Showing posts with label मिथुनिझम. Show all posts
Showing posts with label मिथुनिझम. Show all posts

9/09/2010

बर्न अ 'गुंडा' डे

आज सकाळी अचानकच एक मोठं पार्सल माझ्या नावाने आलं. मी विचारात पडलो. म्हटलं मला कुणी एव्हढं मोठं पार्सल पाठवेल असं नाहीये. कोण असेल बरं? काय असेल बरं? असे नेहमीचे विचार करतच मी पार्सल उघडलं. आतमध्ये जे काय होतं ते बघून मी विस्मयचकित झालो. त्यामध्ये 'गुंडा' ह्या सिनेमाच्या शंभर एक सीडी/डीव्हीडीज होत्या. सोबत एक बुकलेट होतं. त्या बुकलेटवर "बर्न अ 'गुंडा' डे" असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं. त्यामध्ये 'गुंडा'ची अक्षरं खालून थोडीशी काळपट रंगांची होती, त्यावर लालभडक आणि वर जळत असल्यामुळे ज्वाळा दाखवलेल्या होत्या. मी अचंभ्यात पडलो. माझ्या डोळ्यासमोर धडाधड भारतातले नेते यायला लागले. एक क्षण चिमणरावांचा भाऊ गुंड्याभाऊ पण डोळ्यासमोर तरळून गेला. मग एक बुकलेट उचलून पाहिलं. त्यात 'जो कर' ह्या संप्रदायाच्या लोकांनी '४ सप्टेंबर, २०१०' ज्यादिवशी "गुंडा" ह्या चित्रपटाला रिलीज होऊन एक तप पूर्ण होत होतं, त्या दिवसाला "बर्न अ 'गुंडा' डे" म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'गुंडा' सिनेमाच्या मिळतील तेव्हढ्या प्रती जाहीररित्या जाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. किमान एक तरी 'गुंडा' जाळा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं होतं.

आता मला महत्वाचा प्रश्न पडला. हे पार्सल मला पाठवण्याचा चावटपणा कुणी केला. होय, चावटपणाच. अहो मी 'बाबाईझम' किंवा अलम दुनिया ज्याला 'मिथुनिझम' म्हणून ओळखतात, त्या धर्माचा खंदा पुरस्कर्ता आहे. प्रेषित देखील होता ह्या धर्माचा, त्याला लोक 'बाबा' म्हणतात आदराने. त्यांच्या निर्वाणाला तीन दशके लोटलीत. काही भाविक त्यांना 'प्रेषित' मानतात, काही नुसताच सामान्य भक्त मानतात. पण त्यानं फारसा फरक पडत नाही. 'मिथुनिझम' मध्ये सर्वभक्तसमानता आहे. आमचा देव 'प्रभुजी मिथुनदा'. आमच्या देवापर्यंत पोचायला आमच्यात बडवे, मौलवी किंवा प्रीस्ट लागत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा. 'गुंडा'चा आणि 'मिथुनिझम'चा काय संबंध? तर मंडळी. 'गुंडा' हा 'मिथुनिझम'चा 'धर्मचित्रपट' आहे! होय, धर्मचित्रपट. हा जगातला एकमेव धर्म आहे, जिथे धर्मग्रंथ नाहीये. धर्मचित्रपट आहे. धर्माचा संदेश आम्हाला तिथूनच मिळतो. हा संदेश 'बाबां'पर्यंत पोचवणारा आमचा फरिश्ता म्हणजे दिग्दर्शक कांती शाह.

गुंडाचे मुख्यत्वेकरून चार भाग पडतात.

१. खलकांड - ह्यामध्ये सर्व खलपात्रांच्या ओळखी आणि त्यांचे आपापसातले संबंध ह्यांवर प्रकाश पडतो. प्रमुख खलनायकाचा (प्रमुख खलनायकाचं नाव मी लिहू शकत नाही, कारण ते मिथुनींना अ-मिथुनींसमोर बोलणं हराम आहे) काटा काढण्यासाठी एक 'कफनचोर नेता' दुसर्‍या नावाजलेल्या गुंडाला सुपारी देतो. मग सर्व खलपात्रांच्या ओळखीचा एक दीर्घ प्रसंग आहे, ज्यात काही अतिशय गाजलेल्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, "मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नहीं होते". ह्या प्रसंगातल्या अनेक ओव्या अ-मिथुनींसमोर वर्ज्य आहेत. त्यानंतर तो गुंड प्रमुख खलनायकाच्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करतो. त्यावर मुख्य खलनायक अतिशय दीर्घ, ह्रद्य असं एक स्वगत म्हणतो, "मुन्नी, मेरी बहन मुन्नी! तो तू मर गयी. तू कटा हुआ गुर्दा, याने के मुर्दा हो गयी! लंबू(दुसरा गुंड) ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया!" मला सांगा कुठल्या संवेदनशील माणसाला हे वाचून गलबलून येणार नाही? हे स्वगत हा गुंडाचा हायपॉईंट आहे. कारण इथे तो खलप्रवृत्तींची एक वेगळीच बाजू समोर आणतो. शेवटी खल देखील मानवच असतात असा एक मानवतावादी संदेशही ह्यातून जातो. अनेक खल मिथुनी पापक्षालनासाठी ह्या ओव्यांचं नित्य पठण करतात. असो. तर ह्यानंतर जेव्हा मुख्य खलपात्र लंबूला मारण्यासाठी घेराव घालतं, तेव्हा लंबूही एक दीर्घ संवाद म्हणतो. जो लिहिणं मला शक्य नाही. कारण, तो काही विशिष्ट परिस्थितींमध्येच उद्घृत करण्याचा सख्त अलिखित दंडक सारे मिथुनी मानतात. असे अनेक संवाद आहेत, जे अ-मिथुनींसमोर म्हणणं वर्ज्य आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! तर ह्या वधावेळी मुख्य खलपात्र 'हम दो नंबरके धंदे करनेवालोंकी बहू-बेटियों की जान और इज्जत का कोई भरोसा नहीं होता' असं एक अतिशय सखोल तत्वज्ञानपूर्ण वाक्य म्हणतं. ह्या एका प्रसंगात, किंबहुना ह्या वाक्यातच कित्येक वाममार्गाला लागलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे. ह्यानंतर लंबूवधाचा प्रसंग संपतो.

२. हमालकांड - ह्यामध्ये प्रभुजी हमाल म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करतात आणि त्याचबरोबर जगाला बंधुभाव आणि नागरिकशास्त्राचे धडेही देतात. ह्या कांडामध्ये प्रभुजींनी गुंडायुगात विमानतळ आणि गोदी अश्या दुहेरी कॉम्प्लेक्समधल्या हमालाचा अवतार घेतल्याचं स्पष्ट होतं. मग प्रभुजी विमानतळावर मुख्य खलपात्राच्या एका अनुयायाला गैरकृत्य करताना पकडतात आणि विमानतळापासून पार कोर्टापर्यंत पाठलाग करून पकडून देतात. आणि ह्याबद्दल बक्षिस मिळाल्यावर 'बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा' हा श्लोकही म्हणतात. ह्यानंतर प्रभुजी एका मुलीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असलेल्या म्हातार्‍या हमालाच्या मदतीसाठी मुख्य खलपात्राच्या पैलवानाला सहज चीत करून आपल्या निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अवतारकार्याची एक चुणूक दाखवतात. पण त्याचबरोबर सामान्य हमालांप्रमाणेच दारू पिऊन धिंगाणाही घालून दाखवतात.

३. अन्यायकांड - ह्यामध्ये प्रभुजींची बहिण आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रकारचे अन्याय केले जातात. प्रभुजींच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मुख्य खलपात्राचा भाऊ तिचा बलात्कार करून तिचा खून करतो. प्रभुजींचे वडिल जे पोलिसात हवालदार असतात, त्यांचा इन्स्पेक्टर बॉस त्यांच्यासमोर खुन्यांची मदत करतो. (पण प्रभुजींचे हवालदार वडिलही एकाच प्रसंगात मिश्या असलेले आणि नसलेले असे दिसून आपल्या दैवी अंशाचं दर्शन घडवतात, पण मर्त्य इन्स्पेक्टरला हा इशारा उमगत नाही आणि तो प्रभुजींच्या हातच्या अटळ मरणाच्या दिशेनं जातो.) ह्या दुर्घटनेनंतर प्रभुजी खलनायकांच्या घरी जातात, तो प्रसंग जर कुठल्या दा व्हिंची नं चितारला, तर 'लास्ट सपर' च्या तोडीचं पेंटिंग बनेल. प्रभुजी दरवाजात उभे आहेत आणि सर्व खलनायक समोरच बंगल्यातल्या जिन्यावर उभे आहेत. ह्याच प्रसंगात प्रभुजी आपल्या अवतारी असण्याचा प्रकट पुरावा देतात, जेव्हा ते सर्व खलपात्रांच्य 'मौत ची डेट' फिक्स करतात. आणि 'दो, चार, छे, आठ, दस...बस' ह्या मंत्राने तो प्रसंग संपतो.

४. धमालकांड - ह्यामध्ये प्रभुजींना आपलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी शस्त्र हातात उचलावी लागतात. आणि प्रभुजी सर्व खलपात्रांना एक एक करून संपवतात. ह्यामध्ये प्रभुजी एका खलनायकाचा वध करताना 'भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही, और यह तय है की तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही' ही ओवी म्हणतात (इथे लोक 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' चे संदर्भ शोधतात, शोधोत). प्रभुजींच्या शस्त्रांमध्ये बझूका लॉन्चरचाही समावेश आहे, जे प्रभुजी आपल्या लीलेनं एका यःकश्चित गाडीच्या डिकीतून घेऊन येतात. आणि हा लॉन्चर रिफील करावाच लागत नाही, तो आपोआप रिफील होत राहतो (इथे काही लोक द्रौपदीच्या न संपणार्‍या साडीचे रेफरन्स शोधतात, पण तो मूर्खपणा आहे कारण इथे द्रौपदीपण प्रभुजी आणि कृष्णपण.) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभुजी बच्चू भिगोना ह्या राजकीय नेत्याचा वध करण्यासाठी म्हणून अशक्य अंतरावरून रायफलने चालत्या गाडीवर नेम धरतात, तेव्हा दुसरंच खलपात्र बच्चू भिगोनाचा खून करतं, मात्र पोलिस प्रभुजींना पकडतात. ह्याउलट प्रभुजी त्यानंतर सर्व खलपात्रांना स्वतः संपवतात पण पोलिस काहीही करू शकत नाहीत. ह्यातून हा संदेश मिळतो, की 'बळी तो कान पिळी'. आणि शेवटी तर प्रभुजी मुख्य खलपात्राच्या अनौरस संततीला आपलं अपत्य म्हणून स्वीकारून जगाला एक वेगळाच मानवतेचा संदेश देतात.

तर असा धर्मचित्रपट लाभलेला हा खराखुरा आधुनिक धर्म म्हणता येईल. तर ह्या आमच्याच धर्माविरुद्ध रचलेलं हे कुभांड मलाच पाठवण्याचा उपद्व्याप माझ्या लक्षात आला नाही.

मग मला अजून एक गहन प्रश्न पडला. कारण पाचच दिवसांपूर्वी मी 'गुंडा दिवस' मोठ्या आनंदानं साजरा केला. त्यादिवशी सगळे 'मिथुनी' दिवसभर 'निर्जळी' कडकडीत उपवास करतात. आणि संध्याकाळी 'गुंडा' तल्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे (संदर्भ - हमालकांडातील प्रभुजींचे टल्ली होऊन असलेले गाणे. मूळ पंक्ति "क्यूं ये बर्फ पीता है व्हिस्की में डालके?") व्हिस्कीत टाकून बर्फ पिऊन उपवासाची सांगता करतात (नीट वाचा. व्हिस्कीत टाकून बर्फ पितात, बर्फ टाकून व्हिस्की पीत नाहीत.). सहसा मिथुनी हा सोहळा समूहात मिळून करतात. कुटुंबंच्या कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा साजरा करताना मी कित्येकदा पाहिली आहेत. एकदा उपवासाची ऑफिशियल सांगता झाली की मग सगळे एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा देतात. मग ज्या कुटुंबाचे सर्वाधिक सदस्य सहभागी असतील, त्या कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळतो आणि जेवणाच्या पंगतींना वाढण्याची जवाबदारीही. जेवण अगदी हॉटेलातलही चालतं. त्यावर कुठलीही आडकाठी 'मिथुनिझम' करत नाही. फक्त सहसा गोड्या पाण्यातल्या माशांचा समावेश त्या दिवशी जास्त असतो जेवणात. कारण प्रभुजींना 'गोड्या पाण्यातले मासे' फार आवडतात. पण शाकाहारी-मांसाहारी सर्वांसाठी सोय असते. त्यामुळे मोठ्या आनंदात जेवणं होतात. पुन्हा इथल्या जेवणाचा नियम आहे, जोवर खाणारा 'दो, चार, छे, आठ, दस... बस'(संदर्भ - अन्यायकांडामध्ये प्रभुजी त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर खलनायकांच्या घरी जाऊन ज्या ओव्या म्हणतात, त्यातली शेवटची ओवी) म्हणत नाही, तोवर वाढतच राहायचं. जेवणं उरकल्यावर मग 'गुंडा' चा एक सामुदायिक खेळ होतो. त्यानंतर एकदा प्रभुजींच्या नावाचा जयघोष करून सगळे मिथुनी समाधानानं आपापल्या घरी जातात. ह्यावर मला अनेकांनी विचारलं की स्वतः प्रभुजी कधी सहभागी होतात की नाही. मी म्हटलं, अरे अज्ञानी जीवांनो, 'देवाला कधी धर्म असतो का? धर्म आपण मर्त्य मानव बनवतो. सण आपण साजरे करतो, देवाच्या नावानं!'

तर मुद्दा होता की आज त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण होऊन पाच दिवस होत असताना मला हे पार्सल आलं कसं? आणि त्या पवित्र दिवशी आमच्या धर्मावर आलेल्या ह्या संकटाबद्दल मला काहीच कसं ठाऊक नव्हतं. मी लगेच ते पार्सल कुठून आलंय हे शोधायला सुरूवात केली. मग माझ्या लक्षात आलं की भारतातल्या अगदी मोजकी फॉलोईंग असलेल्या 'जो कर' ह्या संप्रदायाचा हे मला पाठवण्यात काहीही हात नाहीये. एक विलक्षणच गोष्ट होती. त्याचं झालं असं होतं.

'जो कर' हा अतिशय रद्दड आणि मूर्ख असे रोमॅन्टिक सिनेमे पाहणार्‍यांचा संप्रदाय होता. ते बहुधा 'श्श चुपरहा' आणि 'जोहर कर'(ह्याच्या नावावरूनच संप्रदाय सुरू झालाय) ह्या दिग्दर्शकांचेच सिनेमे पाहायचे. त्यांचा स्वतःचा आमच्यासारखा फुल फ्लेज धर्म नाहीये. ते स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करत होते. ह्याच त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या प्रसिद्ध पण विचित्र धर्माचा प्रसिद्धीसाठी वापर करून घ्यायचं ठरवलं. सूर्यावर थुंकून लोकप्रियता मिलवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणून ही अशी पार्सल बर्‍याच मध्यममार्गी लोकांना पाठवली. पण परिणाम उलटा झाला. आमच्या धर्मचित्रपटात असं आहे तरी काय? की ज्यामुळे इतका बवाल होतोय हे जाणण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी 'गुंडा' पाहिला. आणि उलट आमच्या धर्माची लोकप्रियता रातोरात वाढली. 'गुंडा' जळणं तर राहिलं दूर, उलट लोकांनी अनेक दिवस वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्स सगळीकडे फक्त आमच्याच 'मिथुनिझम'बद्दल लेख लिहिले, डॉक्युमेंट्रीज बनवल्या. ज्यामुळे 'जो कर' संप्रदायाचे वांधे झाले. त्यांनी अजून जोरात बोंबलायला सुरूवात केली. त्यांनी ४ सप्टेंबरला काही सीडीज जाळल्यादेखील, पण ते पहायला कुणीच गेलं नाही. उलट त्यादिवशी 'गुंडा दिवसा'ची सेलिब्रेशन्स मात्र सगळ्यांनीच अनुभवली.

त्या विचित्र दिवसामुळे 'मिथुनिझम'ची पताका सगळीकडे फडकली, पण 'जो कर' संप्रदाय मात्र अनुल्लेखानेच मारला गेला किंवा झालाच तर इतका बदनाम झाला की जवळपास नामशेषच झाला. कित्येक त्याच संप्रदायाच्या लोकांनी फुटून वेगळी चूल मांडली. आणि त्या फजितीमुळे त्यांनी तो दिवस विसरून जाणंच पसंत केलं. मिथुनींच्या तत्कालीन धुरिणांनी हा द्वेषपूर्ण दिवस विसरून जाण्याचं आवाहन मिथुनींना केलं त्यामुळे ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पानात हरवून गेली होती. पण हे एक त्याकाळचं पार्सल माझ्या आजोबांनी जपून ठेवलेलं होतं. ते त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाने मला पाठवण्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याने हे मला आलं होतं. पण तरी मला कळत नव्हतं, की त्या दिवसाचे सगळे पुरावे जर नष्ट झाले होते, तर आजोबांनी हे जपून का ठेवलं?

दुसर्‍या दिवशी सहज त्यातली एक गुंडा ची नसलेली डीव्हीडी माझ्या नजरेस पडली. ती मी उत्सुकतेपोटी लावली. आणि मला धक्काच बसला. त्यात माझ्या आजोबांचा माझ्यासाठी व्हिडिओ संदेश होता. त्याचा सारांश असा-

"मी प्रत्यक्ष 'बाबां'चा वंशज आहे. आणि आजच्या जगाला 'मिथुनिझम'च्या विजयाची किंवा त्यापेक्षा 'आक्रस्ताळेपणा'च्या पराभवाची ही विलक्षण कथा सांगण्यासाठीच माझी नेमणूक 'बाबां'नी केली होती."

सर्व मिथुनी आणि अ-मिथुनींना 'गुंडा दिवसा'च्या उशीरानेच शुभेच्छा!