१९२० च्या आसपासचं दशक होतं. तुर्कस्तान पहिल्या महायुद्धात पराभूत झाला होता. तुर्कस्तानचा राजा म्हणजेच "खलिफा", ज्याला जगभरातले सगळे सुन्नी मुसलमान आपला नेता मानत, त्याची गणना पराभूतांमध्ये होत होती. तुर्कस्तानच्या सैन्याच्या सेनापतीनं म्हणजेच मुस्तफा केमाल पाशानं(पाशा म्हणजे जनरल) 'टर्किश नॅशनल मूव्हमेंट' सुरू केली. त्यानं स्वतंत्र तुर्कस्तानाची घोषणा केली. 'खलिफा'ची खिलाफत रद्द करून त्याला लोकशाही आणायची होती. पराभूत होत असलेल्या तुर्कस्तानात त्यानं आपल्या 'आझाद हिंद सरकार' पद्धतीनं एक सरकार स्थापन केलं आणि स्वतःच सैन्यप्रमुख बनून मित्र राष्ट्रांविरुद्ध लढा सुरू केला. मित्र राष्ट्रांनी मूळ तुर्की संसद बरखास्त केली आणि तेव्हाच केमाल पाशानं स्वतःची संसद सुरू करून वाटाघाटी सुरू केल्या. मग लुसॉनच्या करारानुसार 'रिपब्लिक ऑफ टर्की' ची स्थापना झाली.
त्यानं आधुनिक तुर्कस्तानचं स्वप्न बघितलं होतं. केमाल पाशानं सर्वप्रथम 'खलिफा' ला पदच्युत केलं. 'खिलाफत' रद्द केली. त्याकाळात तुर्कस्तानात अरबी संस्कृती मूळ धरत होती. धर्मसंस्थेची राज्यकारभारावर पकड होती. केमाल पाशाला नेमकं हेच खटकत होतं. तो स्वतः एक भाविक मुसलमान होता, पण त्याला राजकारण आणि धर्मकारण, न्यायव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आणि शिक्षण आणि धर्मव्यवस्था ह्यांची सांगड खटकत होती. त्यानं सगळंच्या सगळं बदलून टाकायचा चंग बांधला. त्यानं सैन्यप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुका लढवल्या. घवघवीत यश मिळाल्यावर त्यानं सर्वप्रथम सगळ्या मदरशांच्या मान्यता रद्द केल्या. अरबी संस्कृतीचं उच्चाटन होण्यासाठी, तुर्की भाषेसाठी फोनेटिक लॅटिन लिपी दत्तक घेतली आणि जुनी अरेबिक लिपी रद्द करून टाकली. युरोपीय शिक्षणपद्धतीवर आधारित आधुनिक शिक्षणपद्धती आणण्याच्या दिशेनं संशोधन सुरू केलं. धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारून त्यानं राजकारणातून धर्म दूर केला. आणि इथेच न थांबता, इस्लामिक लॉ ची मान्यता काढून इतर युरोपीय कायद्यांवर आधारित न्यायव्यवस्थेचा त्यानं स्वीकार केला. त्याला सर्व धार्मिक संस्थांकडून टोकाचा विरोध झाला. पण त्याचा स्वच्छ उद्देश आणि खंबीरपणा ह्यामुळे तो लोकांमध्ये टिकून राहिला. त्याला प्रेमानं 'अतातुर्क' म्हटलं जातं. अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता.
थोडंच दूर आशियात, मो.क. गांधी नावाचा एक माणूस राष्ट्रीय चळवळीत मुसलमानांना सामील करण्यासाठी त्याच वेळी एक घातक चाल खेळला. त्यांनी 'खिलाफत' रद्द करण्याविरुद्ध भारतात चळवळ सुरू केली. तिकडे अतातुर्क सर्व मुसलमानांच्या भल्यासाठी 'खिलाफत' रद्द करत होता, तर इथे होणारा भारतीय 'राष्ट्रपिता' भारतातील मुसलमानांसकट सर्वांनाच दुहीकडे लोटणारी एक अर्थहीन 'खिलाफती'च्या रद्द होण्याविरोधात चळवळ उभारत होता.
अनेक वर्षं लोटली. अतातुर्क गेला आणि हळूहळू तुर्कस्तानात कट्टरता मूळ धरू लागली. अतातुर्कचा पक्ष सत्तेपासून दूर झाला आणि थोडा कट्टर पक्ष सत्तेत आला. त्यांनी हेडस्कार्फवरची बंदी उठवणे वगैरे प्रकार करून पाहिले, पण अतातुर्कचे संस्कार अजून बळकट होते. त्याच्या संस्कारात मुरलेलं सैन्य आणि न्यायव्यवस्था सरकारला पुरून उरत होते. अतातुर्क जात्याच सैन्यप्रमुख असल्यानं त्याच्या कारकीर्दीत सैन्याचे अधिकार जास्त होते आणि सैन्य त्याच्याच प्रभावाखाली राहिल्यानं कायम धर्मनिरपेक्ष राहिलं. अतातुर्कने आणलेली स्वतंत्र न्यायव्यवस्था काही बाबतींमध्ये राज्यव्यवस्थेपेक्षाही जास्त अधिकार राखून होती. आणि हे मुद्दे, आदर्श लोकशाहीच्या थोडे विरोधात जातात. नेमक्या ह्याच मुद्द्यांचा फायदा घेऊन, युरोपियन युनियनचा जयघोष करत कट्टर पक्षानं सरकारचे अधिकार वाढवणारी संविधानदुरूस्ती सार्वमतासाठी आणली आणि ती पासही झाली. आता, धर्मनिरपेक्ष सैन्याचे आणि न्यायव्यवस्थेचे पंख छाटले जाणार! त्यांच्या आधाराने असलेला अतातुर्कचा पक्षही थोडासा बॅकफूटवर गेलाय.
आणि धर्माच्या नावाने चळवळी उभ्या करून दुहीची बीजं रोवणार्या गांधींचा पक्ष मात्र भारतात अजूनही 'धर्मनिरपेक्ष' म्हणून टिमकी बडवत असतो.
पण विरोधाभास पहा. आज जो अतातुर्कच्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा नेता आहे. त्याच्या बोलण्याच्या आणि दिसण्याच्या पद्धतीमुळे त्याला तुर्कस्तानचा "गांधी" म्हणतात.
---अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.