5/02/2013

सफ़रकी ज़िंदग़ी

आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर राहण्यासाठी नोकरीतल्या कामासाठीच पडलो. तोपर्यंत सुरक्षित वातावरणात आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच सर्व काही. शाळा, कॉलेज इतकंच काय नोकरीसुद्धा फार दूर नाही. पण मग ती संधी मिळाली आणि एकदमच मी उघड्यावर पडलो.
एकंदर भारतीयच नव्हे तर सर्वच समाजांची एक मानसिकता असते, ती म्हणजे सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीत आलं की एकत्र गट करून राहण्याची, एक प्रकारे स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करून घ्यायची. स्वतःच्या संस्कृतीचं संरक्षक कवच, किंवा आपल्यासारख्याच माणसांचं संरक्षक कवच. ते नैसर्गिक आहे, त्यात काही चूक/बरोबर नाही. पण सांगायचा मुद्दा हा की माणूस आपली सोय पाहतो, कम्फर्ट झोन पाहतो. सहसा माणसाला अनोळखी वातावरणात फार वेळ राहायला आवडत नाही. माणूस अवघडून जातो. आणि ते अवघडलेपण अनावर झाल्यावर तो तिथून काढता पाय घेतो. अनोळखी प्रदेशामध्ये, अनोळखी देशामध्ये, अनोळखी संस्कृतीमध्ये हेच होतं आणि म्हणूनच माणसं कदाचित आपल्यासारख्या सवयी असलेले, आपल्या संस्कृतीतले असे गट बनवून राहतात, एकमेकांना धरून राहतात. मग, चायना टाऊन, इंडिया टाऊन असे प्रकार उदयास येतात.
हे सगळं सांगण्याचं कारण असं की, मीदेखील ह्या नियमाला अपवाद नव्हतो. आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर, वेगळ्याच देशात, सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीमध्ये पोचल्यावर मी अवघडून गेलो आणि आमच्याच कंपनीच्या इतर माणसांच्या आधारानं राहू लागलो. काही काळानं तेच कुटुंब बनून जातं अन तसंच झालं. पण ह्यामध्ये भीती ही असते की आपण ज्यांच्या आधारानं राहतो आहोत, ते ही अशाच विचारानं एकत्र राहत असतील तर मग आपण ज्या नव्या संस्कृतीमध्ये आलो आहोत, तिची तोंडओळखही होणं मुश्किल होऊन बसतं. अन मला ही गोष्ट लक्षात यायला बराच काळ जावा लागला. नोकरीनिमित्तानं अनेक माणसं भेटली आणि वेगवेगळ्या माणसांमधली वेगवेगळी वैशिष्ट्य पाहताना माझ्या हे लक्षात येत गेलं की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचा प्रयत्न न करून खूप काही गमावतोय. आणि इथेच माझ्यात थोडा बदल व्हायला सुरूवात झाली. मी ओळखीची वर्तुळं सोडून अनोळखी जागी फिरू लागलो. अनोळखी प्रदेश, अनोळखी खाद्यपदार्थ, अनोळखी रस्ते, अनोळखी कला, अनोळखी बाजार, अनोळखी माणसं मला बरंच काही शिकवूही लागली अन बराच आनंदही देऊ लागली. पण एक खरं की हे अनुभव घ्यायला एकटं असणं गरजेचं असतं कारण सोबत कुणीही असलं तरी नकळतच आपण एक सुरक्षा कवच बनवून घेतो, दुसर्‍या व्यक्तीशी अजाणतेपणी जोडलं गेल्यानं अनुभव सीमित होऊ लागतात. पण त्यामध्ये धोकाही असतोच, चुकीची माणसं, चुकीच्या जागी अन चुकीच्या वेळी भेटली तर मग मदतीला कुणीही नसण्याचा धोका. पण जगात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी धोके हे पत्करावेच लागतात. ओळखीची वर्तुळं सोडणं म्हणजे कायमची सोडून आपल्या मुळांपासून विलग होणं नव्हे, पण घरटं सोडून कधी कधी भरारीही मारावी लागते, तरच पुन्हा घरट्यात परतण्याची मजा येईल.
मुळात माझं राहणं म्हणजे आता विंचवाचं बिर्‍हाड. पाठीवर घेऊन फिरायचं सगळंच. त्याचे फायदेही तितकेच अन तोटेही तितकेच. आणि त्यात हे अनोळखी जग पाहणं म्हणजे अनेकानेक अनोळखी माणसं भेटणं आलं. कधी भाषाही न समजता आपणहून मदत करणारी छोट्या दुकानाची मालकीण, तर कधी मुलाला फोन लावून त्याच्यामार्फत इंग्रजी भाषांतर करून मदत करणारा टॅक्सी ड्रायव्हर, कधी भारतीय बंधू म्हणून ग्लासभर पाणी आणि मेट्रोचं तिकीट बळेच हातात कोंबणारा सरळसाधा भारतीय आयटी इंजिनियर तर कधी सगळी ट्रामची तिकीटं विकणारी दुकानं बंद असतील म्हणून आपल्याकडचं एक तिकीट मला देऊ करणारी अनोळखी व्यक्ती. एक ना अनेक व्यक्ती, त्यांची वैशिष्ट्य त्यांचं वागणं, त्यांची एखादी कृती किंवा एखादं वाक्य कायमचं मनात घर करून जातं.
काही दिवसांपूर्वीच मी नेहमीप्रमाणे फारसं काहीही ठाऊक नसताना दूरवरच्या ठिकाणी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभा होतो. नेहमीप्रमाणेच अनोळखी माणसानं बस नंबर, बस मार्ग आणि बसच्या वेळेपासून पुरती मदत केली. परतीच्या वेळेस शेजारच्या सीटवर बसलेल्या माणसाशी झालेलं संभाषण मात्र रोचक होतं. देश, इथलं जगणं, तिथलं जगणं इतक्या सगळ्या गप्पा झाल्यावर तो 'आपल्यासारखं, आपण' असं बोलण्याइतपत मोकळा होत गेला. शेवटी माझा स्टॉप आला तेव्हा तो एकदम म्हणाला, "आपकी मंज़िल आ गई भाई. सफ़रकी ज़िंदग़ी थी, सफरके साथ ही खत्म हो जायेगी!" मला पटकन काय बोलायचं ते सुचेना. मी हात मिळवला आणि "थँक यू भाई!" म्हणून विचित्र भावना सोबत घेऊन बाहेर पडलो.
मी हळूहळू चालत होतो पण त्याचे शब्द तसेच डोक्यात रूंजी घालत होते. 'सफ़रकी ज़िंदग़ी'; खरंच आपलं आयुष्य असंच तर आहे. ह्या वळणावर ही व्यक्ती तर त्या वळणावर अजून कुणी. एकदम तात्विक पातळीवर विचार केला तरी आयुष्याच्या प्रवासात अशीच तर माणसं वळणावळणावर भेटतात, विलग होतात, हरवून जातात. चक्र सुरू राहतं अन मग पुन्हा नवा मुसाफ़िर भेटतो.
आपण नाती इतकी धरून का ठेवतो त्याचं कारण त्या क्षणी मला कळलं. त्या फक्त ३०-४० मिनिटांच्या संवादानंतर त्याला अन मला दोघांनाही पुन्हा अनोळखी होऊन गर्दीत हरवून जाणं एव्हढं विचित्र का वाटावं? कुठेतरी त्या अनोळखी गर्दीमध्ये आपल्यासारखं कुणीतरी भेटणं म्हणजे गर्दीत हरवून गेलेल्या स्वतःलाच स्वतः सापडण्यासारखं वाटत असेल. आपली नाती म्हणजे तरी काय असतं, आपलंच एक प्रतिबिंब असतं, आपली एक ओळख असते. ती आपल्याला कुठेतरी आपल्या मुळांकडे घेऊन जाते. कुठल्याही कारणाने कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्यावर परतीचे रस्तेच मिळत नसतात तेव्हा सापडलेलं कुणीतरी आपल्यासारखं हे आपल्याला आपलीच हरवलेली ओळख परत मिळवून देतं आणि आपण आश्वस्त होतो. पण तोच धागा परत तुटताना अस्वस्थ होतो. मग नात्यांची किंमत कळू लागते.
पण ह्या 'सफ़रकी ज़िंदग़ी'नंच मला खूप सारी अशीही नाती दिली जी माझी मुळांशी असलेली नाळ कायम ठेवतात. ही नाती आहेत हा दिलासासुद्धा बरेचदा 'सफ़र' सुहाना करतात. रात्री अकरा वाजता, मी तिच्या देशात येणार म्हणून अख्ख्या कुटुंबासाकट तब्येतीचीही तमा न बाळगता मला फक्त भेटायला म्हणून एअरपोर्टवर आलेली तन्वीताई, त्याच रात्री मला फार वेळ एअरपोर्टवर वाट पाहावी लागेल म्हणून घरी घेऊन जाऊन मला चहा अन खायला देणारी ताई. एव्हढा उशीर झालेला असूनही गप्पा मारणारी अन गमतीजमती करणारी तिची लाघट पोरं, पुन्हा रात्री दीड वाजता मला योग्य ठिकाणी नेऊन सोडणारा तिचा नवरा अमितदादा. ही सगळी नाती सफ़रमध्येच बनली, किंबहुना 'सफ़र' हेच कारण ह्या नात्यांचं. मग सफ़रची भीती का बाळगा.
एव्हढं विचारचक्र फिरल्यावर माझ्या लक्षात आलं की हा सततचा प्रवास जितकं घेतो तितकंच भरभरून देतोही. तो Homeostatic आहे. कधीतरी आयुष्यात आपलं जहाजही नांगर टाकेल. प्रवासात खंड पडेल, तेव्हा प्रवासानं दिलेलं सगळं काहीच कामाला येईल. 'सफ़रकी ज़िंदग़ी' ज़िंदग़ीका सफर सुहाना कर देगी.

3/23/2013

आवर रे-४

(टीप  - पोस्टमधला विषय थोडा संवेदनशील आहे. पोस्टमधल्या मतांबद्दल बरीच मतभिन्नता असू शकते.)

"बब्या!" खणखणीत आवाजात मारलेल्या ह्या हाकेनं ऑफिसचा कॅफेटेरिया दणाणून गेला. बभ्रुवाहनानं मनाशी कितीही ठरवलेलं असलं की 'बब्या' ह्या हाकेला ओ द्यायची नाही, तरी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. चारचौघात अशी हाक मारणारा केवळ 'डी'च असणार ह्याची खात्री आणि आपल्या ऑफिसच्या कॅफेटेरियात डी कसा काय शिरू शकतो ह्याचं आश्चर्य असे मिश्र भाव बब्याच्या चेहर्‍यावर उमटलेले होते.
बब्यानं हाकेला प्रतिसाद दिल्यानं व्हायचं तेच झालं होतं आणि कोपर्‍यात बसलेल्या 'ति'च्यासकट लंचटाईम असल्यानं कॅफेटेरियात उपस्थित जवळपास अख्ख्या ऑफिसला 'बॉबी'चं खरं टोपणनाव कळलं.
जसजसा डी बब्याच्या टेबलाकडे सरकू लागला तसतसं बब्याची 'उद्यापासून आपल्याला एकटंच जेवायला बसावं लागणार' ही जाणीव गडद होऊ लागली. जाणीव पुरती गडद होण्यापूर्वीच डी टेबलापर्यंत पोचला आणि त्यानं 'जरा सरकता का' म्हणून पूर्ण करण्यापूर्वीच बब्याचे मित्र शेजारच्या टेबलावर जाऊन बसले.
"काय  खातोयस?" दृष्टद्युम्नानं पहिला सवाल केला.
"तू माझ्या ऑफिसात काय करतोयस?"
"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे."
"तू स्मार्ट आहेस ना फार, मग मी जेवतोय एव्हढं साधं तुला कळू नये."
"तू जेवतोयस हे मला कळलंय विक्रमा, पण तुझ्या ताटात झालेला हा काला नक्की कशाकशापासून बनलेला आहे हे तुला ठाऊक असूनही जर तू मला सांगितलं नाहीस, तर तुझ्या.."
"कळलं कळलं वेताळा." बब्या आजूबाजूला सलज्ज दृष्टीक्षेप टाकत मनातल्या मनात उत्तराची जुळवाजुळव करू लागला.
"ऍज एक्स्पेक्टेड." डी म्हणाला.
"काय ऍज एक्स्पेक्टेड."
"चल ऊठ लगेच." असं म्हणत डी उठून उभा राहिलासुद्धा.
"कुठे ऊठ, बस खाली गपगार. माझा अटेंडन्स कट होईल बाहेर पडलो ऑफिसातनं तर."
"मी कुठे म्हणतोय ऑफिसातनं बाहेर जायला. तुझ्या जागेवर चल, आत्ता तिथे कुणी नसेल नाही का?"
पहिल्यांदाच बब्याला डीचं म्हणणं पटलं.
"पण मग ह्याचं काय?" बब्या ताटाकडे बोट दाखवत म्हणाला.
"मी तुझ्या जागेवर थांबतो. तुला जी काय विल्हेवाट लावायची असेल ती लावून ये." आणि डी निघूनसुद्धा गेला.
बब्यानं भराभर तोंडात घास कोंबले आणि नजरा चुकवत तो आज्ञाधारकपणे डीने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जागेकडे गेला.
"अजून १५ मिनिटं शिल्लक आहेत तुमचा लंचटाईम संपायला." डीनं बब्याच्या कॉम्प्युटरवरच्या घड्याळाकडे बघत म्हटलं.
"तू  पीसी अनलॉक कसा केलास?"
"आत्ता तुला खरंच त्याबद्दल बोलायचंय?"
"मग कशाबद्दल बोलायचंय?"
"लेट्स टॉक अबाऊट द एलिफंट इन द रूम."
"व्हॉट एलिफंट." बब्या खांदे उडवत शेजारच्याची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.
"अरविंदनं आत्महत्या केली."
बब्यानं एकदम चमकून डीकडे पाहिलं. "त्याबद्दल काय? त्यानं काल आत्महत्या केली आणि त्याच्या उत्तरक्रिया कालच आपण सर्वजण उरकून आलो."
"आपण सर्वजण उरकून आलो पण तू उरकल्या आहेस काय?"
"म्हणजे?"
"बब्या, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर गेलाय. तू नेहमीसारखा कंट्रोलमध्ये राहायचा प्रयत्न करत नाहीयेस. मला खोडून काढत नाहीयेस. माझ्या प्रत्येक वाक्याला प्रतिमुद्दा द्यायचा प्रयत्न करत नाहीयेस. त्याहीवर म्हणजे चक्क मी सांगितलेलं ऐकतोयस. आणि तुझं म्हणणं आहे की उत्तरक्रिया उरकल्यास."
"ह्या सगळ्याचा आणि उत्तरक्रियांचा काय संबंध?"
"आपल्या वैदिक आणि पौराणिक विचारांप्रमाणे आत्मा मानवी शरीर सोडल्यावर पुढल्या प्रवासाला जातो. त्यामुळे आपण सहसा 'ईश्वर मृतात्म्याला सद्गती देवो' असं म्हणतो, जेव्हा बाकी धर्म 'मृतात्म्यासाठी शांती' मागतात."
"डू यू हॅव अ पॉईंट?"
"बघ, तू मुद्द्याबद्दल बोलणं टाळतो आहेस."
"तू असंबद्ध बोलतो आहेस."
"मी असंबद्ध बोलत नाहीये. मी मुद्द्याकडे येतोय, ज्यासाठी पार्श्वभूमी आवश्यक आहे."
"बरं पुढे." बब्याचा स्वर थोडा रूक्ष झाला होता.
"आपल्या पूर्वजांचा कन्सेप्ट क्लिअर होता. आदमी खतम काम खतम. तो गेला की गेला. उगाच तो आसपास आहे की वर खाली आहे की घुटमळतोय वगैरे नाही. एकदा पिंडदान झालं की माणूस गेला."
"मग ते कावळा न शिवणं वगैरे?"
"ते सगळं जिवंत माणसांची समजूत काढायला. आता उदाहरण देतो, असं बघ, माझं कुणी फार जवळचं गेलं."
"कशाला?"
"अरे उदाहरण आहे. आणि मी माझंच देतोय ना?"
"पण कशाला?"
"तुझं दिलं तर चालेल?"
बब्या शांत बसला.
"तर  माझ्या कुणीतरी जवळचं म्हणजे आपसूकच मला त्या व्यक्तिच्या अपूर्ण इच्छा वगैरे माहित असण्याची शक्यता असणार. मग माझ्या जवळचं म्हणजे मला त्या इच्छा अपूर्ण राहिल्याबद्दल प्रचंड वाईट वाटत राहणार. डाचत राहणार. ते होऊ नये म्हणून मग पिंडदान करत असावेत."
"तुझं म्हणणं आहे की सगळं काही जिवंत माणसासाठीच असतं?"
"एक्झॅक्टली माय पॉईंट. नाहीतर कुणासाठी असणार? अरे आपण माणसं फार स्वार्थी असतो. मृतासाठी वगैरे सगळं बोलायला रे. खरं म्हणजे एव्हरिथिंग इज अबाऊट अस."
"असं का म्हणतोस?"
"त्यात काही वाईट आहे म्हणत नाही मी. इट्स बेसिक ह्युमन नेचर."
"म्हणजे?"
"म्हणजे बघ. माणूस जातो तेव्हा आपण प्रचंड रडारड करतो किंवा प्रचंड दुःख करत राहतो. बोलत नाही, खात नाही, पित नाही. हसणं वगैरे सगळं बंद."
"अरे मग दुःख होऊच नये का?"
"मी कुठे नाही म्हणतो. पण बेसिक गोष्ट ही आहे की ते दुःख कशाबद्दल असतं, तर तो माणूस आपल्याला सोडून गेला. आणि आता आपलं काय होणार."
"मग बरोबर आहे की."
"बरोबर काय आहे? आत्महत्या केलेल्या लोकांबद्दल फुकाची हळहळ व्यक्त करणारे गावभर आहेत."
"अरे म्हणजे काय? वयाच्या ९व्या वर्षापासून २७ व्या वर्षापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त-कमी असू शकेल, अकाली आत्महत्या करणार्‍यांबद्दल हळहळ व्यक्त करायला नको? किंवा कर्जबाजारी झाल्यानं किंवा इतर कारणांनी वैफल्य आल्याने भरल्या संसारातून उठून जाणार्‍यांचं काय? आपल्या मुलाबाळांना मारून आत्महत्या करणार्‍यांचं काय?"
"मुलाबाळांना मारणं डझन्ट काऊंट ऍज आत्महत्या. आणि बाकीच्यांबद्दल हळहळ व्यक्त करून काय होणार आहे?"
"अरे म्हणजे काय? वाईट वाटतं. ते बरंच काही करू शकले असते आयुष्यात."
"असं कोण म्हणतं? देव काय तुम्हाला कानात सांगायला आलेला?"
"तू देवाचा उल्लेख करतोयस?"
"माझ्या प्रश्नाचं उत्तर दे."
"व्हॉट्स युअर पॉईंट?"
"माझं म्हणणं आहे की माणसानं आत्महत्या करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि उगाच त्याला गुन्हा वगैरे लेबलं लावू नयेत."
"९ वर्षांच्या मुलानं गणितात फेल झाल्यामुळे आत्महत्या करायची ठरवली तर तो त्याचा प्रश्न कसा ठरू शकतो?"
"का नाही ठरू शकत? जीव त्याचा आहे."
"पण त्याला समज कुठेय पुरेशी?"
"ते ठरवणारे तुम्ही कोण?"
"डी तू बरा आहेस ना?"
"हे बघ. माणूस गेल्यानंतर आपण शोक करणं मी समजू शकतो कारण ते आपलं नुकसान असतं ज्यासाठी आपण आदळआपट करतो. पण आत्महत्या केलेल्या माणसांना ते चुकले होते असं म्हणायचा आपल्याला काही अधिकार नाही."
"असं कसं डी?"
"बरं थांब मी स्पष्ट करतो. आयुष्य म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय?"
"डी. माझा लंच टाईम संपत आलाय."
"एक क्लोझेस्ट ऍनॉलॉजी देतो. प्रिझन. अर्थात जेल."
"आता मी म्हणजे कसं काय असं विचारायचं का?"
"हे बघ. जेव्हा माणूस जेलमध्ये जातो तेव्हा तो खूप दुःखी होतो. त्याला रूळायला वेळ लागतो. तो जेलमध्येच असतो. त्याला बाहेरचं जग नसतं. कधीतरी एखादी झलक दिसतेही उंचच उंच भिंतीपलीकडली पण ती खरी का आभास तेही कळण्यापलिकडे मन पोचलेलं असतं."
"युअर पॉईंट बिईंग?"
"आयुष्य म्हणजे एक प्रिझन आहे. आपल्याला जन्माला आल्यावर रूळायला वेळ लागतो. ह्या जगापलिकडे, आपल्या इंद्रियांपलिकडे, ह्या तीन मितींपलिकडे काही जग आपल्याला नाही. कधीतरी आपल्यातल्या कुणालातरी अतिंद्रिय शक्ती जाणवतात, चौथी मिती खुणावते पण मग ती खरी की खोटी, सत्य की आभासी ते कुणालाच सांगता येत नाही. जेलमध्ये जसे लोक छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात तसे आपण प्रेम, वाढदिवस, शैक्षणिक आणि व्यावसायिक यश वगैरे गोष्टींमध्ये आनंद मानतो. मानणं भागच असतं नाहीतर आपली शिक्षा भोगून संपायची कशी? डिस्ट्रॅक्शन तर हवं ना?"
"म्हणजे आयुष्य ही शिक्षा आहे तुझ्या मते."
"माझ्याच नाही आपल्या पूर्वजांच्या मते देखील. मनुष्यजन्म आपल्याला पापं फेडण्यासाठी मिळतो. रादर सगळेच जन्म. एकदा पापं फेडून झाली की आत्म्याला मुक्ती. एनर्जी रिलीज होते. तोपर्यंत शरीरं बदलत राहायचं. पापं फेडत."
"तू चक्क वेदांचे दाखले देतोयस?"
"नाही. मी मला पटलेलं तत्वज्ञान सांगतोय. अरे जेव्हापासून ऐकतोय. जगी सर्वसुखी असा कोण आहे? असले सवालच ऐकतोय. एक माणूस मला आजवर सापडला नाही जो सुखी आहे. त्याचं कारण हेच की सुख हा उतारा आहे."
"सुख मानण्यावर असतं."
"आणि दुःख?"
"ते पण मानण्यावर."
"चूक. ते मानण्यावर नसतं. ह्या सर्व संतांनी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केले. त्यांनी सगळ्या भावनांवर जय मिळवला पण कुठेतरी खोलवर प्रत्येकाच्या तत्वज्ञानात दुःखाचा अमीट अंश आहे. दुःख ही शाश्वत भावना आहे. तिला एक्झॅक्टली दुःख म्हणून लेबल करता येणार नाही एखादवेळेस. पण एक हूरहूर, एक संतत रूखरूख ही प्रत्येक जीवाला उपजतच असते. ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. कुणी संत बनून सर्वसंगपरित्याग करून ती दूर करायचा प्रयत्न करतात, तर काही जण ह्यू हेफ्नर बनून. अंतिमतः काय की शिक्षेचा कालावधी पूर्ण करण्यास उपयुक्त अशी ती रूखरूख असते."
"पण मग शिक्षा संपल्यावर काय?"
"शिक्षा संपल्यावर काय, हे जेलमध्ये गेलेल्यांना तरी कुठे ठाऊक असतं. पलीकडे आपलं कुटुंब वाट बघतंय की ओसाड पडलेलं घर आणि संपलेली, विझलेली नाती हे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही."
"मग आत्महत्या म्हणजे?"
"प्रिझन ब्रेक."
"वो वो... एक मिनिट. धीस इज नॉट द टाईम."
"धीस इज द टाईम. कधी विचार केलायस तू की की तुझ्या अन माझ्या आवडत्या 'प्रिझन ब्रेक' ह्या सिरीजचा पॉईंट काय होता?"
"काय पॉईंट होता. एन्टरटेनमेन्ट."
"तो एक. पण महत्वाचा म्हणजे मायकेल मरतो. सगळ्या ताणतणावांनंतर तो एकटाच प्रिझन ब्रेक करतो. बाकी सगळे भौतिक जगातल्या जेलमधून बाहेर पडतात. पण खरा 'प्रिझन ब्रेक' मायकेल करतो."
"डी, मला वाटतं आता तू घरी जायला हवंस."
"नाही. ऐकून घे माझं. तू म्हणत होतास नऊ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली तर ते चूक की बरोबर, किंवा फॉर दॅट मॅटर कुणीही आत्महत्या करणं चूक की बरोबर."
"मी असा प्रश्न विचारत नाहीये. माझ्या मते प्रॉमिसिंग आयुष्य असू शकणार्‍यांनी आत्महत्या करणं चूक."
"प्रिसाईजली माय पॉईंट. कोण ठरवणार प्रॉमिसिंग आयुष्य आहे की नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ना. त्याला/तिला नसेल वाटत अजून लढावंसं. त्यांना फोर्स करणारे आपण कोण? आणि ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी हे ठरवणारे तरी आपण कोण? कदाचित त्यांचा निर्णय बरोबर होता. त्रास संपून त्यांना मुक्ति मिळाली असेल. आपण जेलमध्ये खितपत पडलो म्हणून त्यांनीही आपल्यासोबत खितपत पडून राहायचा हट्ट आपण का धरावा? उलट आपण त्यांच्यासाठी आनंदी व्हायला हवं की त्यांना बाहेरचा रस्ता सापडला."
"अरे म्हणजे काय कुणी आत्महत्या करत असेल तेव्हा त्याला परावृत्त करायचेही प्रयत्न करायचे नाहीत?"
"कोण म्हणतंय असं. करा ना प्रयत्न. स्वतःच्या मनःशांतीसाठी नक्की करा प्रयत्न."
"स्वतःच्या मनःशांतीसाठी?"
"मग काय तर? माहित असूनही मदत न केल्याचं ओझं आयुष्यभर कोण वागवेल?"
"तुझ्या मते मनुष्यजात एव्हढी स्वार्थी का आहे रे? कुणी जेन्युईनली चांगलं वागतच नसेल का?"
"नाही. इट्स ऑल इन द वायरिंग."
"कसलं?"
"डोक्यातलं. मेंदूतलं वायरिंग. प्रत्येक माणसाचं एका विशिष्ट पद्धतीनं झालेलं डोक्यातलं वायरिंग. जेनेटिकली, ऍट्मॉस्फेरिकली, इमोशनली, वेगवेगळ्या फॅक्टर्सनी तयार झालेलं आणि कायम इव्हॉल्व्ह होत असलेलं, बदलत असलेलं मेंदूतलं वायरिंग. आपल्याला कुणाचा स्वभाव आवडतो तेव्हा आपल्याला ते वायरिंग आवडलेलं असतं. चांगुलपणा, दुष्टपणा सगळं सगळं केवळ वायरिंग. देअर इज नथिंग जेन्युईन. काहींना चांगलं वागायला आवडतं तर काहींना वाईट. काहींना मनाविरूद्ध चांगलं वागण्यातनं किक मिळते तर काहींना मनाविरूद्ध वाईट वागून. इट्स टेक्निकली द सेम थिंग."
"तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का?"
"मी एव्हढंच सांगतोय की आत्महत्या करणं इज अ टाईप ऑफ 'प्रिझन ब्रेक'. तुरूंग तोडून पळणं आहे ते."
"म्हणजे तो सुटला असं म्हणायचंय का तुला?"
"नॉट नेसेसरिली. पण त्यानं प्रयत्न केला."
"?"
"म्हटलं ना, पापं फेडेपर्यंत जन्म घेतंच राहायचं."
"पण कुठली पापं? मुळात कुठेतरी पापं केल्याशिवाय का जन्म घेत राहायचं?"
"प्रत्येक जन्मातली."
"पण मग मुळातला जन्म कुठल्या पापांमुळे?"
"मुळातला जन्म हा क्रिएशन. आणि तोच शेवटचा देखील ठरू शकतो. पण तिथेच हिशोब चुकते झाले नाहीत तर पुन्हा जन्म-मरणाचं चक्र सुरूच."
"आणि तुझा ह्या सगळ्यावर विश्वास आहे."
"नाही. मी तुला लॉजिक एक्स्प्लेन केलं."
"मग तुझा विश्वास कशावर आहे."
"आयुष्य ही शिक्षा आहे ह्यावर."
"डी. आर यू ऑलराईट ब्रदर."
"हे बघ. आपण नेहमीदेखील ब्रेकिंग आऊट ह्या कन्सेप्टवरच आपली आयुष्य उभारतो. चक्रातून बाहेर पडत राहणं हा आपल्या आयुष्यांचा स्थायीभाव आहे. अरे एव्हढंच कशाला, ज्या संस्कृतींमध्ये सद्गती म्हणून कन्सेप्ट्स नाहीत, तिथेही शेवटी मोक्ष हा फंडा वापरलाच जातो. आपण मृत्यूनंतरच्या आयुष्यातसुद्धा पुन्हा चक्र आणि मोक्ष हे फंडे कल्पिले आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग आहे असं म्हणतोस की ही कुठल्या प्रकारची अतिंद्रिय जाणीव आहे असं वाटतं तुला?"
"तू इथे तत्वज्ञानावर आणि मृत्यूनंतरच्या आयुष्यावर चर्चा करायला आलायस का?"
"नाही पण तू विचारलंस त्या प्रश्नाचं उत्तर हे की, आत्महत्या हे सोल्युशन असेलच असं नाही."
"मग तू सपोर्ट कशाला करतोयस?"
"मी विरोध करत नाहीये, दोन्हींमध्ये फरक आहे."
"डी. आपल्या जिवलग मित्रानं आत्महत्या केली. आय कॅन अन्डरस्टँड इफ यू फील बॅड."
"दॅट्स द पॉईंट. आय डोन्ट फील बॅड. आणि तुलासुद्धा वाईट वाटता कामा नये. तो त्याचा निर्णय होता आणि आपल्याला त्या निर्णयाविरूद्ध बोलायचा किंवा त्याच्यावर टीका करायचा अधिकार नाही."
"मला वाईट वाटता कामा नये हे ठरवणारा तू कोण?"
"राईट. मला माफ कर. एका दिवसामध्ये तुझंसुद्धा दुःख कमी होईल अशी अपेक्षा मी करू शकत नाही."
 "एक दिवस? डी. अरविंदला जाऊन सात दिवस झालेत."

डीनं बब्याकडे एक कटाक्ष टाकला.
"अरे असा काय बघतोयस?"
बब्याच्या ऑफिसची मंडळी एव्हाना आपापल्या जागेवर परतू लागली होती.
डी उठून उभा राहिला. "नाईस टू हॅव यू बॅक ब्रदर." म्हणून तो दरवाज्याच्या दिशेनं चालायला लागला.