Showing posts with label मो.क.गांधी. Show all posts
Showing posts with label मो.क.गांधी. Show all posts

1/30/2011

३० जानेवारी

३० जानेवारी हा दिवस भारतामध्ये मो.क. गांधींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. ह्याच दिवशी नथुराम गोडसेंनी गांधींचा गोळ्या घालून वध/खून केला (ज्याला जे हवे ते घ्यावे, मूळ मुद्दा हा नाही). आणि भारताच्या इतिहासातला एक अध्याय संपला. पण एका अपमानित व्यक्तिनं जागृत होऊन अन्याय्य शक्तिंविरूद्ध एक अख्खं राष्ट्र जागं करण्याची जगातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असावी. राष्ट्रीय चळवळ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं श्रेय अवश्य गांधींना जातं. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे गांधी दुराग्रही अन हट्टी होत गेले. आणि मग हळूहळू व्यक्ति राष्ट्रापेक्षा मोठी होत गेली. जेव्हा असं घडतं तेव्हा राष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसानच होतं आणि तसंच ते होऊही लागलं होतं. आणि पुढे अजूनही मोठ्या प्रमाणावर होण्याच्या शक्यता होत्या.
अशा वेळी नथुरामनी घाई केली की उतावीळपणा केला की शांतपणे निर्णय घेतला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या मते देशाचं नुकसान थांबवण्याचा एकच मार्ग होता आणि त्यांनी तो अनुसरला. त्यासाठी होणार असलेलं यथोचित शासनही स्वीकारण्याची पूर्ण तयारी करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय चुकीचा की बरोबर किंवा नथुराम माथेफिरू की हुशार हे महत्वाचं नाही. पण नथुरामच्या कृतीचे किती विचित्र परिणाम घडले ते महत्वाचं.
नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल).
गांधींचे विचार कितीही आदर्श असले तरी त्यांनी त्या विचारांना योग्य ठिकाणी मर्यादा घातल्या नाहीत. गांधींचा प्रत्येकच बाबतीत अतिरेक होता. मग ती अहिंसा असू दे, असहकार असू दे किंवा ब्रह्मचर्य असू दे. असे प्रकार संतांसाठी ठीक असतात, पण देश चालवणार्‍यांसाठी नव्हे. त्यातही त्यांनी ब्रह्मचर्याबाबत केलेले प्रयोग हे कधीकधी विकृती ह्या सदरात मोडणारे होते. मग भले ते त्यांनी कितीही निरागसपणे केल्याचं सांगण्यात आलं तरीही.
कुठलीही मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसून अख्ख्या देशाला वेठीला धरणं हे त्यांचं अमोघ अस्त्र होतं. आधी हे त्यांनी ब्रिटीशांवर आजमावलं. पण ब्रिटीशांच्या वेळी केस वेगळी होती. गांधी मेले असते तर अख्खा देश पेटेल ही भीती ब्रिटीशांना होती. थोडक्यात ते अन्यायी ब्रिटीशांना केलेलं हुशार ब्लॅकमेलिंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याच लोकांकडून स्वतःची तत्त्व राखण्यासाठी (किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी) आपल्याच लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं हे कितपत योग्य होतं. एका माणसाच्या तत्वांसाठी अख्खा देश आणि हजारो लोकांचे प्राण पणाला लावले जात होते. आपली तत्व लोकांवर जबरदस्तीनं लादणं ही एकप्रकारची वैचारिक हिंसा ठरत नाही का? पण गांधींनी काही काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
गांधींनी एकट्यानीच देशाचं नुकसान केलं असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ति ठरेल. पण अशा न तशा पद्धतीनं गांधींचं पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान होतं. नेहरू आणि कंपनीने गांधींच्या नावाखाली अनेक चुका केल्या. पण गांधींनीदेखील आपल्या हट्टीपणाने अनेक गोष्टी घडवून आणल्या. गांधींची सगळ्यात मोठी चूक कदाचित ही होती की त्यांनी स्वतःची तत्व कधीच काळाच्या कसोटीवर तपासून पाहिली नाहीत. त्यांच्या ज्या समजूती होत्या त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहण्याची त्यांना कधीच गरज वाटली नाही. उलट अख्ख्या जगानं आपल्याच समजुतींनुसार स्वतःची मतं बदलून चालावं ह्या हट्टाने ते मार्गक्रमणा करत राहिले. त्यांचं अहिंसेचं अन असहकाराचं अमोघ अस्त्र देखील बदलत्या काळानुसार बदल मागत आहे. आजही ज्या ज्या देशांमध्ये उठाव झालेत, तिथे सगळीकडे सुरक्षा दलं निर्दयीपणे आंदोलकांवर हल्ले करताहेत. पण आंदोलक ठिय्या मांडून उपोषणाला बसले तर एकतरी आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? हा प्रश्न मला पडतो. जोवर आंदोलक आपली एकगठ्ठा शक्ति दाखवून सुरक्षा दलांनाही आपल्या बाजूनं येण्यास मजबूर करत नाहीत तोवर हे अशक्यच ठरतं. काही काही देशांमध्ये रक्तविरहित क्रांतीही झालीय. पण सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नसते. जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं.
जर नथुरामनं गांधींना गोळ्या घातल्या नसत्या. तर कदाचित काही वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये गांधींभोवतीचा बुडबुडा फुटलाही असता किंवा भारत अजून मोठ्या प्रमाणावर गांधींच्या आहारी गेला असता. कदाचित अजून एक दोन संस्थांनांची घोंगडी हिंसक कारवाईअभावी भिजत पडून राहिली असती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते.

आज माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जानेवारीलाच मी पहिली पोस्ट टाकली होती. सर्व वाचकांच्या प्रेमामुळे आणि सर्व मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास पूर्ण झाला. सुरू केला तेव्हा स्वतःपासून काहीच अपेक्षा नव्हत्या. पण सर्वांच्या प्रेमानं आणि प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी मिळणार्‍या चांगल्या वाईट अभिप्रायांमुळे लिहिता राहिलो. रस्त्यावर काही कौतुकंही झाली पण सगळ्याचं श्रेय वाचकांनाच जातं.
डिसेंबरमध्ये विचार केलेला की पहिल्या वाढदिवशी ब्लॉगला १०० व्या पोस्टची भेट द्यावी. पण डिसेंबरमध्ये सुट्टीवर असताना लेखनात जवळपास महिन्याभराचा खंड पडला. पण मग तरीसुद्धा पहिलीच भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याखातर गेला आठवडाभर रोज एक अन कालपासून तर दिवसाला दोन पोस्ट केल्या आहेत. ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल. पण मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि महत्प्रयासाने ते मी पूर्ण करू शकलोय ह्याचा मला आनंद आहे. ही माझ्या ब्लॉगवरची १०० वी पोस्ट आहे.
ह्यापुढे पोस्ट्सची फ्रिक्वेन्सी पूर्ववत होईल. आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, ह्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करूर करेन.
सर्वांचे मनापासून आभार! आपला लोभ असाच कायम राहिल आणि मी कायम लिहिता राहिन हीच सदिच्छा! :)

9/16/2010

विरोधाभास

१९२० च्या आसपासचं दशक होतं. तुर्कस्तान पहिल्या महायुद्धात पराभूत झाला होता. तुर्कस्तानचा राजा म्हणजेच "खलिफा", ज्याला जगभरातले सगळे सुन्नी मुसलमान आपला नेता मानत, त्याची गणना पराभूतांमध्ये होत होती. तुर्कस्तानच्या सैन्याच्या सेनापतीनं म्हणजेच मुस्तफा केमाल पाशानं(पाशा म्हणजे जनरल) 'टर्किश नॅशनल मूव्हमेंट' सुरू केली. त्यानं स्वतंत्र तुर्कस्तानाची घोषणा केली. 'खलिफा'ची खिलाफत रद्द करून त्याला लोकशाही आणायची होती. पराभूत होत असलेल्या तुर्कस्तानात त्यानं आपल्या 'आझाद हिंद सरकार' पद्धतीनं एक सरकार स्थापन केलं आणि स्वतःच सैन्यप्रमुख बनून मित्र राष्ट्रांविरुद्ध लढा सुरू केला. मित्र राष्ट्रांनी मूळ तुर्की संसद बरखास्त केली आणि तेव्हाच केमाल पाशानं स्वतःची संसद सुरू करून वाटाघाटी सुरू केल्या. मग लुसॉनच्या करारानुसार 'रिपब्लिक ऑफ टर्की' ची स्थापना झाली.

त्यानं आधुनिक तुर्कस्तानचं स्वप्न बघितलं होतं. केमाल पाशानं सर्वप्रथम 'खलिफा' ला पदच्युत केलं. 'खिलाफत' रद्द केली. त्याकाळात तुर्कस्तानात अरबी संस्कृती मूळ धरत होती. धर्मसंस्थेची राज्यकारभारावर पकड होती. केमाल पाशाला नेमकं हेच खटकत होतं. तो स्वतः एक भाविक मुसलमान होता, पण त्याला राजकारण आणि धर्मकारण, न्यायव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आणि शिक्षण आणि धर्मव्यवस्था ह्यांची सांगड खटकत होती. त्यानं सगळंच्या सगळं बदलून टाकायचा चंग बांधला. त्यानं सैन्यप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुका लढवल्या. घवघवीत यश मिळाल्यावर त्यानं सर्वप्रथम सगळ्या मदरशांच्या मान्यता रद्द केल्या. अरबी संस्कृतीचं उच्चाटन होण्यासाठी, तुर्की भाषेसाठी फोनेटिक लॅटिन लिपी दत्तक घेतली आणि जुनी अरेबिक लिपी रद्द करून टाकली. युरोपीय शिक्षणपद्धतीवर आधारित आधुनिक शिक्षणपद्धती आणण्याच्या दिशेनं संशोधन सुरू केलं. धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारून त्यानं राजकारणातून धर्म दूर केला. आणि इथेच न थांबता, इस्लामिक लॉ ची मान्यता काढून इतर युरोपीय कायद्यांवर आधारित न्यायव्यवस्थेचा त्यानं स्वीकार केला. त्याला सर्व धार्मिक संस्थांकडून टोकाचा विरोध झाला. पण त्याचा स्वच्छ उद्देश आणि खंबीरपणा ह्यामुळे तो लोकांमध्ये टिकून राहिला. त्याला प्रेमानं 'अतातुर्क' म्हटलं जातं. अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता.

थोडंच दूर आशियात, मो.क. गांधी नावाचा एक माणूस राष्ट्रीय चळवळीत मुसलमानांना सामील करण्यासाठी त्याच वेळी एक घातक चाल खेळला. त्यांनी 'खिलाफत' रद्द करण्याविरुद्ध भारतात चळवळ सुरू केली. तिकडे अतातुर्क सर्व मुसलमानांच्या भल्यासाठी 'खिलाफत' रद्द करत होता, तर इथे होणारा भारतीय 'राष्ट्रपिता' भारतातील मुसलमानांसकट सर्वांनाच दुहीकडे लोटणारी एक अर्थहीन 'खिलाफती'च्या रद्द होण्याविरोधात चळवळ उभारत होता.

अनेक वर्षं लोटली. अतातुर्क गेला आणि हळूहळू तुर्कस्तानात कट्टरता मूळ धरू लागली. अतातुर्कचा पक्ष सत्तेपासून दूर झाला आणि थोडा कट्टर पक्ष सत्तेत आला. त्यांनी हेडस्कार्फवरची बंदी उठवणे वगैरे प्रकार करून पाहिले, पण अतातुर्कचे संस्कार अजून बळकट होते. त्याच्या संस्कारात मुरलेलं सैन्य आणि न्यायव्यवस्था सरकारला पुरून उरत होते. अतातुर्क जात्याच सैन्यप्रमुख असल्यानं त्याच्या कारकीर्दीत सैन्याचे अधिकार जास्त होते आणि सैन्य त्याच्याच प्रभावाखाली राहिल्यानं कायम धर्मनिरपेक्ष राहिलं. अतातुर्कने आणलेली स्वतंत्र न्यायव्यवस्था काही बाबतींमध्ये राज्यव्यवस्थेपेक्षाही जास्त अधिकार राखून होती. आणि हे मुद्दे, आदर्श लोकशाहीच्या थोडे विरोधात जातात. नेमक्या ह्याच मुद्द्यांचा फायदा घेऊन, युरोपियन युनियनचा जयघोष करत कट्टर पक्षानं सरकारचे अधिकार वाढवणारी संविधानदुरूस्ती सार्वमतासाठी आणली आणि ती पासही झाली. आता, धर्मनिरपेक्ष सैन्याचे आणि न्यायव्यवस्थेचे पंख छाटले जाणार! त्यांच्या आधाराने असलेला अतातुर्कचा पक्षही थोडासा बॅकफूटवर गेलाय.

आणि धर्माच्या नावाने चळवळी उभ्या करून दुहीची बीजं रोवणार्‍या गांधींचा पक्ष मात्र भारतात अजूनही 'धर्मनिरपेक्ष' म्हणून टिमकी बडवत असतो.

पण विरोधाभास पहा. आज जो अतातुर्कच्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा नेता आहे. त्याच्या बोलण्याच्या आणि दिसण्याच्या पद्धतीमुळे त्याला तुर्कस्तानचा "गांधी" म्हणतात.

---अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.