2/26/2010

रितीच घागर नशिबी माझ्या..!

माझ्या नटरंग पुराणामुळे आता माझे मित्र, माझे घरचे सगळेच पकले आहेत, पण नटरंग बद्दल ऐकून, वाचून, पाहून आणि त्यातली गाणी ऐकून मी मात्र अजूनही पकलो नाही आहे. आणि कधी पकेनसं वाटत नाही. (अर्थात मतभेद असु शकतात).गाण्यांचा तर रतीब घालतोय मी स्वतःला. जवळपास सगळीच तोंडपाठ झाली आहेत. असो, मुद्दा तो नाही. प्रत्येक गाण्याचे श्रेय जितके अजय-अतुल चे आहे, तितकेच गुरु ठाकूर चे आहे. नुसतीच सुंदर शब्दरचना नाही तर, पात्राची मनस्थिती, काळ ह्या सगळ्याचं अप्रतिम मिश्रण जवळपास प्रत्येक गाण्यात आहे. मी प्रत्येक गाण्याबद्दल वेगळी नोंद लिहू शकतो, पण ते नंतर, आत्ता ज्या गाण्याबद्दल लिहिण्यासाठी कित्येक दिवसांपासून ठरवतोय, त्या गाण्याबद्दल.
'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' हे गाणं म्हणजे एक गवळण आहे. हे गाणं चित्रपटामध्ये गुणा कागलकरच्या पहिल्या तमाशातील आहे. गुणा शेतातील विहिरीचे पाणी काढून द्यायचे काम करतो. पण शेतांमध्ये विहिरीवर मोटर बसवल्याने गुणाला दुसर रोजगार शोधणे भाग पडते. आणि तो आपल्या कलेचा उपयोग करायचं ठरवतो.  पण परिस्थितीमुळे त्याला नाच्या बनावं लागतं. आता पहिलवान गुणा नाच्या बनलाय आणि आपल्या गावातल्यांसमोर, स्वतःच्या बायको-मुलासमोर आपला तमाशाचा धंदा सुरु करतोय - नाच्याच्या रूपात. अशा वेळी त्याच्या गवळणीतल्या ओळी असतात.
"नकोस फोडू कान्हा माझी, घागर आज रिकामी। हसेल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी॥
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे। रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले॥"
ह्या ओळींमधून तो देवाकडे लाज राखण्याचं आवाहन करतो. एक म्हणजे धंद्याची लाज आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाची(तो नाच्या बनल्यामुळे). अर्थात, हे सगळं सूज्ञ वाचकांना ठाउकच असेल, पण मला केव्हाचं डाचतंय आणि आज दोनदा गाणं ऐकल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही.
पुन्हा गुरू ठाकूर पाणी भरणार्‍या गुणा कागलकरच्या तोंडी रिकाम्या घागरीचं उदाहरण देतात, तेव्हा आपोआप दाद जाते. वाह!

2/23/2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी

कित्येक दिवसांपासून पहायचाय पहायचाय म्हणता म्हणता शेवटी रविवारी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला. गेल्या काही आठवड्यांमध्ये एकामागे एक असे उत्तम मराठी सिनेमे पाहिलेत. त्यामुळे 'हरिश्चंद्राची..' कडून अपे़क्षा फारच वाढल्या होत्या, पुन्हा ऑस्करवारीला जाऊन आल्यामुळे असलेल्या अपेक्षा वेगळ्याच. आणि 'हरिश्चंद्र' आपल्याबद्दलच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो.

भारतातील पहिलं चलतचित्र बनवणार्‍या एका कलंदर पण दूरदर्शी माणसाची झपाटलेली गोष्ट अतिशय हलक्याफुलक्या आणि नीट पाहिलं तर तितक्याच जबाबदारीने सांगण्यात दिग्दर्शक परेश मोकाशी शंभर टक्के यशस्वी होतात.

सिनेमा पाहणार्‍या विविध वयोगटातील, विविध आवड असणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला आपलंसं करेल अशी सिनेमाची हलकीफुलकी तरीही ह्रदयस्पर्शी मांडणी आहे. पण तरीही काही समीक्षकांच्या मते सिनेमा हलकाफुलका होण्याचा नादात फाळकेंच्या लढाईचं गांभीर्य थोड्या प्रमाणात नष्ट झाल्यासारखं वाटतं. पण मला मात्र ते मान्य नाही. कारण माझ्या मते सिनेमा हलकाफुलका आहे तो केवळ मोकाशींनी तसा बनवलाय म्हणून नव्हे तर फाळकेंचं व्यक्तिमत्वच तसं प्रतीत होतं. अगदी डबघाईची स्थिती असतानाही केवळ ज्याच्याशी भांडण केलं त्या जुन्या भागीदाराला दिलेल्या वचनापायी स्वतःची पूर्ण क्षमता असूनही नव्यानं धंदा करण्यास नकार देणार्‍या ह्या जगावेगळ्या माणसाचं आयुष्य असंच दिलखुलास असायचं. आणि आयुष्यातले अतिशय ताणाचे प्रसंगही मोकळेढाकळे होतात ते त्यांच्या विलक्षण प्रतिभाशाली पत्नीच्या पाठिंब्यामुळे. जर त्यांची पत्नी त्यांच्या प्रत्येक निर्णयात केवळ मूकपणानेच नाही तर सक्रिय सहभागी होत नसती तर कदाचित फाळकेंची कथासुद्धा तणावपूर्ण आणि दुःखाची किनार असलेली झाली असती. पण ती तशी न होता केवळ संघर्षपूर्ण आणि अर्थपूर्ण होते. मोकाशींनी त्यांच्या पत्नीचं पात्रही अतिशय ताकदीचं लिहिलं आहे. आणि जितक्या ताकदीने नंदु माधव फाळकेंची व्यक्तिरेखा उभी करतात, तितकीच तोलामोलाची साथ त्यांना विभावरी देशपांडे त्यांना त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत देतात.

केवळ दीड तासांच्या ह्या सिनेमात फाळकेंच्या बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची फार जवळची ओळख मोकाशी आपल्याला करून देतात. प्रत्येक प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेऊन जातो आणि त्या विश्वाचं दर्शन त्यांच्या नजरेने करून देतो. त्यांची निरागसता, असामान्य प्रतिभा, बेधडक स्वभाव आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर त्यासाठी झोकून देण्याची वॄत्ती नंदु माधव अतिशय समरसून दर्शवतात. त्या काळात असलेला वैज्ञानिक दॄष्टिकोन, स्त्री पुरुष समानतेची समज त्यांचं सुसंस्कॄत व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सारे पैलू अतिशय मोजक्या प्रसंगातूनही ठळक सामोरे येतात.

त्यांचं मुळातलंच मिष्किल असणं आणि कठीण प्रसंगातही शांत राहणं सिनेमालाही तसंच असायला भाग पाडतं. त्याकाळात लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळत असतानाही कायम वेगळी वाट चोखाळणारा हा माणूस जेव्हा भारतात हा व्यवसाय वाढावा म्हणून ती संधी नम्रपणे धुडकावतो, तेव्हा त्यांच्यातल्या सच्च्या देशभक्ताची चुणूक दिसते. त्यांची देशभक्ती व्यक्त करायची पद्धत फक्त वेगळी होती.

मी लिहिलंय त्याहून खूप जास्त अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा. जितक्या निरागसपणाने हा चित्रपट व्यक्त होतो, तितकाच प्रगल्भ आणि अर्थपूर्णही आहे; फक्त ते जाणवण्यासाठी ती दॄष्टी हवी.

2/13/2010

इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ !

'नटरंग' सिनेमामध्ये एक छान कटाव आहे. तशी 'नटरंग'ची सगळीच गाणी मला आवडतात, पण सध्याची परिस्थिती पाहून ह्या ओळी फारच समर्पक वाटतात.


"मिरगाचा (मॄग नक्षत्राचा) हंगाम दाटला, फाटलं आभाळ। इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ॥"

२६/११/२००८ ला रात्री ११ वाजता मी विमानाने मुंबईला उतरलो होतो. विमानातच सूचना मिळाली होती की शहरात काहीतरी घडलंय म्हणून. पण किती भयंकर आहे ह्याचा अंदाज आधी आप्रवसन (इमिग्रेशन) ला आणि मग विमानतळाबाहेरची सुरक्षाव्यवस्था बघून आणि शेवटी विमानतळावरून घरी जातानाचे रिकामे रस्ते पाहून आला. आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही पाहून अंदाजाचं रुपांतर अविश्वासात झालं. मग ते हल्ले संपल्यावर तिथे मेणबत्त्या लावायचे प्रकार झाले. नेत्यांनी एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मुंबईच्या 'स्पिरिट'ला सलाम झाला. शहीदांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीच्या नावाखाली त्यांचे अपमानही झाले. मीडियावाल्यांनी चार-पाच वर्षांची कमाई ४-५ महिन्यांमध्येच करून घेतली. सरकारतर्फे पाकिस्तानला ललकारण्यात आलं संबंध तोडण्याची भाषा झाली. "पुरावे" सुपूर्द करण्यात आले. जिवंत दहशतवाद्याच्या खटल्यातून सर्व मृतांना न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी झाल्या.

७-८ महिनेच झाले असतील. पुन्हा तेच सरकार निवडून आलं. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, बहुतेकांना पुन्हा तीच खाती मिळाली. बाकीच्यांची राजकीय पुनर्वसनं झाली. पाकिस्तानने 'पुरावे' अपुरे असल्याचे सांगत सर्व प्रमुख आरोपींना सोडून दिलं. हाफिज सईद गच्च गर्दीच्या रॅल्या घेतोय. 'जिहाद' चे नारे देतोय. कसाब, एकमेव जिवंत अतिरेकी आता प्रसारमाध्यमांचा अन्नदाता आहे. कसाब कोर्टात हसला, त्याने डोळ्याच्या एका कोपर्‍यातून पाहिलं, तो मराठीत बोलला, आज कसाब कोर्टात असताना मजा झाली वगैरे वगैरे. कोणाच्या हे लक्षात आहे का की ह्याच माणसामुळे १८४ जिवंत माणसं मेली. मुंबई पोलिसांचे ३ खंदे अधिकारी गेले. पण आपण मात्र पाकिस्तानी कलावंत आणि त्यांचे क्रिकेटपटू भारतात यावेत ह्याच काळजीत. त्यांच्या रोजीरोटीची जवाबदारी आपली असल्यागत. फक्त दीड वर्ष झालं असेल, आता आपण "पाक खेळाडू आपले पाहुणे आहेत. आपण त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. ते सर्वोत्तम आहेत." असं म्हणणार्‍या एका कणाहीन माणसाच्या एका सिनेमासाठी पाठिंबा देतो. इथे खेळाडूंना कुणाचाही विरोध नाही. विरोध देशाला आहे. त्यांना सर्व बाबतीत एकटं पाडल्याखेरिज शांततेचं महत्व कळणार नाही. पण आपण सहिष्णू आहोत. इथे हाच पैशांसाठी लग्नांमध्ये नाचणारा नट गुलशन कुमार खटल्यात व्यस्त असल्यामुळे साक्ष देऊ शकला नाही आणि भरत शाह खटल्यात उलटला होता ह्याचा सर्वांना सोयिस्कर विसर पडतो. इथे पुन्हा विरोध सिनेमाला नाही तर व्यक्ति आणि वृत्तीला आहे. आपलं सरकार सगळा पोलिसी फौजफाटा त्याच्या सिनेमाच्या दिमतीला लावतं, हेच सरकार मराठी सिनेमावर अशीच वेळ आलेली असताना तमाशा पाहतं कारण तेव्हा सरकारातलेच मंत्री आपली अब्रू वाचवण्यासाठी सिनेमा रोखत असतात. सगळा फौजफाटा सिनेमाच्या मागे असल्यामुळे पुण्यात अतिरेकी अगदी सहज बॉम्ब फोडतात. १० लोक मरतात. तरी ४-५ महिन्यांपूर्वी निवडणुकांपर्यंत गर्जना करणारं सरकार पाकिस्तानबरोबर बोलणी करायला तयार होतं. आणि पुन्हा पाकिस्तानी म्हणतात, आम्ही नाही झुकलो, तेच झुकले शेवटी. आणि तरीही आपण पुनःपुन्हा तेच सरकार निवडून द्यायचं.

महागाई वाढलीये. ८०च्या दशकात, बायकांनी लाटणे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. आता लोकांना विचारा. लोक म्हणणार, काय करणार आपण? अरे? महागाई निवडणुकांच्या आधीपासून आहे, काय केलंत तुम्ही निवडणुकांच्यावेळी? घरी बसून लोळलात. पुन्हा तेच सरकार आलं आणि हेच चालणार. महागाई वाढणार, दहशतवाद वाढणार, पाकिस्तान असंच आपल्या तोंडावर थुंकणार. आपण मात्र सिनेमांना पाठिंबा द्यावा, तो कुणी काढलाय त्याच्याशी आपल्याला काय? उद्या अफझल गुरु किंवा कसाबल घेऊन सिनेमा आला तरी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यासाठी तो सिनेमा बघायचा. महागाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दहशतवाद ह्या विषयी आपण काय करणार? खरंच, आपण काय करणार?

असं म्हणतात, की प्रत्येक मनुष्यसमूहाला त्याच्या लायकीनुसार नेता मिळतो. खरंय, अगदी शंभर टक्के खरं आहे.

षंढ झालो आहोत आपण! काही करायचंच नाही आहे कुणाला! सगळ्यांना फक्त स्वतःची काळजी आहे. पण सगळे हे विसरतात, की ज्या आगीकडे ते "आपल्याला काय त्याचं" म्हणून पाहतायत, ती आज नाहीतर उद्या त्यांच्याच घरात येणार आहे. पण पर्वा कुणाला आहे. लाचारीची सवय झालीये. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या लाचार प्रवृत्तीचा फायदा घेऊनच राज्य केलं. आता घरभरू नेते करताहेत. एके काळचे आपण शूर म्हणवणारे, इतिहासातच शूर राहिलो आहोत. आता तर स्थिती सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आहे.

"इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ ।"

2/11/2010

एक प्रयत्न !

मराठी ब्लॉग विश्वामध्ये काही गड़बड़ आहे का हे पाहण्यासाठी मी हे लिहित आहे कारण मी माझ्या स्वतःच्या साईटवर मेंटेन करत असलेला ब्लॉग दिसावा म्हणून विजेट कोड वगैरेचे प्रकार करून पाहिले. पण आता दोन आठवडे उलटून सुद्धा काही हालचाल नाही म्हणून आता हे बघतोय की ब्लॉगरच्या साईटवरुन होते आहे का? म्हणजे माझ्या मनाला शांतता मिळेल. इथे असना-या सर्व नोंदी माझ्या मूल Blogवरच्याच आहेत. हा फ़क्त एक प्रयोग आहे. जर फसला तर पुन्हा इकादाची पाटी कोरी होईल. बाकी मराठी नोंदी दोन्हीकडे दिसू शकतील.

2/07/2010

नटरंग

अप्रतिम. एवढा एकच शब्द माझ्या मनात आला, जेव्हा मी नटरंग बघितला.(अर्थात कुणाचे ह्याबाबतीत माझ्याशी मतभेद असू शकतात.) खरं म्हणजे काही गोष्टी शब्दांमध्ये वर्णन करणं शक्यही नसतं आणि योग्यही नसतं. कारण जर चित्रपटांचं वर्णन शब्दांमध्ये करता आलं असतं तर, कादंब-यांवर चित्रपट बनले नसते. पण ब्लॉग म्हटलं की शब्द आलेच. आणि शब्द म्हणजे माझं स्वतःला व्यक्त करण्याचं सध्या तरी एकमेव माध्यम आहे.

मी सिनेमांची परीक्षणं करणं केव्हाच सोडलं आहे. कारण मला प्रत्येक सिनेमामध्ये काहीना काही आवडतंच. पण मजा अशी झालीय, की मला नटरंगमध्ये सगळंच आवडलं. अगदी वेशभूषेपासून, ते अप्रतिम संगीतापर्यंत. पण नटरंग एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो, ते अतुल कुलकर्णींमुळे. अतुल कुलकर्णी "गुणा कागलकर" च्या व्यक्तिरेखेमध्ये अनेकानेक रंग भरत जातात आणि डॉ. आनंद यादवांची कादंबरी वेगवेगळ्या पातळ्या पार करत जाते. मी डॉ. यादवांची मूळ कादंबरी वाचली नाहीय, पण नक्कीच त्यांना स्वतःलाही ह्या सिनेमाचा अभिमान वाटला असेल यात वाद नाही.

रवी जाधव ह्यांचं दिग्दर्शन नवोदितासारखं वाटतंच नाही. आणि त्यांचा एडव्हर्टायझिंगचा अनुभव चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो.  सर्व प्रमुख कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. तो काळ, ते प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेउन जातात. एका सच्च्या कलावंताचं दुःखं आणि त्यायोगे त्याच्या नातेवाईकांच्या वाट्याला आलेलं दुःखं सगळं अंगावर येत राहतं. नशीबाचे विचित्र खेळ बघून मन सुन्न होतं. पण सगळ्या परिस्थितींमध्ये सुद्धा असलेली गुणाची निरागसता आणि सचोटी पाहून काळजाला पीळ पडतात आणि प्रेरणासुद्धा मिळते. हाच ह्या चित्रपटाचा विजय आहे, की ही एका प्रतिभावान, सच्च्या पण परिस्थितीने गांजलेल्या कलाकाराची विलक्षण कथा असूनही त्या कलेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या प्रेक्षकालासुद्धा आतपर्यंत स्पर्शून प्रेरणा देते.

2/01/2010

झेंडा

ही नोंद झेंडा चित्रपटामुळेच लिहित आहे मी, पण ही फक्त झेंडाबद्दलच नाही.  कालच मी झेंडा सिनेमा पाहिला. पाहिल्यावर मनात संमिश्र भावना होत्या. मराठी मनाची चलबिचल टिपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, असं झेंडाचं साधारण वर्णन होऊ शकतं. झेंडा काही मोठे आणि कळीचे प्रश्न उभे करतो. पण त्या प्रश्नांची जी उत्तरं तो देतो, ती सगळ्यांनाच पटतील असं नाही. झेंडा कमालीचा अस्वस्थ आणि त्याहूनही जास्त निराशावादाकडे झुकणारा सिनेमा आहे. अर्थात कुठल्याही सिनेमाचे असतात तसे झेंडाचेसुद्धा स्वतःचे असे क्षण आहेत. आणि ते अतिशय छान जमलेत ते कलाकारांच्या तितक्याच सरस अभिनयामुळे. "विठ्ठला" हे गाणं अप्रतिमच. राजेश सरपोतदारचं पात्र निभावणारा राजेश शृंगारपुरे आणि संतोष जुवेकर हे माझ्या मते अप्रतिम आणि सिनेमातले काही चांगले हलके-फुलके प्रसंग चिन्मय मांडलेकरला मिळाले आहेत आणि तो त्यांच सोनं करतो. बाकी, सिनेमाचा शेवट मला तितकासा पटला नाही, पण प्रत्येकाची आपली मतं असतात.

मी झेंडा पहायला आणि शिवसेना-रा.स्व.संघ वाद पेटायला एकच गाठ पडली. आमचं अख्खं घर संघवाल्यांचं आहे. माझेही सुरूवातीचे संस्कार संघाचे आहेत. पण मी वेगळ्याच विचारांचा आहे ह्याचा प्रत्यय मला वेळोवेळी येत राहातो. तसंच, यावेळीही. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे संघाने यात पडायलाच नको होतं. संघाचे काय विचार आहेत, हे विचारलंय का कोणी? उगाच हात दाखवून अवलक्षण. करूनच्या करून कॉन्ग्रेस नामानिराळी राहिली आणि हे भांडतायत आपापसांत. महाराष्ट्राची इमेज खराब होतेय म्हणून आपले मुद्दे न मांडणे म्हणजे पळ्पुटेपणा आहे. त्या येड्डियुराप्पांना असते का कर्नाटकाची इमेज खराब व्हायची काळजी? करुणानिधिला वाटते का देशभराच्या प्रसारमाध्यमांना तामिळमध्ये मुलाखत देताना लाज? मग आमचे गडकरी कशाला लगेच भाजप प्रांतवादी नाही म्हणून सफाया देत फिरतायत? कोणी विचारलंय का तुम्हाला? आणि असाल तुम्ही प्रांतवादी तर त्याने कुणाला काय फरक पडतोय? त्या आत्महत्या करणा-या शेतक-यांनाही फरक पडत नाही आणि स्फोटांमध्ये मरणा-या सामान्य माणसालाही फरक पडत नाही. तुमचा खेळ होतोय श्रेयासाठी, पण अब्रू मराठी माणसांची जातेय.

आज गेली पन्नास वर्षं "जय हिंद! जय महाराष्ट्र!" म्हणूनही मराठी माणसांना धमक्या दिल्या जात आहेत. आणि मराठी माणसांना एकराष्ट्रीयत्वाचा शहाणपणा कोण शिकवतंय, तर आपले लुंगिशिवाय इतर कोणत्याही पेहरावात न दिसणारे माननीय गृहमंत्री चिदंबरम. आता त्यांना विचारावंसं वाटतं, की तुम्हाला जसा तुमच्या तामिळचा अभिमान आहे, तसा आम्हाला आमच्या मराठीचा आहे, मग तो आम्ही आमच्या राजधानीत दाखवला तर चुकलं कुठं? तुमच्या चेन्नई (सॉरी, आपली नाही का?) पेक्षा तरी आम्ही निश्चितच सहिष्णु आहोत. किमान हिंदीत बोलल्यावर अपमान तरी नाही करत आम्ही!  आणि पुन्हा, आम्ही आज जे थोडे काही जागे झालो आहोत, ते पन्नास वर्षे परप्रांतियांकडून संपूर्ण विकास करून घेतल्यावर (लालू-नितीश असंच कायसंसं म्हणतात). ते ही केव्हा, जेव्हा इकडे मराठी गाणी एफ.एम. वर लावण डाउनमार्केट म्ह्टलं जाउ लागलं. जेव्हा मुंबईतल्या शाळेमध्ये मराठी शिकवण्याच्या सक्तिविरूद्ध कोर्टकेस झाली. जेव्हा दुकानांची बोर्डं मराठीत लावली तर धंद्यावर परिणाम होतो असं म्हणणारे लोक उघड माध्यमांमध्ये स्टार बनवले जाउ लागले. जेव्हा बेरोजगार मराठी पोरांच्या घरी येणा-या पेपरांमध्ये महाराष्ट्रातल्याच भरतीच्या जाहिराती गेली कित्येक वर्षे येत नाहीत, हे तेव्हढीच वर्षे बिहारचे रेल्वे मंत्री झाल्यावर लक्षात आलं. जेव्हा महाराष्ट्रात चाळिस वर्षे राहून, भरभरून पैसे कमावून पुन्हा "हम यूपी वाले हैं, हिंदी में ही बोलेंगे, महाराष्ट्रवाले हमें माफ करें!" असं प्रसारमाध्यमांसमोर आढ्यतेने आणि चेह-यावर छद्मी हसू आणून म्हणण्याची काही अतिशहाण्यांची हिम्मत व्हायला लागली. जेव्हा महाराष्ट्रातून, दोन जागी विधानसभेवर निवडून जाणारा आमदार, जो फक्त प्रक्षोभक भाषणे द्यायचा तो फक्त लोकांना डिवचण्यासाठी हिंदीत शपथ घेण्याची स्टंटबाजी करू धजावला आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये हीरो ठरवला गेला. जेव्हा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी परवाना मिळवतानाही मराठीची सक्ति नको हे सांगयला बिहारचा मुख्यमंत्री उठला आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री (जे स्वतः आणि त्यांचे पूर्वसुरी गेली कित्येक वर्षं दिल्लीत बायकांच्या साड्यांना इस्त्र्या करत आलेत.(अगदी झेंडात म्हटलंय तसं) )सरकारच्या गेले कित्येक वर्ष अस्तित्वात असलेल्या कायद्यावरून मागे फिरले. आणि जेव्हा स्वतः कुठेही कुठल्याही माणसांमध्ये एकमेकांशी अगदी ठासून गुजराती बोलणारे गुजराती आम्हाला आमच्याच राज्यात चारचौघांमध्ये हिंदीत बोलण्याचे धडे द्यायला लागले.

तसं बघायला गेलं तर उशीरच झाला म्हणायचा. आधीच जर हिंदी बोलणा-यांचा अपमान केला असता, तर कमीतकमी दुस-यांकडून प्रगती करून घेतल्याचं पातक तरी लागलं नसतं. बॉम्बेचं मुंबई केल्यावर आपली खिल्ली आवर्जून चेन्नई म्हणणा-या चिदंबरम साहेबांनी तरी कमीत कमी उडवली नसती. अरे हो पण तेव्हा कदाचित चिदंबरम साहेबांना हिंदी आलं असतं.

ता.क. - आता राहुलजी गांधींच्या मते, बिहारी आणि यू.पी. च्या कमांडोनी मुंबईला दहशतवादी हल्ल्यातून वाचवलं. आपण वेडेच की, करकरे, साळसकर आणि कामटे मुंबईला वाचवायला गेलेच नव्हते. तुकाराम ओंबाळे मूळचे बिहारी आहेत. आणि, मेजर उन्नीकृष्णनसुद्धा यू.पी.बिहारचेच. जाउ दे, आपण असल्या मूर्ख आणि अक्कलशून्य वक्तव्यांना कशाला भाव द्यायचा म्हणताय? खरं आहे हो, पण ह्याच गृहस्थांच्या वक्तव्यांना आजच्या तरुणाई्चं प्रतिबिंब मानतात हो.