1/30/2010

म-मराठी ब्लॉगचा

मी आता आठवड्यातून किमान एक तरी पोस्ट मराठीतून लिहिण्याचं ठरवलं आहे. आता, तसं बघायला गेलं तर माझी आठवड्यातून एक पोस्ट (इंग्रजी) होण्याचेसुद्धा वांधे असतात, पण 'एक बार जो मैंने कमिटमेन्ट कर ली, फिर मैं अपने आप की भी नही सुनता।' आता अगदीच स्वतःचं नाही ऐकणार असं नाही, पण एकदा डायलॉग आठवला की तो बोलून टाकावा. काय आहे अशी अचानक खुमखुमी येण्याचं कारण? आता कसं आहे, मी आपला सहज ऑफीसमध्ये बसलो होतो आणि काही निरुपयोगी विरोप(इ-मेल्स) काढत होतो. काही दिवसांपूर्वीच माझ्या एका मित्राने मला डॉ. सलील कुलकर्णींचा एक लेख पाठवला होता, तो न वाचताच तसाच ठेवला होता. मग तो वाचताना मला अमॄतमंथन ह्या ब्लॉगबद्दल कळलं. आणि तिथून मग मी मराठीब्लॉग्स.नेट वर पोहोचलो. आणि तिथून उघडले स्वर्गाचे द्वार. मी वेगवेगळे आणि तितकेच वेगवेगळ्या विषयांवरचे, चांगले ब्लॉग्स पाहिले आणि अनेक दिवसांची सुप्त इच्छा जागी झाली.

तसा मी ब्लॉगिंगला सरावलेलो आहे. मी इंजिनीयरिंग कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षापासून इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहायला सुरुवात केली. माझा एक मित्र आहे, ज्याच्यामुळे मी ब्लॉगची सुरुवात केली, त्याला पब्लिसिटी आवडत नाही म्हणून त्याचं नाव देत नाही. सुरुवात मजा म्हणून आणि मित्राची बरोबरी म्हणून केली. कॉलजातल्या फालतू गोष्टी, छोटी-मोठी भांडणं अशी सुरुवात झाली. मग मधेच इतरांच बघून तत्वज्ञान किंवा बिलकुल न जमलेला विनोदी लेख. इंजिनियर होता होता थोडी अक्कल आली म्हणा किंवा मोठा झालो म्हणा. तोवर जागतिक सिनेमाचं वेड लागलं होतं. तेवढी एकच कमाई, कारण ते वेड आयुष्यभर छान साथ करेल. तर त्या वेडाबद्दल ब्लॉग्पोस्ट व्हायला लागल्या. पण अजूनही म्हणावी तशी मजा येत नव्हती.  नोकरीला लागलो. ब्लॉग लिहिणं मात्र सोडलं नाही कधी. काहीही का असेना, लिहीत राहिलो. शालेपासुन असलेला लिखाणाचा नाद असा पूर्ण करत राहिलो. मग अनेकांचे ब्लॉग्स वाचले. आणि जाणवायला लागलं, की आपल्याला नक्की जे वाटतं ते सांगण्यासाठी ब्लॉग हे उत्तम व्यासपीठ आहे, आणि मी आत्तापर्यंत ते जसं सांगयचा प्रयत्न केला तो सौंदर्यवादी दॄष्टिकोनातून चांगला नव्हताच पण सुरुवातीला बालिशही होता.

आताशा विचारहि स्थिरावायला लागले होते, थोडक्यात म्हणजे माझा शाहरुख पासून आमिरकडे प्रवास सुरू झाला होता. मग मी माझा जुना ब्लॉग माझ्या कॉम्प्युटरवर जुन्या आठवणी म्हणून साठवला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मी इंटरनेटवर माझ्या ब्लॉगचं विसर्जन केलं. आणि जन्म झाला ह्या ब्लॉगचा. आताशा चांगला जम बसला आहे. हां अजूनही कोणी फारसं वाचत नाही, पण मी मनापासून लिहितो. आता माझे पोस्ट आशुतोष गोवारीकरच्या सिनेमांसारखे लांबलचक असतात, त्याला मी काय करणार. पुन्हा मी कवी ग्रेस यांच्यासारखं लिहीणार तर, पु. ल. देशपांड्यांसारखी लोकप्रियता कशी मिळणार. असो. मुद्दा तो नाही. मुद्दा हा, की आता काही दिवसांपूर्वीच मी सगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिण्याचं प्लगिन बसवलं. आणि मराठीत लिहिण्याचा विचार करत होतो, पण एवढी मेहनत करायची हिम्मत होत नव्हती. मग, एवढे सारे मराठी ब्लॉग्स वाचून माझ्या इच्छेला बळ मिळालं.

आता, मराठीत लिहायचं हे ठरलं, पण सुरूवात करायची कुठून? मग, माझ्या ब्लॉगच्या जन्मकथेपासूनच सुरू केलं. कित्येक दिवसांपासून ठरवतोय, हे सगळं सांगायचं म्हणून, पण मातृभाषेत म्हटलं तशी चट्कन लिहून झालं. (आता तुमच्यापासून काय लपवायचं, जितक्या चट्कन विचार आले, त्याच्या दसपट वेळ मराठीत TYPE करण्यात गेला.) तर अशी ही माझ्या ब्लॉगची साठा उत्तरांची कहाणी साता उत्तरी सुफळ संप्रूण (संपूर्ण)!