Showing posts with label मिथुनदा. Show all posts
Showing posts with label मिथुनदा. Show all posts

9/26/2010

सांप्रतच्या हिंदी सिनेमातील चतुर्महाभूते आणि 'दबंग'

हिंदी सिनेमाचे - म्हणजे खराखुरा इथल्या मातीतला - प्रामुख्याने चार भाग पडतात.

१.राजा हरिश्चंद्र ते मुग़ल-ए-आज़म
२.मुग़ल-ए-आजम ते शोले
३.शोले ते गुंडा
४.गुंडा च्या पुढचे

वरील वर्गीकरण हे माझं स्वतःच्या निरीक्षणाचं अपत्य आहे. अनेकांना ह्यावर अनेक साक्षेपी आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे सुरूवातीला प्री-गुंडा आणि पोस्ट-गुंडा असे दोनच वर्ग मी करणार होतो. पण मग स्युडो-इंटलेक्च्युअल्स अर्थात दांभिक बुद्धिवाद्यांनी माझ्या प्रस्तुत लेखाकडे वाचनापूर्वीच पाठ फिरवली असती. मला आलमआरासुद्धा टाकायचा होता पण मग अति झालं असतं. म्हणून मग मांडवलीमध्ये मी चार कालखंड केले. नीट बघितलं तर प्री-गुंडा आणि पोस्ट गुंडा हे वर्ग योग्य ठरतात, पण ते सिनेमाच्या एकंदर जडणघडणीच्या दृष्टीने. आज मला सिनेमाच्या अंगभूत घटकांबद्दल ऊहापोह करायचाय, त्यामुळे वरील वर्गीकरण त्यादृष्टीने करण्यात आलेलं आहे.
रंगांबद्दल कदाचित ठाऊक असेल. लाल, पिवळा आणि निळा हे एका थिअरीनुसार तीन मूळ रंग आहेत. बाकी सगळे रंग ह्या तीन आणि ह्या तिघांपासून बनलेल्या रंगांची वेगवेगळी संगती मिसळून बनवता येतात. तर ह्या वैज्ञानिक सिद्धांताशीच मिळतंजुळतं एक स्फोटक विधान मी करणार आहे.

"आजच्या तारखेला बनणारा कुठलाही हिंदी सिनेमा 'राजा हरिश्चंद्र', 'मुग़ल-ए-आज़म', 'शोले' आणि 'गुंडा' ह्या चार मूळ आणि ह्या चौघांपासून बनलेल्या सिनेमांची वेगवेगळी संगती मिसळून बनवला जातो."

संपलं विधान! आता स्पष्टीकरण.
राजा हरिश्चंद्र हे भारतीयत्वाचं आद्य प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कारांचं सर्वोच्च उदाहरण. चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांनी बनवलेली ही कलाकृती म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे एका अर्थी भारतीय सिनेमाचा गोत्रपुरूष. तत्कालीन भारतीय मानसिकतेची नस अचूक पकडून त्यांनी जशी चित्रनिर्मिती केली त्याला तोड नाही. आणि तत्कालीन भारतीय मानसिकता आजही मुळाशी तशीच आहे. त्यामुळे हा एक मूलभूत घटक अर्थात महाभूत मानला गेलाय.
मुग़ल-ए-आज़म हा प्रेमकथात्मक भारतीय सिनेमामधला मैलाचा दगड आहे. पराकोटीचं प्रेम आणि पराकोटीची कर्तव्यबद्धता त्यावर पराकोटीचा खर्च असं एक वेगळंच रसायन म्हणजे मुग़ल-ए-आज़म. 'लार्जर दॅन लाईफ' असा गरीब मुलगी व श्रीमंत मुलाचा रोमान्स आणि त्या रोमान्सपायी पार शहेनशाहशी बगावत हे सगळे मसाले तत्कालीन भारतीय सिनेमाला एका वेगळ्या वाटेवर नेण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे हादेखील एक महाभूत मानला गेलाय.
शोले बद्दल मी खरंतर बोलण्याचीच गरज नाही. मुळात शोले हा काही परकीय सिनेमांवरून प्रेरित असल्याचं जरी म्हटलं गेलं असलं आणि प्रथमदर्शनी ते खरंही वाटत असलं, तरी शोलेमध्ये (असलीच तर) मूळ कलाकृतीचं जे काही भारतीयीकरण केलं गेलंय, त्याला तोड नाही. शोलेतला एक एक संवाद आणि एक एक सीन आजही भारतीय मानसामध्ये बसलाय आणि त्यामुळेच त्याच्याशी जवळिक करणारं काहीही उचलून धरलं जातं. शोलेनं भारतीय सिनेमाला अजून एक वेगळी वाट दाखवली आणि ती खूप बहुपेडी होती. म्हणूनच शोलेदेखील एक महाभूत मानला गेलाय.
आता चौथं महाभूत 'गुंडा'. होय. गुंडानं भारतीय सिनेमाला अजून एका नव्याच वाटेवर नेलं. तत्कालीन भारतीय सामाजिक स्थिती आणि स्थित्यंतरं तसंच ह्या स्थित्यंतरामुळे थोडीफार गोंधळलेली सामाजिक मानसिकता ह्यांवर परखड भाष्य करत प्रसंगी अतिशय खालच्या पातळीवर जात लिहिलेले मनोरंजनही करणारे संवाद आणि अत्यंत 'ऍब्स्ट्रॅक्ट' एडिटिंग तसेच कमी निर्मितीमूल्यामध्ये फारच थेट पद्धतीचं आणि नायकाचं मसीहा प्रमाणे केलं गेलेलं चित्रिकरण अशा वेगळ्याच वाटेवरून गुंडाचा प्रवास होतो. ही वाट पूर्वीही अनेक सिनेमांनी चोखाळली होती पण 'गुंडा'चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व दोन गोष्टींमुळे अधोरेखित होतं. एक म्हणजे 'गुंडा' ही 'त्या' विशिष्ट वाटेवरची निर्विवाद सर्वोच्च कलाकृती आहे. आणि दोन म्हणजे, 'त्या' वाटेला गुंडाने प्रदर्शनाच्या अनेक वर्षांनंतर राजमान्यता मिळवून दिली. ती दुय्यम म्हणून अभिजनांकडून नाकं मुरडली गेलेली वाट 'मुख्य प्रवाहा'त आणण्याचं श्रेय फक्त आणि फक्त गुंडाला जातं. त्यामुळेच गुंडाला चौथं किंवा चतुर्थ महाभूत म्हणून मी मानलंय.
तर ही झाली भारतीय सिनेमाची 'चतुर्महाभूते'. आजच्या भारतीय सिनेमाला उलटं पालटं करून कसंही पहा, ह्या चौघांपासूनच तो बनलेला असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कुठलंही उदाहरण घ्या. अगदी 'हम आपके है कौन?' पासून सुरूवात करूया. 'राजा हरिश्चंद्र' ह्या कलाकृतीचं स्पष्ट प्रतिबिंब पडलेलं तुम्हाला दिसेल. त्यातला तळ्याकाठचा रोमान्स वगैरे पाहता 'मुग़ल-ए-आज़म' ही थोडाफार डोकावतो. बाकी कालानुरूप आलेली चकचकाटी निर्मितीमूल्य वगैरे वर्खं आहेत. अस्सल माल हा उपरोल्लेखित दोन महाभूतांपासूनच बनलेला आहे. (टीप - 'हम आपके हैं कौन?' बनेपर्यंत 'गुंडा' प्रदर्शित झाला नव्हता, नाहीतर 'गुंडा' चे निशान देखील दिसले असते.)
शोले ह्या महाभूतापासून बनलेले शेकड्याने सिनेमे असतील, त्यातले कित्येक तर सुपरहिटही ठरले, पण त्यातलं घटक महाभूत तर दिसतच. त्याचबरोबर 'आयटम सॉन्ग' ही देखील शोलेनं भारतीय सिनेमाला दिलेली (माझ्या मते) देणगी आहे. 'मेहबूबा मेहबूबा' ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशाने कित्येक सिनेमांमध्ये व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग घातलं गेलं असेल ह्याला गणतीच नाही. आणि हल्ली तर कुठेही आयटम सॉन्ग घालता येतं.
यश चोप्रा आणि करण जोहर ह्या द्वयीनं मात्र 'मुग़ल-ए-आज़म' च्या गायीचंच दूध काढायचं ठरवलं. त्यांच्या सर्व कलाकृती 'श्रीमंत बापाचा प्रेम सोडून आयुष्यात कसलीही विवंचना नसलेला मुलगा, प्रेमभंग किंवा प्रेम ह्या दुःखांपलीकडे काहीच दुःख नसलेलं एक जग ज्यामध्ये सगळेजण प्रचंड श्रीमंत असतात, प्रत्येकाला नातेवाईक असतात, नात्यांची जाम काळजी असते, महालांमध्ये राहतात आणि सारखे रडतात' ह्या तत्वांपासून बनतात. त्यामुळे त्यांचे बहुतांश सिनेमे हे 'मुग़ल-ए-आज़म' ह्या महाभूतापासून बनल्याचं स्पष्ट होतं. बाकी, राजा हरिश्चंद्र चं प्रतिबिंबही कुटुंबाच्या एकमेकांशी चाललेल्या वागणुकीवरून स्पष्ट दिसतं. शोले आणि गुंडा मात्र अभावानेच त्यांच्या सिनेमांमध्ये दिसून येतात. कारण ही दोन महाभूतं सर्वाधिक अवघड अशी आहेत.
पण पोस्ट गुंडा इरामध्ये मात्र सुरूवातीच्या कालावधीमध्ये बाकी तीन महाभूतांनीच धुमाकूळ माजवला होता. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'गुंडा' ची वाट ही अभिजनांनी नाकं मुरडलेली वाट होती. पण म्हणतात ना, खरं सोनं काळाच्या कसोटीवर नेहमीच जिंकतं. तद्वतच पूर्णपणे दाबून टाकलेलं असून देखील गुंडानं व्हिसीडी आणि इंटरनेटच्या मार्फत जनमनामध्ये चंचुप्रवेश केला. हळूहळू गुंडाबद्दलची जागृती एव्हढी झाली की लोकांना सिनेमात काही ठिकाणी सूचकपणे पेरलेले गुंडाचे रेफरन्स कळू लागले. मग गुंडाची वाट आधीच लोकमान्य झालेली असल्याने अल्पावधीतच राजमान्य झाली आणि त्याला 'सिनेमा ऑफ योअर' असं गोंडस नाव देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची मखलाशी केली गेली. पण आमच्यासारख्या हाडाच्या सिनेरसिकांना 'सिनेमा ऑफ योअर' म्हणजेच गुंडा हे लगेच लक्षात येतं.
पोस्ट गुंडा इरामध्ये 'गुंडा' ची काही वैशिष्ट्य पेरलेले अनेक सुपरहिट सिनेमे आले. जसं चित्रविचित्र वेशभूषा केलेले विनोदी खलनायक, मसीहा आणि पराकोटीचा अन्यायग्रस्त नायक संपूर्ण खलनायकी टोळीला एकहाती नेस्तनाबूत करणारा नायक, यमकामध्ये किंवा कवितांमध्ये किंवा वनलायनर्स मध्ये बोलणारा खलनायक, नायकाने खलनायकाच्या मृत्यूची तारीख (मौत की डेट) फिक्स करणे ही सगळी गुंडाचीच वैशिष्ट्य आहेत आणि ही वैशिष्ट्य लेवून अनेक सुपरहिट सिनेमे आले पण नजीकच्या काळात आऊट ऍन्ड आऊट गुंडा ज्यॉनरवाल्या सिनेमांची लाट आली. उदा. 'गज़नी', 'वॉन्टेड' आणि 'दबंग'.
चतुर्महाभूतांवर मला प्रत्येकी एक पोस्ट ह्या पद्धतीने विस्तृत चर्चा करावी लागेल, त्यामुळे चतुर्महाभूतांबद्दल तूर्तास इतकंच. पुढच्या लेखासाठी पुरेशी पूर्वतयारी झालेली आहे.

तर काल मी दबंग पाहिल्यामुळे आज आपण दबंगची चिरफाड करू. सर्वप्रथम - मला 'दबंग' प्रचंड प्रचंड आवडला. होय, 'वॉन्टेड' नंतर कित्येक दिवसांनी मूलतः 'गुंडा' वर आधारलेला चित्रपट पाहिल्याने असेल, पण जाम जाम मजा आली. मला कशी कुणास ठाऊक पण प्रचंड लवचिकपणे सिनेमा पाहण्याची हातोटी जन्मजात मिळालीय. त्यामुळे मी चित्रपटाच्या ज्यॉनरनुसार आपोआपच चष्मा बदलून सिनेमा पाहतो, त्यामुळे 'डेकालॉग' असो वा 'चांदनी चौक टू चायना' (होय मी हादेखील एन्जॉय केला होता) मला कंटाळा वगैरे प्रकार सहसा येत नाही. आणि 'दबंग' तर प्रत्यक्ष धर्मचित्रपटाशी साधर्म्य सांगतोय अशी हवा असल्याने मी चित्रपट सुरू व्हायच्या आधीच योग्य चष्मा लावून तयार होतो.
पण मजा इथेही झालीच. जेव्हा एखादा सिनेमा मला एकाच वेळी एकाहून जास्त चष्मे लावायला मजबूर करतो, तेव्हा मला तो सिनेमा जास्त आवडतो. 'दबंग'चं तसंच आहे. तो 'गुंडा' प्रमाणेच विसंगत आविर्भाव आणून अनेक ठिकाणी व्यवस्थेला शालजोडीतले लगावत पुढे सरकतो. 'सरकारतर्फे जखमी पोलिसांना ५०००० आणि मेलेल्यांना १ लाख' हा प्रसंग असू दे किंवा 'मोटे वाले उस तरफ, पतले वाले इस तरफ और फिट वाले मेरे पीछे' म्हणून मागे वळून जेव्हा नायक पाहतो, तेव्हा मागे कुणीच नसल्याचं पाहून तो म्हणतो 'क्या हो गया है पुलिस फोर्स को!' किंवा 'वो डकैत हमारे फंडरेजर थे और उन्होने रेज किया हुआ फंड आप ले गये' हा प्रसंग असू दे. त्यानंतर पोलिओ झालेल्या माणसाला 'बचपन में दो बूंद नहीं पिलायी क्या?' अशा संदेशपर प्रसंगात 'बाप को शराब पीनेसे फुरसत नहीं मिली' असं सणसणीत आणि विचित्रपणे दाहक ब्लॅक कॉमेडी स्टाईल उत्तर अशा विविध छोट्या छोट्या वरवर विसंगत वाटणार्‍या पण साथीनेच प्रचंड मनोरंजन करणार्‍या प्रसंगांतून दबंग पुढे सरकतो.
'वॉन्टेड' प्रमाणेच तोंडात बसतील असे डायलॉग्ज हे 'गुंडा' वरून घेतलेलं वैशिष्ट्य.
"१०१ कमिनों की बलि चढाई थी हमारे मां-बाप ने तब जाके हम पैदा हुए थे।" मुख्य खलनायक.
"हम उन्ही १०१ कमिनों के भगवान हैं, बदला लेने के लिये आये हैं।" नायक.

"जंगल में रहके सेर से बैर! देखो भैया हम आदमी थोडे जटिल किस्म के हैं।" मुख्य खलनायक.
"जंगल में शेर कम और शिकारी ज्यादा हो गये हैं, ज्यादा ज़ोर से दहाडना नहीं, वरना चमडी भी उधड सकती है!" नायक.

असले एक से एक गुंडा स्टाईल डायलॉग्ज. त्यात मुख्य खलपात्राचं नाव 'छेदी सिंग' हे 'गुंडा'तल्या मुख्य खलपात्राच्या नावावरूनच प्रेरित झाल्यागत वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे 'गुंडा' प्रमाणेच मुख्य खलपात्र इथेही नायकाच्या जवळपास संपूर्ण कुटुंबाच्या विविध प्रकारे छळाला कारणीभूत होतो. 'गुंडा'त नायकाच्या बहिणीचा वापर होतो, इथे भावाचा. 'लंबा करणे' हा वाक्प्रचार, जो की गुंडामुळे प्रसिद्ध झाला, त्याचाही कौशल्यपूर्वक कथानकामध्ये वापर करण्यात आलाय. एकट्याच धावणार्‍या नायकावर काटकोनात होत असलेला गोळीबार लगेच 'गुंडा'तला सीन डोळ्यापुढे आणतो. शेवटाकडे जेव्हा नायक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन खलनायकाकडे पोचतो, तेव्हा गुंडातल्या ऍबॅसेडर्सचा आणि शेवटाकडला रिक्षाचा सीन तडक डोळ्यासमोर येतो. आणि गुंडाप्रमाणेच एव्हढं सगळं असूनही शेवटी खलनायकाबरोबर नायक वन ऑन वन फाईट करतो. पण खलनायकाचा शेवट मात्र वेगळा घेतलाय. तो मात्र 'गुंडा' तल्याच खलपात्राच्या भावाच्या खुनाप्रमाणे 'काव्यात्म न्याय' दर्शवणारा आहे.
बाकी, सलमानच्या पात्राची बिनधास्त दबंगाई आणि काय वाटेल ते करण्याची स्टाईल खरंच प्रभुजी मिथुनदांची आठवण करून देते. सलमाननं 'चुलबुल पांडे' पेललायही जबरा. एकीकडे तो दिसेल त्या खलपात्राला आणि मधे तर भावालासुद्धा हवा तसा फिरवून उडवून ठोकतो. कुठूनही कुठेही उड्या मारतो, गोळ्या घालतो. आणि त्याचबरोबर त्याचं भावाला ठोकताना गॉगलमागचं डोळे पुसणं, आई दगावल्याचं लक्षात आल्यावर दबंगाईच्या बुरख्यामुळे नीट रडताही न येणं आणि बापासमोर आपल्या दबंगाईचं खरं स्वरूप सांगताना हलकेच डोळ्यातून पाणी काढणं अशा प्रसंगांमुळे सिनेमाला बॅलन्स मिळतो. काही ऍक्शन सिक्वेन्सेस, 'मुन्नी बदनाम हुई' हे व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग, प्रेमामुळे बदलणारा नायक आणि यूपीचा बॅकड्रॉप हे 'शोले' ह्या महाभूतावरून घेतलेले प्रकार आहेत. स्वप्नवत रोमान्स, गरीब मुलगी हे 'मुग़ल-ए-आजम' वरून तर कुटुंब आणि नीतीमूल्य हे प्रकार 'राजा हरिश्चंद्र'वरून. एकंदरच 'दबंग' हे योग्य मिश्रण आहे.
त्यातही दिग्दर्शक अभिनवसिंग कश्यप (मी ऐकल्याप्रमाणे हा 'अनुराग कश्यप' चा धाकटा भाऊ आहे) काही ठिकाणी आपल्यावरचा टॅरँटिनोचा प्रभाव दाखवतो. वेगवेगळ्या ठिकाणी मारामारी करताना मधेच सलमानच्याच लोकप्रिय गाण्यांचे रिंगटोन्स व्हिलनच्या मोबाईलवर वाजू लागतात (इथे एक चूक आहे, सलमान ह्याला 'कॉलरट्यून' म्हणतो, जे माझ्या मते चूक आहे) आणि सलमान नाचता नाचता मारामारी सुरू करतो. पुन्हा लग्नाच्या वेळी बँडवाले 'अनुराग कश्यप'च्या सिनेमातलं गाणं वाजवतात. सिनेमाभर सलमान असताना 'काऊबॉय' सिनेमांच्या पद्धतीचं पार्श्वसंगीत वाजतं. सलमान स्वतःला रॉबिन हूड म्हणतो. अशा प्रकारे टॅरँटिनो स्टाईल इन-रेफरन्सिंग बरोबरच, सलमानची भ्रष्ट पोलिसांची टोळी आणि सलमान आपापसात जसं बोलतात (म्हणजे गंभीर विषयांवर एकदम कॅज्युअली), ते थोडंफार टॅरँटिनोच्या 'पल्प फिक्शन' वरून प्रेरित वाटतं. असो कदाचित मी अति सूक्ष्म निरीक्षणात शिरतोय.
अर्थात दबंगमध्येही अनेक सुटलेल्या जागा आहेत. पण सिनेमाचं विचित्र ज्यॉनर अशा गोष्टींना माफ करतं. अप्रतिम काम करणारा खलनायक सोनू सूद आणि सुंदर दिसणारी(थोडाफार अभिनय देखील करणारी) नायिका सोनाक्षी सिन्हा हे सिनेमाचे उर्वरित चांगले भाग. बाकी सिनेमात फक्त आणि फक्त सलमान आहे. 'गुंडा' प्रमाणेच नायकाचे नातेवाईक (विनोद खन्ना, डिंपल कपाडिया आणि अरबाज़ खान) हे फक्त खलनायकाशी वैयक्तिक शत्रुत्व निर्माण करण्यासाठीच सिनेमात आहेत.
एकंदर जवळपास ६०% गुंडा एलिमेन्ट असणारा 'दबंग' एकदातरी प्रत्येक सामान्य सिनेरसिकाने आणि 'गुंडा'ने भारतीय सिनेमा आणि सिनेरसिकांच्या आवडीनिवडींवर केलेले दूरगामी परिणाम पाहण्यासाठी सिनेअभ्यासकांनी पहायलाच हवा.
माझ्या मते ज्याप्रमाणे दारूच्या बाटलीवर ज्या पद्धतीनं किती टक्के अल्कोहोल आहे हे लिहिलेलं असतं, त्यापद्धतीनं प्रत्येक सिनेमाच्या पोस्टरवर किती टक्के 'गुंडा' आहे ते लिहायला हवं. जेणेकरून प्रेक्षकांना 'चष्मा' लावायला सोयीचं जाईल. आणि मी फक्त 'गुंडा' हे महाभूत एव्हढ्याचसाठी म्हणतोय कारण तेच सगळ्यांत 'स्ट्राँग' महाभूत आहे.

9/09/2010

बर्न अ 'गुंडा' डे

आज सकाळी अचानकच एक मोठं पार्सल माझ्या नावाने आलं. मी विचारात पडलो. म्हटलं मला कुणी एव्हढं मोठं पार्सल पाठवेल असं नाहीये. कोण असेल बरं? काय असेल बरं? असे नेहमीचे विचार करतच मी पार्सल उघडलं. आतमध्ये जे काय होतं ते बघून मी विस्मयचकित झालो. त्यामध्ये 'गुंडा' ह्या सिनेमाच्या शंभर एक सीडी/डीव्हीडीज होत्या. सोबत एक बुकलेट होतं. त्या बुकलेटवर "बर्न अ 'गुंडा' डे" असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं. त्यामध्ये 'गुंडा'ची अक्षरं खालून थोडीशी काळपट रंगांची होती, त्यावर लालभडक आणि वर जळत असल्यामुळे ज्वाळा दाखवलेल्या होत्या. मी अचंभ्यात पडलो. माझ्या डोळ्यासमोर धडाधड भारतातले नेते यायला लागले. एक क्षण चिमणरावांचा भाऊ गुंड्याभाऊ पण डोळ्यासमोर तरळून गेला. मग एक बुकलेट उचलून पाहिलं. त्यात 'जो कर' ह्या संप्रदायाच्या लोकांनी '४ सप्टेंबर, २०१०' ज्यादिवशी "गुंडा" ह्या चित्रपटाला रिलीज होऊन एक तप पूर्ण होत होतं, त्या दिवसाला "बर्न अ 'गुंडा' डे" म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'गुंडा' सिनेमाच्या मिळतील तेव्हढ्या प्रती जाहीररित्या जाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. किमान एक तरी 'गुंडा' जाळा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं होतं.

आता मला महत्वाचा प्रश्न पडला. हे पार्सल मला पाठवण्याचा चावटपणा कुणी केला. होय, चावटपणाच. अहो मी 'बाबाईझम' किंवा अलम दुनिया ज्याला 'मिथुनिझम' म्हणून ओळखतात, त्या धर्माचा खंदा पुरस्कर्ता आहे. प्रेषित देखील होता ह्या धर्माचा, त्याला लोक 'बाबा' म्हणतात आदराने. त्यांच्या निर्वाणाला तीन दशके लोटलीत. काही भाविक त्यांना 'प्रेषित' मानतात, काही नुसताच सामान्य भक्त मानतात. पण त्यानं फारसा फरक पडत नाही. 'मिथुनिझम' मध्ये सर्वभक्तसमानता आहे. आमचा देव 'प्रभुजी मिथुनदा'. आमच्या देवापर्यंत पोचायला आमच्यात बडवे, मौलवी किंवा प्रीस्ट लागत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा. 'गुंडा'चा आणि 'मिथुनिझम'चा काय संबंध? तर मंडळी. 'गुंडा' हा 'मिथुनिझम'चा 'धर्मचित्रपट' आहे! होय, धर्मचित्रपट. हा जगातला एकमेव धर्म आहे, जिथे धर्मग्रंथ नाहीये. धर्मचित्रपट आहे. धर्माचा संदेश आम्हाला तिथूनच मिळतो. हा संदेश 'बाबां'पर्यंत पोचवणारा आमचा फरिश्ता म्हणजे दिग्दर्शक कांती शाह.

गुंडाचे मुख्यत्वेकरून चार भाग पडतात.

१. खलकांड - ह्यामध्ये सर्व खलपात्रांच्या ओळखी आणि त्यांचे आपापसातले संबंध ह्यांवर प्रकाश पडतो. प्रमुख खलनायकाचा (प्रमुख खलनायकाचं नाव मी लिहू शकत नाही, कारण ते मिथुनींना अ-मिथुनींसमोर बोलणं हराम आहे) काटा काढण्यासाठी एक 'कफनचोर नेता' दुसर्‍या नावाजलेल्या गुंडाला सुपारी देतो. मग सर्व खलपात्रांच्या ओळखीचा एक दीर्घ प्रसंग आहे, ज्यात काही अतिशय गाजलेल्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, "मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नहीं होते". ह्या प्रसंगातल्या अनेक ओव्या अ-मिथुनींसमोर वर्ज्य आहेत. त्यानंतर तो गुंड प्रमुख खलनायकाच्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करतो. त्यावर मुख्य खलनायक अतिशय दीर्घ, ह्रद्य असं एक स्वगत म्हणतो, "मुन्नी, मेरी बहन मुन्नी! तो तू मर गयी. तू कटा हुआ गुर्दा, याने के मुर्दा हो गयी! लंबू(दुसरा गुंड) ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया!" मला सांगा कुठल्या संवेदनशील माणसाला हे वाचून गलबलून येणार नाही? हे स्वगत हा गुंडाचा हायपॉईंट आहे. कारण इथे तो खलप्रवृत्तींची एक वेगळीच बाजू समोर आणतो. शेवटी खल देखील मानवच असतात असा एक मानवतावादी संदेशही ह्यातून जातो. अनेक खल मिथुनी पापक्षालनासाठी ह्या ओव्यांचं नित्य पठण करतात. असो. तर ह्यानंतर जेव्हा मुख्य खलपात्र लंबूला मारण्यासाठी घेराव घालतं, तेव्हा लंबूही एक दीर्घ संवाद म्हणतो. जो लिहिणं मला शक्य नाही. कारण, तो काही विशिष्ट परिस्थितींमध्येच उद्घृत करण्याचा सख्त अलिखित दंडक सारे मिथुनी मानतात. असे अनेक संवाद आहेत, जे अ-मिथुनींसमोर म्हणणं वर्ज्य आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! तर ह्या वधावेळी मुख्य खलपात्र 'हम दो नंबरके धंदे करनेवालोंकी बहू-बेटियों की जान और इज्जत का कोई भरोसा नहीं होता' असं एक अतिशय सखोल तत्वज्ञानपूर्ण वाक्य म्हणतं. ह्या एका प्रसंगात, किंबहुना ह्या वाक्यातच कित्येक वाममार्गाला लागलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे. ह्यानंतर लंबूवधाचा प्रसंग संपतो.

२. हमालकांड - ह्यामध्ये प्रभुजी हमाल म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करतात आणि त्याचबरोबर जगाला बंधुभाव आणि नागरिकशास्त्राचे धडेही देतात. ह्या कांडामध्ये प्रभुजींनी गुंडायुगात विमानतळ आणि गोदी अश्या दुहेरी कॉम्प्लेक्समधल्या हमालाचा अवतार घेतल्याचं स्पष्ट होतं. मग प्रभुजी विमानतळावर मुख्य खलपात्राच्या एका अनुयायाला गैरकृत्य करताना पकडतात आणि विमानतळापासून पार कोर्टापर्यंत पाठलाग करून पकडून देतात. आणि ह्याबद्दल बक्षिस मिळाल्यावर 'बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा' हा श्लोकही म्हणतात. ह्यानंतर प्रभुजी एका मुलीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असलेल्या म्हातार्‍या हमालाच्या मदतीसाठी मुख्य खलपात्राच्या पैलवानाला सहज चीत करून आपल्या निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अवतारकार्याची एक चुणूक दाखवतात. पण त्याचबरोबर सामान्य हमालांप्रमाणेच दारू पिऊन धिंगाणाही घालून दाखवतात.

३. अन्यायकांड - ह्यामध्ये प्रभुजींची बहिण आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रकारचे अन्याय केले जातात. प्रभुजींच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मुख्य खलपात्राचा भाऊ तिचा बलात्कार करून तिचा खून करतो. प्रभुजींचे वडिल जे पोलिसात हवालदार असतात, त्यांचा इन्स्पेक्टर बॉस त्यांच्यासमोर खुन्यांची मदत करतो. (पण प्रभुजींचे हवालदार वडिलही एकाच प्रसंगात मिश्या असलेले आणि नसलेले असे दिसून आपल्या दैवी अंशाचं दर्शन घडवतात, पण मर्त्य इन्स्पेक्टरला हा इशारा उमगत नाही आणि तो प्रभुजींच्या हातच्या अटळ मरणाच्या दिशेनं जातो.) ह्या दुर्घटनेनंतर प्रभुजी खलनायकांच्या घरी जातात, तो प्रसंग जर कुठल्या दा व्हिंची नं चितारला, तर 'लास्ट सपर' च्या तोडीचं पेंटिंग बनेल. प्रभुजी दरवाजात उभे आहेत आणि सर्व खलनायक समोरच बंगल्यातल्या जिन्यावर उभे आहेत. ह्याच प्रसंगात प्रभुजी आपल्या अवतारी असण्याचा प्रकट पुरावा देतात, जेव्हा ते सर्व खलपात्रांच्य 'मौत ची डेट' फिक्स करतात. आणि 'दो, चार, छे, आठ, दस...बस' ह्या मंत्राने तो प्रसंग संपतो.

४. धमालकांड - ह्यामध्ये प्रभुजींना आपलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी शस्त्र हातात उचलावी लागतात. आणि प्रभुजी सर्व खलपात्रांना एक एक करून संपवतात. ह्यामध्ये प्रभुजी एका खलनायकाचा वध करताना 'भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही, और यह तय है की तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही' ही ओवी म्हणतात (इथे लोक 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' चे संदर्भ शोधतात, शोधोत). प्रभुजींच्या शस्त्रांमध्ये बझूका लॉन्चरचाही समावेश आहे, जे प्रभुजी आपल्या लीलेनं एका यःकश्चित गाडीच्या डिकीतून घेऊन येतात. आणि हा लॉन्चर रिफील करावाच लागत नाही, तो आपोआप रिफील होत राहतो (इथे काही लोक द्रौपदीच्या न संपणार्‍या साडीचे रेफरन्स शोधतात, पण तो मूर्खपणा आहे कारण इथे द्रौपदीपण प्रभुजी आणि कृष्णपण.) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभुजी बच्चू भिगोना ह्या राजकीय नेत्याचा वध करण्यासाठी म्हणून अशक्य अंतरावरून रायफलने चालत्या गाडीवर नेम धरतात, तेव्हा दुसरंच खलपात्र बच्चू भिगोनाचा खून करतं, मात्र पोलिस प्रभुजींना पकडतात. ह्याउलट प्रभुजी त्यानंतर सर्व खलपात्रांना स्वतः संपवतात पण पोलिस काहीही करू शकत नाहीत. ह्यातून हा संदेश मिळतो, की 'बळी तो कान पिळी'. आणि शेवटी तर प्रभुजी मुख्य खलपात्राच्या अनौरस संततीला आपलं अपत्य म्हणून स्वीकारून जगाला एक वेगळाच मानवतेचा संदेश देतात.

तर असा धर्मचित्रपट लाभलेला हा खराखुरा आधुनिक धर्म म्हणता येईल. तर ह्या आमच्याच धर्माविरुद्ध रचलेलं हे कुभांड मलाच पाठवण्याचा उपद्व्याप माझ्या लक्षात आला नाही.

मग मला अजून एक गहन प्रश्न पडला. कारण पाचच दिवसांपूर्वी मी 'गुंडा दिवस' मोठ्या आनंदानं साजरा केला. त्यादिवशी सगळे 'मिथुनी' दिवसभर 'निर्जळी' कडकडीत उपवास करतात. आणि संध्याकाळी 'गुंडा' तल्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे (संदर्भ - हमालकांडातील प्रभुजींचे टल्ली होऊन असलेले गाणे. मूळ पंक्ति "क्यूं ये बर्फ पीता है व्हिस्की में डालके?") व्हिस्कीत टाकून बर्फ पिऊन उपवासाची सांगता करतात (नीट वाचा. व्हिस्कीत टाकून बर्फ पितात, बर्फ टाकून व्हिस्की पीत नाहीत.). सहसा मिथुनी हा सोहळा समूहात मिळून करतात. कुटुंबंच्या कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा साजरा करताना मी कित्येकदा पाहिली आहेत. एकदा उपवासाची ऑफिशियल सांगता झाली की मग सगळे एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा देतात. मग ज्या कुटुंबाचे सर्वाधिक सदस्य सहभागी असतील, त्या कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळतो आणि जेवणाच्या पंगतींना वाढण्याची जवाबदारीही. जेवण अगदी हॉटेलातलही चालतं. त्यावर कुठलीही आडकाठी 'मिथुनिझम' करत नाही. फक्त सहसा गोड्या पाण्यातल्या माशांचा समावेश त्या दिवशी जास्त असतो जेवणात. कारण प्रभुजींना 'गोड्या पाण्यातले मासे' फार आवडतात. पण शाकाहारी-मांसाहारी सर्वांसाठी सोय असते. त्यामुळे मोठ्या आनंदात जेवणं होतात. पुन्हा इथल्या जेवणाचा नियम आहे, जोवर खाणारा 'दो, चार, छे, आठ, दस... बस'(संदर्भ - अन्यायकांडामध्ये प्रभुजी त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर खलनायकांच्या घरी जाऊन ज्या ओव्या म्हणतात, त्यातली शेवटची ओवी) म्हणत नाही, तोवर वाढतच राहायचं. जेवणं उरकल्यावर मग 'गुंडा' चा एक सामुदायिक खेळ होतो. त्यानंतर एकदा प्रभुजींच्या नावाचा जयघोष करून सगळे मिथुनी समाधानानं आपापल्या घरी जातात. ह्यावर मला अनेकांनी विचारलं की स्वतः प्रभुजी कधी सहभागी होतात की नाही. मी म्हटलं, अरे अज्ञानी जीवांनो, 'देवाला कधी धर्म असतो का? धर्म आपण मर्त्य मानव बनवतो. सण आपण साजरे करतो, देवाच्या नावानं!'

तर मुद्दा होता की आज त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण होऊन पाच दिवस होत असताना मला हे पार्सल आलं कसं? आणि त्या पवित्र दिवशी आमच्या धर्मावर आलेल्या ह्या संकटाबद्दल मला काहीच कसं ठाऊक नव्हतं. मी लगेच ते पार्सल कुठून आलंय हे शोधायला सुरूवात केली. मग माझ्या लक्षात आलं की भारतातल्या अगदी मोजकी फॉलोईंग असलेल्या 'जो कर' ह्या संप्रदायाचा हे मला पाठवण्यात काहीही हात नाहीये. एक विलक्षणच गोष्ट होती. त्याचं झालं असं होतं.

'जो कर' हा अतिशय रद्दड आणि मूर्ख असे रोमॅन्टिक सिनेमे पाहणार्‍यांचा संप्रदाय होता. ते बहुधा 'श्श चुपरहा' आणि 'जोहर कर'(ह्याच्या नावावरूनच संप्रदाय सुरू झालाय) ह्या दिग्दर्शकांचेच सिनेमे पाहायचे. त्यांचा स्वतःचा आमच्यासारखा फुल फ्लेज धर्म नाहीये. ते स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करत होते. ह्याच त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या प्रसिद्ध पण विचित्र धर्माचा प्रसिद्धीसाठी वापर करून घ्यायचं ठरवलं. सूर्यावर थुंकून लोकप्रियता मिलवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणून ही अशी पार्सल बर्‍याच मध्यममार्गी लोकांना पाठवली. पण परिणाम उलटा झाला. आमच्या धर्मचित्रपटात असं आहे तरी काय? की ज्यामुळे इतका बवाल होतोय हे जाणण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी 'गुंडा' पाहिला. आणि उलट आमच्या धर्माची लोकप्रियता रातोरात वाढली. 'गुंडा' जळणं तर राहिलं दूर, उलट लोकांनी अनेक दिवस वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्स सगळीकडे फक्त आमच्याच 'मिथुनिझम'बद्दल लेख लिहिले, डॉक्युमेंट्रीज बनवल्या. ज्यामुळे 'जो कर' संप्रदायाचे वांधे झाले. त्यांनी अजून जोरात बोंबलायला सुरूवात केली. त्यांनी ४ सप्टेंबरला काही सीडीज जाळल्यादेखील, पण ते पहायला कुणीच गेलं नाही. उलट त्यादिवशी 'गुंडा दिवसा'ची सेलिब्रेशन्स मात्र सगळ्यांनीच अनुभवली.

त्या विचित्र दिवसामुळे 'मिथुनिझम'ची पताका सगळीकडे फडकली, पण 'जो कर' संप्रदाय मात्र अनुल्लेखानेच मारला गेला किंवा झालाच तर इतका बदनाम झाला की जवळपास नामशेषच झाला. कित्येक त्याच संप्रदायाच्या लोकांनी फुटून वेगळी चूल मांडली. आणि त्या फजितीमुळे त्यांनी तो दिवस विसरून जाणंच पसंत केलं. मिथुनींच्या तत्कालीन धुरिणांनी हा द्वेषपूर्ण दिवस विसरून जाण्याचं आवाहन मिथुनींना केलं त्यामुळे ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पानात हरवून गेली होती. पण हे एक त्याकाळचं पार्सल माझ्या आजोबांनी जपून ठेवलेलं होतं. ते त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाने मला पाठवण्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याने हे मला आलं होतं. पण तरी मला कळत नव्हतं, की त्या दिवसाचे सगळे पुरावे जर नष्ट झाले होते, तर आजोबांनी हे जपून का ठेवलं?

दुसर्‍या दिवशी सहज त्यातली एक गुंडा ची नसलेली डीव्हीडी माझ्या नजरेस पडली. ती मी उत्सुकतेपोटी लावली. आणि मला धक्काच बसला. त्यात माझ्या आजोबांचा माझ्यासाठी व्हिडिओ संदेश होता. त्याचा सारांश असा-

"मी प्रत्यक्ष 'बाबां'चा वंशज आहे. आणि आजच्या जगाला 'मिथुनिझम'च्या विजयाची किंवा त्यापेक्षा 'आक्रस्ताळेपणा'च्या पराभवाची ही विलक्षण कथा सांगण्यासाठीच माझी नेमणूक 'बाबां'नी केली होती."

सर्व मिथुनी आणि अ-मिथुनींना 'गुंडा दिवसा'च्या उशीरानेच शुभेच्छा!

4/28/2010

"बाबा" ची भिंत!

मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.
लहान असताना सिनेमे म्हणजे काय हे ही माहित नसताना मी अमिताभ बच्चनचा 'जंजीर' पाहिला होता. अगदी मनावर ठसला होता तो सिनेमा. ती पांढरा घोडावाली चेन, रात्री स्वप्नात खिंकाळणारा पांढरा घोडा पाहून उठणारा घामाघूम अमिताभ, "यह पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं।" म्हणत खुर्चीला लाथ घालणारा अमिताभ, "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी" वर रुमाल उडवत नाचणारा केस लाल रंगवलेला प्राण, रुळावर फेकून दिलेला जखमी अमिताभ (आणि टेन्शनमध्ये आलेला मी) आणि ऐनवेळी त्याला रुळावरून खेचणारा(आणि माझ्या दुवा मिळवणारा) प्राण. मी विसरूच शकत नाही. मग पुढे त्याचा खास लहान मुलांसाठी बनवलेला(कुणीही काहीही म्हणो, माझ्या म्हणण्यानुसार तो लहान मुलांसाठीच बनवलेला होता)'अजूबा'. अजूबा तर मी कित्येक वेळा आवडीने बघितला होता(अजूनी लागला की बघतो, कदाचित मी मनाने मोठा झालो नाही{लोकांना सांगायला, "मी तो सिनेमा 'नॉस्टॅल्जिक' होण्यासाठी बघतो"}). मग माझ्या लहानपणी माझा आवडता अजून एक आवडता सिनेमा होता, "हाथी मेरे साथी". त्या सिनेमातलं जास्त काहीही माझ्या लक्षात नाही. पण तो सिनेमा मला तेव्हा जाम आवडायचा, कारण त्यातला हिरो - रामू हत्ती(मला आवडण्याचं अजून एक कारण हेही असावं की मला नावीन्याची हौस आहे{पुलं सांगतात त्याप्रमाणे 'भर वर्गात सदरा काढून डोक्याला गुंडाळण्या'च्या सदरातली हौस नाहीये, पण} आणि एरव्ही नोकरासाठी म्हणून राखून ठेवलेलं नाव हिरोला देण्यात आलं होतं). तो जेव्हा मरतो तेव्हा, रस्त्याने राजेश खन्ना गाणे गात जातो तेव्हा मीही रडायचो. पण त्या सिनेमाशी माझी एक एम्बॅरॅसिंग आठवण पण जुळलेली आहे. त्यातल्या शेवटच्या प्रसंगात राजेश खन्ना व्हिलनला त्वेषाने सांगतो, "मैं तुम्हें नही छोडूंगा", तर हा प्रसंग आई-वडिलांना रंगवून सांगतेवेळी(का सांगत होतो ते आठवत नाही) मी तेव्हढ्याच त्वेषात येऊन, "मैं तुझे नही सोडूंगा" असे म्हणालो होतो. आई-बाबा बराच वेळ हसले, मला कळेना आपलं काय चुकलं. मग त्यांनी बर्‍याच जणांना माझ्या भूमिकेत शिरण्याची ही कथा सांगून माझा साफ वडा केला (अजूनी करतात, त्यानंतर मी त्याच त्वेषाने राष्ट्रभाषा सभेच्या चार परीक्षा 'विशेष योग्यते'त पास करूनही माझ्या कपाळीचा हा डाग पुसला गेला नाही आहे). असो, तर मी नेहेमीप्रमाणेच मुद्द्यापासून बराच भरकटलो आहे, तेव्हा पुन्हा मुद्द्यावर येतो.
मुद्दा हा, की मी लहान असताना माझे काही ठराविक सिनेमे आवडीचे होते(दूरदर्शन एक वर शनिवारी रात्री लागणारे). पण आवडीचा नट एकच. अमिता बच्चन(मी '' नजरचुकीने विसरलेलो नाही). फक्त अमिता बच्चन अशासाठी कारण तो ढिशूम ढिशूम करायचा, राजेश खन्ना नाही कारण त्या सिनेमाचा हिरो रामू होता. पण मग एखादं वर्ष झालं असेल. दूरदर्शनवर "बॉक्सर" हा सिनेमा लागणार होता. आमच्याकडे व्ही.सी.आर. होता, काही ठराविक सिनेमे आम्ही रेकॉर्ड करायचो. मी बॉक्सर ह्या नावानेच प्रभावित झालो होतो, त्यामुळे साहजिकच मी बाबांच्यामागे तो रेकॉर्ड करण्यासाठी धोशा लावला. माझ्या भावाने मला त्या सिनेमाचा हिरो मिथुन चक्रवर्ती याची माहिती पुरवली - "तो गरीबांचा अमिताभ आहे." बस माझ्या डोक्यात ते चांगलंच ठसलं. आणि मला मिथुन एकदम आपला माणूस वाटायला लागला (ह्या घटनेचा सोशिओ-सायको ऍनॅलिसिस असा करता येईल की - मला एव्हढंच माहित होतं की आपण श्रीमंत नाही, म्हणजे आपण गरीबच असलं पाहिजे. आणि आपण गरीब तर गरीबांचा अमिताभ तो आपला अमिताभ. लॉजिक.) बॉक्सर मधल्या मिथुनच्या बॉडीची वाहवा त्यानंतर मी कित्येक दिवस जो भेटेल त्याच्याकडे करायचो (रती अग्निहोत्रीची वाहवा करण्याएव्हढं वय झालं नव्हतं माझं तेव्हा). मी काही मुव्ही बफ नव्हतो तेव्हा, की मिथुन आवडतो म्हणून मिथुनचे सगळे सिनेमे बघ (अर्थात तेव्हा काही सोयही नव्हती, सिनेमांच्या कॅसेटी भाड्याने आणून बघणे ही ३-४ महिन्यांतून एकदा केली जाणारी चैन मानली जायची.). तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही माझा मिथुन ह्या माणसाबद्दलचा आदर कमी झाला नाही. 'डीस्को डान्सर', 'डान्स डान्स', वगैरेंबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो. अमिताभ हा का कुणास ठाऊक फार दूरचा वाटायला लागला. मिथुन आपला माणूस वाटायचा. माझ्या दादाने दिलेल्या तत्वज्ञानाची आणि बालमानसशास्त्राची सांगड घातली, तर कदाचित ह्या अतर्क्य घटनेचा अन्वयार्थ लागण्याची शक्यता आहे(हे वाक्य मी का लिहिलं, ह्या अतर्क्य घटनेच्या मागचं कारण कदाचित आज ऑफिसात कामे सोडून वाचलेले अनेक मराठी ब्लॉग्ज हे असू शकतं). मग त्याचा क्रिष्नन अय्यर येम.ये. आला आणि माझ्या दीवानगीला पुरावा मिळाला. "विजय दीनानाथ चौहान" ह्या गारूड करणार्‍या पात्रापेक्षा मी "क्रिष्नन अय्यर येम.ये." च्या जास्त प्रेमात पडलो, हाच तो पुरावा. "ये लडका, चिंगारी, बडा होके हम सबको, जलाके राख कर देगा. आऐ(ह्या उच्चाराला शब्दबद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे)." हा डायलॉग मला आवडला पण ,"हम ये लुंगी उठाती, तुमको डिस्को दिखाती" चा जप मी कित्येक दिवस करत होतो.
मग पेपरात मिथुनला त्याच्या "जल्लाद" ह्या सिनेमासाठी "बेस्ट व्हिलन"चं फिल्मफेअर मिळालं हे वाचून मला झालेला आनंद मला आजही आठवतो. जल्लाद हा मिथुनदाच्या पुढे येणार्‍या अनेक "" सिनेमांची नांदी होती. हे बॉलीवूडच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला अलगद बाजूला केलं. त्यालाही फरक पडत नव्हता. त्याने ऊटीमध्ये हॉटेल बांधलं होतंके.एल.व्ही. प्रसाद हा पार्टनर दिग्दर्शक, स्वतः हिरो, स्वस्तातली हिरॉईन, सगळं शूटिंग हॉटेलात किंवा आवारात. आणि एवढ्या स्वस्तात बनवूनही यू.पी. बिहारमध्ये होणारी कमाई, हा फायद्याचाच सौदा होता. मग "गुंडा", "लोहा", "हिटलर", "चीता", असं सगळं चालू होतं. एव्हढ्या गुणी कलाकाराला असं करताना पाहून जीव तुटायचा. "चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबूतर रे" म्हणणार्‍या मिथुनचा राग मात्र कधी आला नाही.
इकडे अमिताभ, ABCL, टॅक्स बुडवणे असले प्रकार करून नजरेतून उतरत होता तेव्हाच कचरापेटीत सापडणालेल्या मुलीला दत्तक घेणार्‍या आणि एकही मेनस्ट्रीम सिनेमा न करून सर्वात जास्त कर भरणार्‍या मिथुनबद्दल वाचून अभिमान वाटायचा. नक्षलवादाची कास सोडून चहाच्या टपरीपासून नव्या आयुष्याची सुरुवात करणारा आणि मोठा माणूस झाल्यावर त्याच टपरीवाल्याला मोठं हॉटेल काढून देणारा मिथुनदा वेगळा आहे ह्याची खात्री पटली.मग मी कॉलेजात आलो. आणि मिथुनचा "तितली" नावाचा बंगाली सिनेमा आल्याचं वाचलं. त्यात अपर्णा सेन आणि कोंकोणा सेन होती. मिथुनदाच्या अभिनयाची स्तुती वाचून तेव्हाही बरं वाटलं होतं. मग वर्षभरातच ती बातमी आली - "मिथुनदा मेनस्ट्रीम सिनेमात परततोय." विक्रम भट्टचा "ऐलान". कॉलेजातल्या मित्रांनी चिडवलं, पण मी म्हटलं, पिंजर्‍यात राहिला म्हणून वाघाची शेळी होत नाही. सिनेमा साफ पडला, पण माझ्यासाठी त्यातलं मिथनदाचं पात्र "बाबा सिकंदर" हे त्याच्या परतीचं द्योतक होतं. मग मी आणि माझे काही टवाळ मित्र कॉलेजात एकमेकांना "हेल मोगॅम्बो" सारखे "जय बाबा सिकंदर" किंवा "बाबा की जय" असे म्हणून ग्रीट करायचो. मग हे लोण बर्‍यापैकी पसरलं, काही माहीत नसणारेही मला असंच ग्रीट करायचे. हळूहळू माझं टोपणनाव बाबा पडलं. त्याच सुमारास मी माझा इंग्रजी ब्लॉग मजा म्हणून ब्लॉगस्पॉट वर चालू केला होता. मी बाबा धर्माची पताका खांद्यावर घेतलेली असल्याने त्याचं युआरएल "द बाबा प्रॉफेट" असं ठेवलं. त्याचं नाव ठेवलं "बाबा की जय!" पासवर्ड होता, "जयबाबासिकंदर" (प्रयत्न करू नका आता बदललाय). आता ब्लॉगरचं युजरनेम गुगल बरोबर मर्ज केलंय, पूर्वी ब्लॉगरला वेगळं युजरनेम असायचं, आणि माझं युजरनेम "द प्रॉफेट" असं होतं. मी खेळाडूंमध्ये राहुल द्रविडचा सच्चा भक्त असल्याने टॅगलाईन होती, "ग्रेट वॉल ऑफ बाबा!". प्रोफाईल फोटो मिथुनदाचा. मग पुढे मी तो ब्लॉग बंद करून सोफिस्टिकेटेड ब्लॉग बनवला. रूढार्थाने मी मोठा झालो.
तीन-चार वर्षे गेली. मी मिथुनदाचे सगळे नवे-जुने सिनेमे पाहिले. "ट्रक ड्रायव्हर सुरज", "कूली शंकर", "हिटलर", "अमावस" सगळ्या लीला पाहिल्या मी. पण तोच "ब" मिथुनदा गुरू मध्ये आपला खरा दर्जा दाखवताना पाहून अभिमानही वाटला. मग मी एक दिवस मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश केला. माझ्या साईटवरचा माझा मराठी-इंग्रजी ब्लॉग काही कारणास्तव तिथे जोडला गेला नाही, मग मी तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉगर उघडलं. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. "मराठी ब्लॉगला काय नाव द्यायचं?", हा प्रश्न मला पडलाच नाही. "ग्रेट वॉल ऑफ बाबा" चं "'बाबा' ची भिंत" झालं आणि प्रोफाईल फोटो बदलण्याचा प्रश्नच नव्हता.
मी आजही मिथुनदाचा तेव्हढाच मोठा पंखा आहे. त्याच्या ब सिनेमांची मी कितीही टवाळी केली तरी त्यात कौतुकाचा भागच जास्त असतो. पण हे मात्र खरं की मृगया साठी नॅशनल ऍवॉर्ड घेऊन कारकीर्दीची सुरुवात करणारा आणि अभिनयासाठी दोन नॅशनल ऍवॉर्ड मिळवणारा मिथुन ह्यांच्याबरोबरच, "ये खून नही, मेरे क्रोध का रंग है, चाटेगा इसे?"(क्लासिक डान्स ऑफ लव्ह), "बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा!"(गुंडा) आणि "दिखनेमें बेवडा, दौडने मे घोडा और मारने मे हाथोडा हूं मैं" (लोहा) म्हणणारा मिथुनही माझा तितकाच आवडता आहे. कदाचित तारा जुळल्यात.
(तळटीप{वटवट सत्यवानाकडून साभार} - मला बर्‍याच जणांनी ब्लॉगच्या विचित्र नावाबद्दल विचारलं. परवा आनंदशी बोलताना त्याने ह्याबद्दल एक ब्लॉग पोस्ट लिहायची कल्पना सुचवली. मग त्याबद्दल लिहायचं तर हे सगळं आपोआपच आलं. इथपर्यंत वाचलं असाल तर सहनशीलतेबद्दल धन्यवाद. आणि आनंद, कल्पने बद्दल धन्यवाद{लोकहो, शिव्या घालायच्या असतील तर डायरेक्ट त्यालाच घालणे.})
आणि हो ....
मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.

4/11/2010

अ, ब आणि क

मी जेव्हापासून सिनेमे अनुभवण्यासाठी म्हणून बघायला लागलो, तेव्हापासून माझी नजर नुसतीच गोष्ट किंवा अभिनय किंवा आवडते नट-नट्या (नट आपलं उगाच जोडशब्द म्हणून लिहिलंय) ह्याकडे न राहता इतर अनेक गोष्टींकडे जाऊ लागली (हे लिहिणार होतो म्हणूनच आवडते नट-नट्या{पुन्हा नट ...} आधी लिहिण्याचा खटाटोप). असो. तर इतर गोष्टी म्हणजे कॅमेरा ऍंगल, प्रकाशयोजना पण ह्या तांत्रिक गोष्टी फारश्या समजत नसल्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता माझी गाडी वळते ती संवाद आणि संवादफेकीकडे.
मला वैयक्तिकदृष्ट्या ब-क दर्जाचे सिनेमे फक्त संवाद आणि संवादफेकीसाठी आवडतात (उदाहरणार्थ, मिथुनदांचं सेल्ल्युलॉईडवरचं महाकाव्य - "गुंडा"(१९९८)). हे सिनेमे तद्दन भिकार वाटू शकतात लोकांना. वाटोत, बिचार्‍यांना आयुष्यातल्या केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकावं लागतं ते त्यांना नाही कळायचं.  मला हे सिनेमे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे, ते कुठेही सत्य किंवा पाथब्रेकिंग वगैरे असण्याचा आव आणत नाहीत. नागवे तर नागवे, उगाच 'नग्नचित्र ही काय कला आहे तुम्हाला नाही कळायचं' असले आव आणणं नाही. म्हणूनच मला त्यातून निर्मळ मनोरंजन मिळतं. अर्थात, त्यामध्ये बीभत्सपणा अंमळ जास्त असतो, पण शेवटी ह्या सिनेमांचा टारगेट ऑडियन्स असतो. आता वानगीदाखल गुंडातला पुढचा संवाद पहा,
"ए कौन है बे तु?"-एक व्हिलन मिथुनदाला.
"मैं हूं जुर्म से नफरत करनेवाला, गरीबों के लिये ज्योती और तुझ जैसे गुंडों के लिये ज्वाला।"-मिथुनदा.
"बना के तुझे मौत के मुंह का निवाला, गाड दूंगा तेरी छाती में मौत का भाला।"-....
आता मला सांगा ह्या असल्या फालतू संवादांपासून सिनेमातले जवळपास सगळे संवाद यमक जुळवून आहेत, काही बीभत्स, काही खरंच विनोदी. मग का नाही मी ह्या सिनेमाला महाकाव्य म्हणायचं. असेच संवाद मिथुनदा आणि धर्मेंद्रच्या उतारवयातील अनेक सिनेमांमध्ये आहेत. पण असो, मी जर सुरु झालो तर फक्त संवादांचाच एक ब्लॉग होईल.
ह्या सिनेमांमध्ये आपले मराठीतले आघाडीचे अभिनेते मोहन जोशी हटकून असतातच. गुंडा, लोहा अश्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या ब-अभिनयाचा लोहा मनवलेला आहे. तर आपण कुठे होतो. संवाद आणि संवादफेक. तर अश्या सिनेमांमध्ये बरेचसे कलाकार फडतूस असतात. स्वस्तात कामे करणारे. त्यामुळे त्यांचा दर्जा हा सिनेमाच्या एकूण दर्जाशी साधर्म्य साधणारा असतो. पण ह्या सिनेमांमध्ये जे मिथुनदा, धर्मेंद्र, शक्ति कपूर सारखे मंझे हुए कलाकार असतात त्यांचीसुद्धा खास ह्या सिनेमांसाठी एक टाळ्या घेणारी संवादफेक असते. एरव्ही "आय एम कृष्णन अय्यर येम ये." म्हणून अप्रतिम अभिनय करणारा मिथुनदा, जेव्हा "दो..चार..छे..आठ..दस.....बस.." म्हणतो, तेव्हा तो फक्त कूली शंकर असतो. "मेरा नाम है सुरज..ट्रक ड्रायव्हर सुरज." ह्या संवादाची कल्ट फॉलोईंग तर "द नेम इज बॉन्ड.." पेक्षाही जास्त असेल. धर्मेंद्रचं "कोई हसीना जब रूठ जाती है तो..." हे तुम्हाला पानीकम वाटायला लागेल, जर तुम्ही "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंन्ड वॉच माय डीराम्मा.."(तहलका) पहाल. आणि तुम्ही जगप्रसिद्ध "सुसाsssईड" म्हणणारा हाच का धर्मेंद्र असा विचार कराल जेव्हा तो "मैं हूं गरम धरम...मुझे कैसी शरम."(पुन्हा तहलका) असं म्हणत नाचतो.
हे सिनेमे नुसतेच भिकार असतात अशातला भाग नाही, कधीकधी अत्यंत हिडीस उपमा देऊन संवादांना नटवलेलं असतं. आता लोहामध्ये एक भिकार सिच्युएशन आहे. एकेकाळचा मोठा भाई दीपक शिर्के('एक शून्य शून्य वाला) आता अगदी बरबाद आहे आणि तो दुसर्‍या एका भाईकडे मदतीची याचना करायला आलाय. त्याच्या ओळी आहेत, "मैं बिना पेट्रोल की गाडी हूं, मैं बिना नशे की ताडी हूं, मैं वो फटेली साडी हूं, जिसे कोई हिजडा भी नही पेहनेगा।"
अशा वेळी माझा सलाम जेव्हढा त्या कलाकाराला असतो, तेव्हढाच त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा ओरडून पहा मी किती खालच्या पातळीवर आहे हे सांगण्यासाठी कलेजा लागतो, तो जर चोप्रा आणि जोहरकडे असता, तर "कांताबेन" आणि "ये कान में डाल.."(कल हो ना हो), "बोमन इराणीचं दोस्तानामधलं पात्र" आणि "सेक्सी सॅम" (कभी अलविदा ना कहना) हे बीभत्स विनोद आजची पिढी किंवा मॉडर्न सोसायटीच्या नावाखाली खपवण्याचा दांभिकपणा त्यांनी केला नसता. असो. माझे मुद्दे, दृष्टीकोन सगळ्यांनाच पटतील असं नाही. ते पटावेत असा अट्टाहासही नाही. आपण पुढे जाऊ.
माझी अजून एक आवडती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा. नाचातले नाही. एकूणातच सिनेमातले, किंवा अगदी हल्लीच्या सिरियलमधलेही (होय मी सिरियल्स बघतो. मी खुल्लम खुल्ला सांगतो की मी सिरियल्स बघतो). आणि हे फक्त ब-क वाले नाही सगळ्याच अगदी मेनस्ट्रीम (इथे द्व्यर्थ आहे का? मेन म्हणजे पुरुष सुद्धा होतं) सिनेमातलेही. हे लोकसुद्धा एक प्रकारचे 'ब आणि क'च, कारण मुख्य पात्र म्हणजे 'अ', हे आपले उगाच पूरक. ह्याचा अर्थ मला ब आणि क हा प्रकार एकूणातच भलताच आवडतो असा होतो. पण शाळेत मी 'अ' वर्गात होतो आणि गणितातल्या 'ब, क आणि ड' गटाशी माझे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.
तर आपण ब आणि क कॅटेगरीच्या पात्रांवर होतो. म्हणजे बघा हिरो हिरॉईनला पाणीपुरी खायला घालतोय, तेव्हा पाणीपुरीच्या गाडीवाल्याच्या चेहर्‍याचं कधी निरीक्षण केलंय तुम्ही कधी? अगदी मजेदार भाव असतात. म्हणजे कधी कधी एखादा हळूच आपण कॅमेरात दिसतोय की नाही हे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत असतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो आणि तो इस्त्री (मला कधीकधी प्रश्न पडतो, काही उत्तर भारतीय, 'स्कूल'ला 'इस्कूल' 'स्तर'ला 'इस्तर' म्हणतात, मग ते 'स्त्री' ला 'इस्त्री' म्हणत असतील का?{समस्त स्त्रीवर्गाची आत्ताच माफी मागतो}) मारल्यागत करून उभा राहतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो पण त्याला दाखवायचं नसतं की तो कॅमेरा कॉन्शस आहे, मग तो उगाच खोटं हसू किंवा आपण आजूबाजूला बघण्यात गर्क आहोत असा आव आणत राहतो किंवा एखादा एवढा कॅमेरा अनकॉन्शस असतो की आपण सीनचा भाग नसून आपणपण शूटींग बघायला आल्यासारखा पूर्ण सीनभर हिरो हिरॉईनकडे पाहत राहतो. मग एखाद्या सीनमध्ये, स्पेशली ९०' च्या दशकातल्या सिनेमांमध्ये हिरो किंवा हिरॉईन रस्त्यावर नाचगाणी करत असतात, तेव्हा उभ्या क्राऊडमध्ये एखाद्याकडे जाऊन काहीतरी वेगळं म्हणजे त्याची टोपी काढतात किंवा त्याची दाढी कुरवाळतात किंवा त्याचा विग काढतात वगैरे, तेव्हा त्या एका माणसाचा चेहरा बघण्यासारखा असतो. कारण हे क्राऊड म्हणजे बरेचदा खरंच रस्त्यावरचं शूटींग बघायला आलेलं क्राऊड असतं, तेव्हा सिनेमाच्या मुख्य कलाकाराबरोबर आपण एका सीनमध्ये आहोत हा अनुभवच त्यांचा चेहरा तेजोमय करायला पुरेसा असतो, त्यामुळे बरेचदा त्यांची फजिती होतेय असा सीन असतो, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की त्यावेळी समर्थांनी त्याला विचारलं की "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर तो "मी" असं छाती ठोकून उत्तर देईल(मला माहितेय की ही जरा ओढून ताणून उपमा झालीय, खरं म्हणजे मी "स्वतः मेनका त्याचे पाय चोळून देतेय" असे भाव असतात असं लिहीणार होतो, मग अचानक पुलंचं 'असा मी असामी' आठवलं, मग म्हटलं टॅरॅंटीनो स्टाईल 'होमेज' देऊया. आणि बघा एकाच कंसात मला पुलं आणि टॅरॅंंटीनो दोन्ही माहितीयेत हे सांगूनही झालं). पण त्याहून जास्त मजेशीर भाव असतात ते ह्या फजिती होणार्‍याच्या शेजारी उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावर. आपण कॅमेरात व्यवस्थित येत असू की नाही ह्याची एकीकडे काळजी आणि येत असू तर नीट दिसत असू ना ही विवंचना (कारण सिनेमा रिलीज झाल्यावर नातेवाईक, शेजारी, सहकारी सगळ्यांना दाखवायचं तर धड दिसायला तर हवं ना). माझा हा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे, मी लहान होतो तेव्हा - साधारण सहावी सातवीत असेन - माझ्या एका मित्राच्या आईने "ताकधिनाधिन" ह्या तेव्ह्याच्या सह्याद्रीवरच्या हीट टीव्ही शोसाठी पासेस मिळवले होते. तो शो होता "लहान मुलांचा खास", त्यामुळे माझा मित्र, मी आणि अजून एक अशी आम्ही तीन लहान मुलं गेलो होतो शूटींगला. आम्ही नशीबवान म्हणून ऍंकर उभे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही होतो. आपल्या तिरंग्याच्या तीन रंगाच्या टोप्या पोरांना वाटल्या होत्या. मला भगवा मिळाला होता. ती टोपी मी बरेच वर्ष जपून ठेवली होती, अजूनही घरी कुठेतरी असेल. च्यायला अर्ध्या तासाचा तो शो पण त्याचं शूटींग पाच तास चाललं होतं. प्रत्यक्ष शूटींगमध्ये तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर काहीच मजा नसते हे तेव्हा माझ्या बालमनाला पहिल्यांदाच कळलं होतं. असो, तर मी एंकर्स च्या शेजारी बसलो होतो त्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये आपण असू असं वाटत होतं (अर्थात ते थोडंफार खरंही होतं), त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो. अर्थात माझ्या मेहनतीचं मार्जरीन झालं (चीजमध्ये खूप अनवॉन्टेड फॅट्स असतात), कारण कधीतरी कुणीतरी तो एपिसोड पाहून, तू त्यात होतास का, म्हणून विचारल्याचं आठवतंय, नाही नाही एक मिनिट, त्यांनी विचारलं, तेव्हा मी ती भगवी टोपी घातली होती काय? च्यायला, कुठून तुम्हाला सांगायला गेलो, आयुष्यातल्या एका निखळ आनंदाच्या क्षणावर कायमसाठी संशयाचा बोळा फिरला. जाऊ द्या.
त्यानंतर असेच मस्त हावभाव न्यूज चॅनेलचे पत्रकार ज्या राह चलत्या आम आदमीचे इंटरव्ह्यू घेतात त्यांचे असतात ("अ वेन्सडे" चित्रपटात स्नेहल दाभी ह्या कलावंताने ते अप्रतिम दर्शवलेत). आपण कोणीतरी फार जाणकार दिसतो म्हणून आपल्याला विचारताहेत असं काहींना वाटत असतं, तर काहींना आपण स्मार्ट दिसतो असं वाटत असतं, तर काही आपण खरंच विचारवंत आहोत असं समजून पल्लेदार वाक्य फेकतात. तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले 'ह्यालाच का विचारतायत" असा विचार करत असतात, तर काही त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं ह्याची जुळवाजुळव (मनातल्या मनात) करण्यामध्ये गुंतलेले असतात, तर काही घरी फोन करून अमका चॅनेल लावा, मी दिसतोय का बघा आणि शेजार्‍यांना सुद्धा सांगा वगैरे करण्यात व्यस्त असतात. इथे सुद्धा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे (आहेच का? म्हणजे काय, माझा ब्लॉग आहे, मी स्वतःची लाल नाही करणार तर कोणाची). एकदा आमच्या कॉलेजात एक न्यूज चॅनेलवाले आले होते, मी तेव्हा जी.एस. असल्याने (कळला ना महत्वाचा मुद्दा, मी जी.एस. होतो, बाकी नाही वाचलंत तरी चालेल) मी समन्वय करत होतो. सगळी जनता कॅमेरासमोर उभी झाली. मग त्यांनी "बसमध्ये कंडक्टर २५ पैश्यांचं नाणं परत देईल तर तुम्ही काय कराल?" असला काहीतरी प्रश्न विचारला. कोणी कोणी काय काय पुड्या सोडत होतं, कसलं उत्तर आणि कसलं काय, सगळं लक्ष कॅमेराकडे. नाहीतर आम्ही, कॅमेराचं आमच्याकडे बिलकूल लक्ष नसूनही नेटाने फ्रेममध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. कुणी घरी फोन लावले, मी मात्र मला विचारलं तर मी काय सांगावं ह्याची जुळवाजुळव करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. व्यर्थ अशासाठी की मी प्रश्न नीट ऐकलाच नव्हता आणि दुसरं मी समन्वयक असल्याने तांत्रिकदृष्ट्या मी कॅमेराच्या मागचा माणूस होतो आणि त्या निर्दयी कॅमेरामनने माझं कॅमेरासमोरचं टॅलेंट लोकांसमोर येउ नये ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली. म्हणतात ना मीडिया बायस्ड आहे, खरंच.
तर असो. मुद्दा हा की सगळ्यांनी आजपासून मुख्य पात्र, कथा, आणि आवडत्या नट-नट्या (पुन्हा नट..) यांच्या पलीकडे बघायला सुरुवात करा. कारण तरच तुम्ही कुठल्याही कलाकृतीतला निखळ आनंद घेउ शकाल आणि त्या पात्रांनाही(आमच्यासारख्या) त्यांचं ड्यू क्रेडीट मिळेल.