती पानं सारखी केली.
"आत्ता मेणबत्ती हललेली तेव्हा तुला तिथे काही दिसलं का?" एकानं दुसर्‍याला खोलीच्या एका विवक्षित कोपर्‍यातल्या जमिनीकडे बोट दाखवत म्हटलं.
दुसर्‍यानं एकदा त्याच्याकडे दोन क्षण पाहिलं मग त्या जागेकडे एकदा पाहिलं आणि मग नकारात्मक मान डोलावली. मग त्यानं सगळ्यात वरचं पान उचलून मेणबत्तीजवळ धरलं.
अभय विमनस्कपणे खिडकीतून पाहेर पाहत उभा होता. त्या इमारतीचं बांधकाम जुनं असल्यानं चार मजलेसुद्धा फार उंच होते. तेव्हढी उंची पाहूनसुद्धा त्याला गरगरायला होत होतं. मोसम सुरू व्हायच्या आधीचा अवेळी पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे चहूकडे मृद्गंधाचा घमघमाट सुटला होता. पण त्याचे सगळी इंद्रियं भरकटली होती. त्याची तंद्री लागू लागली होती. इंद्रियांवरचा ताबा इच्छा नसतानाही सुटतो की काय असं अचानक वाटू लागलं. एखाद्याची जबरदस्तीनं समाधी लागावी तसं काहीसं. आणि एकदम जोरात दाराची बेल वाजली. तो दचकून भानावर आला. दोन क्षण तो नक्की काय झालं त्याचा अदमास बांधत राहिला. तेव्हा बेल परत वाजली. तो पाय ओढतच दरवाजाकडे गेला. त्याला सर्वांगातलं त्राण गेल्यासारखं वाटत होतं. जणू काही वेळासाठी त्याच्या शरीरातले प्राण कुणीतरी बाहेर काढले असल्यासारखं. त्यानं दरवाजा उघडला.
"मी इन्स्पेक्टर वाघ." समोरच्या गणवेषधारी अधिकार्‍यानं आयकार्ड दाखवत म्हटलं. "तुमच्या भावासंदर्भात काही विचारायचं होतं."
का कुणास ठाऊक पण त्याला आश्चर्य वाटलं नाही. त्यानं त्यांना आत घेतलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसवून पाणी आणायला स्वयंपाकघरात गेला.

"काहीही काय विचारतात इन्स्पेक्टर. माझ्या भावाला मी स्वतःच्या हातानं अग्नि दिलाय." त्याचं डोकं सहसा तापत नसे.
"शांत व्हा. मी फक्त माझं काम करतोय." इन्स्पेक्टर शांत स्वरात म्हणाले.
"तुमचं काम? माझ्या मेलेल्या भावानं खून केलेत का म्हणून तुम्ही मला विचारताय आणि शांत राहायला सांगताय? तुमचं काम आहे खुन्यांना पकडणं. मेलेल्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप देणं नव्हे." तो तावातावानं बोलत होता.
"शांत व्हा. मी तुमच्या भावानं खून केलेत म्हणत नाहीये."
"मग?"
इन्स्पेक्टरनं दोन मिनिटांचा पॉज घेतला. "हे बघा. त्या मुलीची बारा दिवसांनंतर डेड बॉडी मिळाली. संशयित माणसं ही मुळात छेड काढणार्‍यांचे मित्र अथवा नातेवाईकच होते."
"होते म्हणजे?"
"जोसेफ स्टीफन, भगवान महिंद्रकर आणि सुब्बाराव हे तिघेजण त्या व्हिडिओत नव्हते पण त्याच गॅंगमध्ये होते. आणि त्या तिघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळालेत."
"काय?" तो जवळपास ओरडलाच.
"होय. जोसेफवर चमत्कारिकरित्या वीजेची तार पडली. सहा फूटी भगवान पावसाचं पाण्यानं झालेल्या चार फूटांच्या डबक्यात बुडून मेलेला रस्त्याच्या कडेला सापडला. आणि सुब्बाराव त्याच्या टॅक्सीत हृदयक्रिया थांबल्यानं जागच्या जागीच गेला."
"हृदयक्रिया थांबण्यात संशयास्पद काय आहे?"
"वीजेच्या तारेवर जोसेफच्याच बोटांचे ठसे होते आणि चार फूटाच्या डबक्यात भगवान बुडून मेला आणि सुब्बाराव त्यांचा खास सवंगडी होता, एव्हढं कारण पुरेसं आहे." वाघ स्वरात बदल न होऊ देता बोलत होते.
"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?"
"संपादक लेलेंना ओळखत असालच तुम्ही?"
"हो. त्यांचं काय झालं?"
"तुमचा भाऊ गेला त्या रात्री इन्स्टिट्यूटकडून शहराकडे परत जायच्या रस्त्यावर त्यांची गाडी भररस्त्यात हेडलाईट्स चालू ठेवून उभी राहिलेली सापडली. आणि ते स्टिअरिंगव्हीलवर हृदयक्रिया थांबून मेलेले आढळले."
"काय सांगताय हे सगळं?"
"चॅनेलचा क्रियेटिव्ह हेड म्हणजे लेलेंचा बॉस संतोष दरेकर मध्यरात्री स्वतःच्या बेडमध्ये हृदयक्रिया थांबून मेला. आणि चॅनेलचा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ज्यानं कदाचित ती टेप लीक होण्यामध्ये हातभार लावला होता, तो चॅनेलच्याच ऑफिसात कॉन्फरन्स रूममध्ये हृदयाचा झटका येऊन मेलेला आढळला. त्या कॉन्फरन्स रूमसमोर पाच एम्प्लॉई बसलेले होते. पण एकालाही त्या काचेचा भिंतीतूनही काही वावगं दिसलं नाही. एकाचं लक्ष गेलं तेव्हा तो दाराशी घामाघूम होऊन पडलेला होता."
"पण हे सगळं मला का सांगताय तुम्ही?" अभय हे सगळं सहन न होऊन म्हणाला.
"ह्या प्रत्येक मृत्युच्या वेळी तुम्ही कुठे होतात आणि त्याचा कुणी साक्षीदार आहे का हे मला विचारायचं होतं." वाघ एकेका शब्दावर जोर देत म्हणाले.
"काय? म्हणजे माझ्यावर तुमचा संशय आहे? त्या मुलीच्या नातेवाईकांवर का नाही तुमचा संशय?"
"आमची संशयितांची यादी फार मोठी आहे. त्यात सगळेचजण आहेत. तुम्हीही सहकार्य केलंत तर बरं होईल." वाघांच्या आवाजात थोडी जरब आली.
अभयकडे दुसरा पर्याय तरी काय होता? फार वाईट दिवस होते हे खरं होतं.
--
तारीख ३० मे, शनिवार

आज स्वतःचंच काल्पनिक पात्र लिहायचा प्रयत्न केला. आयुष्यात पहिल्यांदाच बहुतेक. बाकी सगळी पात्र काल्पनिक नावानं असली तरी अमरचं पात्र तसंच आणि त्याचं जसं तेच माझंही. अमरला श्रद्धांजली म्हणून कथा लिहायला घेतली आणि भलतीच वेगळी भय/सूडकथा होत चालली आहे. खरंच असं काही होत असतं तर? मृतात्म्यांनाही बदला घेता आला असता तर? तर त्या मुलीनं नक्कीच तिच्यावरच्या अन्यायाचा बदला घेतला असता. ओह माय गॉड. आणि 'तिनं'सुद्धा? बापरे. कुठून डोक्यात परत हा विचार आला. तिच्या मनोरूग्णालयातल्या मृत्युच्या बातमीनंतर अमर तर पार सैरभैर होऊन गेला होता. बहुतेक ती बातमी ती टेप लीक होऊन मुलगी किडनॅप झाल्यादिवशीच आली होती. साहजिक आहे म्हणा. अमरचा जीव होता तिच्यावर.

ते पान व्यवस्थित क्रमानं ठेऊन त्या दोघांनी पुढचं पान उचलललं.

तारीख २७ २८ मे, गुरूवार
काल मी काही लिहिलं होतं का ते कळायला मार्ग नाहीये. सुट्या पानांवर लिहिण्याचा हा एक तोटा, की एखादं गायब झालं तरी कळत नाही. २७ हा दिवसच आयुष्यातनं हरवला की काय? अमरला जे होत होतं तेच मलाही होतंय की काय असं वाटू लागलंय. काल २६ तारीख होती असं मला इतका वेळ वाटत होतं. तारीख-वारांचं गणितच चुकलंय की खरोखरच अख्खा दिवस मी हरवलो होतो. आई आणि अमरला जर होऊ शकतं तर मलाही होऊ शकतंच की. पण कसं शक्य आहे? अगदी गळून गेल्यासारखं वाटतंय हे मात्र खरं. शरीरातलं सगळं त्राण गेल्यासारखं. जणू काही वेळासाठी शरीरातले प्राण कुणीतरी बाहेर काढले असल्यासारखं.
काही सुचत नाहीये लिहायला. राहून राहून अमर आणि 'तिचा'च विचार येतोय डोक्यात. अमरचं इतकं प्रेम होतं तिच्यावर की त्यानं माझ्याही नकळत तिच्यावर सगळा रिसर्च करून ठेवला होता. त्यादिवशी गर्भपाताच्या हॉस्पिटलबाहेर तिला सोडून मी निघालो आणि पीसीओवरून तिच्या घरी फोन निनावी फोन करून तिची खबर देऊन मी जो अमरला घेऊन इथे परत आलो, त्यानंतर मी कधीही मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. बाबांचा उद्ध्वस्त झालेला संसार मीच करत राहिलो. पण अमरनं त्या मॅटर्निटी होमपासून ते त्या डॉक्टरांचा शोध घेऊन ते थेट तिच्या मनोरूग्णालयाचाही पत्ता लावला होता आणि तो तिला भेटायला जात होता हे मला तो गेल्यावर त्याच्या बॅगेत सापडलेल्या कागदपत्रांवरून कळलं. काय होऊन बसलं हे सगळं? आईही गेली ती अशीच तिच्या मनाच्याच कुठल्यातरी कोपर्‍यात हरवून. बाबा व्यापानं आणि दुःखांनी गांजून, खंगून गेले. आणि धाकटा भाऊ प्रेम आणि अपराधी भावनेमध्ये. जर ते कागद मला सापडले नसते तर मी पण तिच्या मृतात्म्याची भीती घेऊन बसलो असतो. पण जर आधीच सापडले असते तर कदाचित अमरवर अशी वेळ आली नसती.
जाऊ दे. जर तरमुळे काय फरक पडतो?

-----

रात्रीच्या प्रकारानंतर अमर जवळपास दहा तास बेशुद्धच होता. अभयनं पहाटेच डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी ग्लुकोज चढवलं आणि औषधं लिहून दिली. प्रचंड अशक्तपणा आणि अपरिमित स्ट्रेस हे कारण सांगितलं. अभयला काही सुचेनासं झालं होतं. अमरला दुपारी साडेबारा-एकच्या आसपास थोडी शुद्ध आली. अभयनं त्याला भाताची पेज करून दिली आणि फळांचे ज्यूस दिले. त्यानंतर अमरला थोडी हुशारी आली.
दुपारभर तो पलांगावर पडून आढ्याकडे पाहत होता. संध्याकाळच्या वेळी घरातलं सामान भरण्यासाठी म्हणून अभय बाहेर पडला आणि इन्स्टिट्यूट बिल्डिंगमधल्या दुकानात गेला. तो साधारण रात्री आठला घरी परत आला. स्वयंपाकघरात सामान ठेवून तो अमरकडे पाहायला बेडरूममध्ये गेला आणि एकदम थबकला.
अमर खिडकीमध्ये पाठमोरा उभा होता. स्तब्ध, एकागे, तंद्री लागल्यासारखा. त्याच्यात दुपारच्या अशक्तपणाचा मागमूसही नव्हता. मागे न वळताच तो एकदम म्हणाला, "ऑफिसातून फोन आला होता. त्या किडनॅप झालेल्या मुलीचा मृतदेह मिळालाय आज." त्याच्या आवाजामध्ये कुठेही अशक्तपणाचा, शक्तिपाताचा लवलेशही नव्हता.
अभय काहीच बोलला नाही.
"झालं तुझं समाधान? माझ्याहातनं अजून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं."
"अजून एका?" अभय अभावितपणे म्हणून गेला.
अमर एकदम गर्रकन वळला. त्याचे डोळे लाल झाले होते. संताप ओतप्रोत भरलेला रागीट, संतप्त चेहरा पाहून अभयला काही सुचेना. तो धारदार आवाजात म्हणाला, "विसरलास ते सगळं. तिचा गर्भपात जबरदस्तीनं करवला होतास तूच. आणि तिला माझ्यापासून तोडलं होतंस."
"तेच तुझ्या आणि तिच्या भल्याचं होतं. सतराव्या वर्षी काय आई-बाप बनणार होतात?" अभयनं उसनं अवसान आणत म्हटलं.
"टेम्पररी पॅरॅलिसिसचं औषध आणि कोवळ्या वयातल्या गर्भपाताचा तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि तिनं गेली १२ वर्षं वेड्यांच्या रूग्णालयात काढली तुझ्यामुळे." अमरचा आवाज चढतच चालला होता. बाहेरच्या शांततेत कदाचित अख्ख्या वस्तीलाही ऐकू जात असावा.
"पण.. पण हे सगळं तुला कसं माहित. हे फक्त तिला किंवा मला माहित असायला हवं." अभय बोलला आणि आपल्या बोलण्याचा अर्थ लागून त्याच्या अंगावर काटा आला.
अमरच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नाही. आणि मग त्याच्या चेहर्‍यावरचा संताप एकदम गेला. चेहरा निवळला. आणि तो सौम्य आवाजात म्हणाला, "ही काय कोपर्‍यात बसलीय ना ती. तिनंच तर मला सांगितलं."
अभय थंडच पडला आणि अमरच्या त्याच नेहमीच्या जागेकडे पाहू लागला. तिथे काहीच नव्हतं.
"मी अजून पापं माथ्यावर घेऊन नाही जगू शकत दादा." असं म्हणून अमर वळला आणि खिडकीतून बाहेर बघत खिडकीवर रेलून उभा राहिला. दोन क्षण असेच स्तब्धतेत गेले. अभय सगळी ताकद गोळा करून अमरकडे चालू लागला आणि तो अमरपर्यंत पोचणार एव्हढ्यात अमर पुढे वाकला आणि खिडकीतून पलिकडे कोसळला. कोणीतरी मागून धक्का दिल्यासारखा. अभयनं जिवाच्या आकांतानं पुढे उडी मारली पण सगळं फोल होतं. खाली अमरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तेव्हढा त्याला दिसला.

-----

त्या दोघांच्या समोर आता शेवटची तीन पानं शिल्लक राहिली होती.

मोसमाआधीचा अवेळी पाऊस सुरू होता. पण हा अवेळी पाऊसही फार विचित्र होता. मुसळधार आणि संततधार. संध्याकाळी सहा वाजताच सर्वत्र अंधारून आलं होतं. माणसं पटापट घराकडे निघाली होती. रस्त्यावरची गर्दी ओसरू लागली होती. सगळीकडे पाण्याचं साम्राज्य होतं. गटाराचं पाणी, चिखलाचं पाणी, पावसाचं पाणी सगळं एकच. आकाशातनं कुणीतरी पृथ्वीचे फोटो काढावे तद्वत होणारा विजांचा चमचमाट आणि पाठोपाठ धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट.
भगवान महिंद्रकर त्याच्या चाळीचा पुढारी कम गुंड. तो अशा वेळेमध्ये रस्त्यावर उतरला नसता तरच नवल...

भगवान महिंद्रकरच्या कथेचा शेवट आधीच्या पानावर वाचल्यामुळे दोघांनीही उर्वरित भाग वाचला नाही आणि ते थेट डायरी उल्लेखावर गेले.

तारीख २९ मे, शुक्रवार

अमर जाताना वेड्यासारखं काहीतरी बोलला नसता तर किती बरं झालं असतं. मलाही तिचे भास होऊ लागलेत. ह्याला काही अर्थ नाही. हे सगळे अपराधी मनाचे खेळ आहेत. पण मी काय चूक केलं होतं? माझं वय फक्त वीस होतं. आणि माझ्यावर अख्ख्या कुटुंबाची जवाबदारी पडली होती. अमर शिकून नोकरीला लागेपर्यंत मी कारकूनी केली. त्यानंतर कुठे मनासारखं निवांत लेखकाचं आयुष्य लाभलं. असलं काहीतरी होईल ह्याची मला तरी कुठे कल्पना होती. पण तरी हे असले भास का व्हावेत मग? जर खरोखरच मृतात्मे असतील तर मग मला अमर का दिसत नाही कधी? त्याला कुणीतरी धक्का मारला होता असं वारंवार का वाटतं?

पुढच्या पानावर कथेचा मजकूर नव्हता. फक्त डायरी नोंद होती. पण हस्ताक्षर बदललेलं वाटत होतं.

तारीख ३१ मे, रविवार

मी आज कबूल करतो की मीच माझा धाकटा भाऊ अमरला खिडकीतून खाली धक्का दिला होता. अमरच्या आयुष्यात मीच विष कालवलं होतं. त्यामुळे त्याची मनस्थिती पूर्णपणे ढासळून गेली होती. त्याच्या जगण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून मीच त्याला संपवलं. तो सतरा वर्षांचा असताना तो शिकायला जिथे होता. तिथे त्याच्यापासून त्याच्या मैत्रिणीला दिवस गेले. तेव्हा अमरला त्या सगळ्यातून सोडवायला म्हणून मीच त्या मुलीचा-स्मृतीचा-जबरदस्तीनं तिच्या मनाविरूद्ध गर्भपात करवला. आणि त्यामुळे तिच्या डोक्यावर जो परिणाम झाला तो कायमचाच. तिनं बारा वर्षं मनोरूग्णालयात अत्यंत भयावह अवस्थेत काढली आणि शेवटी एक दिवस तिनं आत्महत्या केली. त्या मृत्यूचीही जवाबदारी मी स्वीकारतो. ही सगळी पापं घेऊन आता एकट्यानंच जगण्यात अर्थ उरला नाही म्हणून मी ही आत्महत्या करतेय.


-अभय.


त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि त्यातल्या एकाला अचानकच काहीतरी विचित्र वाटलं आणि त्यानं परत मेणबत्तीजवळ तो कागद नेऊन नीट वाचलं. आणि परत साथीदाराकडे पाहिलं.
"हो. 'करतेय' असंच लिहिलंय." दुसरा त्याला काय म्हणायचंय ते ओळखत म्हणाला.

(१)

त्यांनी घाईगडबडीनं उरलेलं शेवटचं पान उचललं.

त्यावर फक्त मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं.

माझा प्रिय भाऊ अमर
ह्याच्या स्मृतीस अर्पण

दिनांक २२ मे, शुक्रवार


कागदांची चळत संपली होती आणि ते दोघे स्तब्धपणे एकमेकांकडे पाहत होते. अचानक पुन्हा एक वार्‍याचा झोत आला. आणि मेणबत्तीची ज्योत फडफडून विझली. ते दोघे दचकले. खोलीतला गारवाही अचानक वाढल्यासारखं झालं. घाईगडबडीनं चाचपडत त्यांनी काडेपेटी उचलली आणि मेणबत्ती परत पेटवली. वारा थोडा शांत झाला पण वातावरण एकदम भारल्यासारखं झालं.
दोन क्षणाची स्तब्धता गेल्यावर त्यातला एकजण दुसर्‍याला म्हणाला, "पण त्या कथेचं काय झालं ते कळलंच नाही ना!"
दुसर्‍यानं काही उत्तर द्यायच्या आतच एका स्त्रीचा आवाज आला, "ते दोघे येतच असतील एव्हढ्यात. त्यांनाच विचारून घ्या."

त्या दोघांनी दचकून आवाजाच्या दिशेला पाहिलं. खोलीच्या कोपर्‍यात जमिनीवर ती बसली होती. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तिचे तपकिरी चमकते डोळे तेव्हढे नीट दिसत होते.

-समाप्त-

(१)इथेच कथा थांबवण्याचा एक विचार केला होता. त्यातनं मला हवी तितकी संशयाची जागा कथेत राहिली असती. पण कदाचित कथेचा काहीच अर्थ वाचकांना न लागण्याची शक्यता वाटली. चुकीचंही असेल मला वाटलेलं. म्हणून मग मी पुढचा भाग कथेत टाकला. कदाचित गरज नव्हती. पण असो.

8 comments:

  1. जब्बरदस्त आवडली. शेवट क्लास होता !!

    ReplyDelete
  2. Anonymous12:51 AM

    Pharach chan katha ani shewat tar totaly different Bhari

    ReplyDelete
  3. बापरे... एकदम जबरदस्त....
    भयानक छान कथा लिहिता तुम्ही....

    ReplyDelete
  4. जबरदस्त झाली आहे कथा ! आणि तिच्यात अशी एक जादू आहे की पुन्हां वाचायला भाग पाडेल ! आणि त्यातून नव्यानव्या गोष्टी सापडतील ! एकूणच कथानक, वातावरणनिर्मिती...सगळीच भट्टी जमून गेलीय अगदी !

    ReplyDelete
  5. सगळ्यात आधी कथा फक्त तीन भागांत संपवलीत म्हणून बरं वाटलं . :-)

    तीनही भाग आत्ता एकत्र वाचले.
    वातावरण निर्मिती चांगली झाली आहे .. पण गोष्ट फार वळणावळणाची झाली आहे माझ्या मते .. त्यामुळे थोडा रसभंग झाला माझा.

    शिवाय आजच्या युगात अशी भूत-खेताची कथा तुम्हाला का लिहाविशी वाटली असेल असाही एक विचार मनात आला :-)

    ReplyDelete
  6. जबरदस्त!

    ReplyDelete
  7. Pan te doghe hote kon? Ani gele kashala hote tithe.....Katha wachayla.....

    ReplyDelete
  8. suparb katha ahe.vachtana angavar kata ubha rahila.g8......

    ReplyDelete