2/24/2011

क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अस्त

ट्युनिशियन क्रांतीनंतर पुढे जे घडतंय ते पाहून मला ती एका हत्तीच्या पिल्लाची गोष्ट आठवते. एका छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला पकडून आणून प्राणीसंग्रहालयामध्ये एका छोट्याशा दोराच्या तुकड्यानं एका मोठ्या खिळ्याला बांधून ठेवलं. बांधल्या बांधल्या काही दिवस त्यानं त्या दोराला झटके द्यायचा प्रयत्न केला, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला तो दोर तोडणं, किंवा तो खिळा उखडणं जमलं नाही. हळू हळू ते पिल्लू मोठं होऊ लागलं, पण वर्षांनुवर्षं त्या पिल्लाला एक छोटासा फेरफटका मारून आणून पुन्हा त्याच दोरीच्या तुकड्यानं बांधून ठेवलं जात होतं. पिल्लाचं रूपांतर मोठ्या हत्तीत झालं, पण कधीच त्या हत्तीनं त्या दोराला एक झटका द्यायचा प्रयत्न केला नाही. कारण त्याच्या मनात लहानपणी केलेले असफल प्रयत्न ताजे होते. त्याच्या बुद्धिसाठी तो दोर त्याच्या शक्तिपलिकडचा होता. प्रत्यक्षात आता मोठा झालेल्या हत्तीनं दिलेला हलकासा झटकाही तो खिळा उखडू शकत होता. पण त्याला स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. असंच काहीसं मध्यपूर्वेकडच्या वर्षांनुवर्षं एकाधिकारशाहीनं पिचलेल्या जनतेचं झालेलं होतं. त्यांना स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. मुहम्मद बुअज़िज़ीच्या बलिदानानंतर उसळलेल्या उत्स्फूर्त निदर्शनांपुढे सरकारी यंत्रणा हतबल ठरलेली दिसताच त्या आतल्या शक्तिची जाणीव बळकट बनली. आणि ट्युनिशियाच्या यशस्वी उठावानंतर तर समस्त अरब जनतेला आपल्या शक्तीची जाणीव झाली.
त्यातूनच मग बदलाची केव्हापासूनची लागलेली भूक डोकं काढून वर आली. समस्या कित्येक वर्षांपासून त्याच होत्या. असंतोष साचतच होता, पण प्रतिक्रिया नव्हती. आता आपणही काही करू शकतो ही भावना निर्माण झाली. अन इतक्या वर्षांच्या साचलेल्या असंतोषाला वाट मिळाली आणि तडकाफडकी सर्वप्रथम ट्युनिशियाच्या शेजारीच अल्जिरियामध्ये सरकारविरोधी निदर्शनं सुरू झाली.अल्जिरियामधली निदर्शनं फारशी ताकदवान नव्हती आणि अल्जिरियन सरकारची प्रतिक्रिया बरीचशी तत्पर होती. त्यातही पोलिस दलानं योग्य व्यूहरचना आखून परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाणार नाही, ह्याची काळजी घेतली. पण एव्हाना ट्युनिशिया हे अरब जगतात रोल मॉडेल बनू लागलं होतं. दूरवरच्या येमेनमध्ये आणि एक देश सोडून पलिकडे वसलेल्या इजिप्तमध्येदेखील असंतोष उफाळून यायची चिह्नं दिसू लागली.
इजिप्तचा इतिहास बराच विचित्र आहे. गमाल अब्देल नासर पासून सुरू झालेला लष्करशहांचा इतिहास मुबारकपाशी येऊन थांबतो. गमाल नासरनं 'एक अरब राज्य' ची संकल्पना प्रथम लोकांसमोर आणली. नासर बर्‍यापैकी उदारमतवादी होता अशी त्याची प्रतिमा तरी होती. अर्थात एक लष्करशहा जितका उदारमतवादी असू शकतो तितकाच तो होता. हा नासर म्हणजे तोच नेहरूं आणि मार्शल टिटोबरोबर 'अलिप्ततावादी चळवळ' स्थापनेत हातभार लावणारा. तर ह्या नासरला सर्व अरब राज्यं एका छत्राखाली आणायची इच्छा होती. तो अरब आयकॉन होता. त्याचाच विश्वासू म्हणजे अन्वर सादत. हादेखील लष्करी अधिकारीच. हा मात्र अर्धा इजिप्शियन आणि अर्धा सुदानी. कारण पूर्वीच्या काळी इजिप्त आणि सुदान एकच राष्ट्र होतं. त्यामुळे अन्वर सादत जरी अरब असला तरी कृष्णवर्णाकडे झुकणारा होता. पण अन्वर सादत नासरच्याही एक पाऊल पुढे उदारमतवादी समजला जात होता. वर्षानुवर्षं इस्रायलबरोबर चालू असलेल्या संघर्षात त्यानं फार मोठा बदल घडवला. इस्रायल अनेकदा इजिप्तला भारी पडलेलं होतं. इजिप्तची बरीच जमीन इस्रायलनं बळकावली होती.
सादत स्वतःही एकदा इस्रायलकडून मार खाल्लेला होता. सर्वप्रथम त्यानं भरपूर ताकद जमवून इस्रायलवर मोठा वार केला. ह्या पहिल्या धडकेनंच इस्रायलला धडकी भरली. इस्रायलनं परत हल्ला करून बरीचशी जमीन परत मिळवली. पण इजिप्तच्या सुरूवातीच्या मुसंडीनं इस्रायलला हे प्रकरण जड जाणार हे दिसू लागलं. एव्हाना इजिप्तच्या कामगिरीचं अरब जगात कौतुक होत होतं. सादत आता ज्यूंना भारी पडल्यामुळे अरबांचा आयकॉन बनू लागला होता. असं युद्ध वारंवार होणं इस्रायलला परवडणारं नव्हतं, त्यामुळे इस्रायलनं अमेरिकेकडे दाद लावली. अन अमेरिकेनं इजिप्तला मोठा आर्थिक मोबदला देण्याच्या बदल्यात इजिप्त-इस्रायल तह घडवून आणला. ह्या तहाअंतर्गत आजतागायत दरवर्षी इजिप्तला १.३ बिलियन डॉलर्स मिळतात. ज्यातून इजिप्तनं आपलं सैन्यदल बरंच विकसित केलं आहे. पण ह्या तहानं सादतची प्रतिमा डागाळली. मध्यपूर्व शांत झाली, पण इजिप्तच्या सैन्यात थोडा असंतोष दाटला. ह्यातनंच सादत मिलिटरी परेड पाहत असताना सैन्याच्याच लोकांनी सादत बसलेल्या गॅलरीवर गोळीबार केला आणि सादतचा अंत झाला. ह्याच हल्ल्यामध्ये सादतचा विश्वासू उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारकदेखील जखमी झाला.
पण ह्यातून बरा होत होस्नी मुबारकनं सगळी बंड मोडून काढली आणि सत्तेवर मांड बसवली. इजिप्तच्या नशीबात आणखी एक लष्करशहा होता. होस्नी मुबारकनं अमेरिकन तह जिवंत ठेवला आणि मिळत असलेला पैसा मात्र थोड्या प्रमाणात सैन्यावर खर्च केला. पण इजिप्तचा सामान्य माणूस त्यापासून वंचितच राहिला. इजिप्तचा सामान्य माणूस इतक्या वर्षांच्या आर्थिक मदतीनंतरही पिरॅमिड्स आणि तत्सम प्राचीन इजिप्तच्या जीवावर मिळणार्‍या पर्यटन महसूलावरच अवलंबून होता. आधुनिक इजिप्त यायला बरीच वर्षं जावी लागली. गेल्या काही वर्षांमध्ये मुबारकने काही उदारमतवादी बदल घडवून आणले, पण ते कधीच पुरेसे नव्हते. तीसहून अधिक वर्षं राष्ट्राध्यक्षपदावर बसल्यावर काही वर्षांपूर्वी लोकलज्जेस्तव मुबारकनं राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फार्स घडवून आणला. पण इतकी वर्षं हाती सैन्यासकट पूर्ण सत्ता असतानाही मुबारक देशाचं भलं करू शकला नाही. जे सर्वांनी केलं असतं, तेच त्यानं केलं, कुटुंबाचं कोटकल्याण. नाही म्हणायला शर्म-एल-शेख सारखं एक रिझॉर्टसदृश शहर वसवून ठेवलं, जिथे तो सध्या स्वतःच आश्रय घेऊन बसलाय. त्याअर्थी बघायला गेलं तर अन्वर सादत हाच सर्वांत उजवा ठरतो, पण अरबवर्चस्वाच्या उथळ भावनेच्या अतिरेकामुळे बहुतेक इजिप्तनं स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली.
काही महिन्यांपूर्वीच इजिप्तमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या (राष्ट्राध्यक्षाखालचं सरकार निवडण्यासाठी). त्यामध्ये मुबारकच्या अनुकूल लोकांच्या अभूतपूर्व विजयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण विरोधी पक्षांचा थोडा कांगावा सोडता फारसं काही झालं नव्हतं. पण आता ह्या परिस्थितीमुळे मरगळलेल्या विरोधी पक्षामध्येसुद्धा जीव आला. मुस्लिम ब्रदरहूड आणि लोकशाहीवादी असे दोन परस्परविरोधी गटदेखील मुबारकविरूद्ध एकत्र आले. आंदोलनं सुरू झाल्यावर सर्वप्रथम मुबारकनं आंदोलनं दडपायला सुरूवात केली. पण लोकांना आता न जाणे कसला आत्मविश्वास आला होता. ट्युनिशियात झालं तसंच इजिप्तमध्येही सैन्य नागरिकांवर अत्याचार करणार नाही ह्याची लोकांना खात्री होती. इजिप्त काहीही झालं तरी बर्‍यापैकी खुला देश असल्यामुळे उघडउघड नियमांची पायमल्ली करता येणं अवघड होतं. सैन्य अप्रत्यक्षपणे मुबारकच्याच इशार्‍यावर होतं. पण एक विचित्र स्टेलमेट निर्माण झाला होता. इजिप्तमध्ये इंटरनेटचं बर्‍यापैकी प्रस्थ आहे. आणि नुकतीच इंटरनेटनं ट्युनिशियन उठावात पार पाडलेली भूमिका पाहता, इजिप्शियन नागरिकही तिकडे वळू लागले.
ह्यातच आघाडीवर होता गुगलचा सॉफ्टवेयर इंजिनियर नोकरदार वाएल ग़ोनिमनं मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या माध्यमातून होस्नी मुबारकविरूद्ध लढा उभा केला. लवकरच त्याला अटक करण्यात आली आणि जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याचबरोबर संपूर्ण इजिप्तचं इंटरनेट जवळपास पूर्णपणे तोडून टाकण्यात आलं. ज्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. परिस्थिती विचित्र होत चालली होती. गुगलचा इंजिनियर आता आयकॉन बनला होता. तरूणाई रस्त्यांवर उतरली होती. सैन्य आणि मुबारक फारसे वेगळे नाहीत, पण इजिप्शियन जनता सैन्याला आपलं मानत होती. त्यांचा रोष, असंतोष मुबारकविरूद्ध एकवटत चालला होता. काही ठिकाणी तुरळक चकमकी वगळता, सैन्याकडून आंदोलकांबरोबर फारशी आगळीक घडली नाही.
मुबारकनं टीव्हीवर येऊन एक भाषण दिलं ज्यात त्यानं जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांत निवडून आलेलं सरकार ताबडतोब बरखास्त करत असल्याची घोषणा केली. पण त्याच्या स्वतःच्या जाण्याबद्दल त्यात काहीच नसल्यानं आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. एव्हाना कायम परदेशात राहिल्यानं पाश्चात्य देशांमध्ये ओळखीचा चेहरा, नोबेलविजेत्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा समितीचा पूर्व प्रमुख मुहम्मद एल-बरदाई आता प्रमुख विरोधी नेता म्हणून समोर आला. इजिप्तच्या सामान्य लोकांना तो फारसा ओळखीचा किंवा जवळचा नाही. पण पाश्च्यात्य देशांना मुबारक गेल्यानंतर कुणीतरी अनुकूल मनुष्य हवा आहे, तो एल-बरदाई बनू शकतो, त्यामुळे पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी जाणूबबुजून त्याचं महत्व वाढवल्याचं मला जाणवलं. तर ह्या पहिल्या भाषणानंतर मुबारकविरोधी जनमत अजून टोकाचं बनलं. तहरीर चौकामध्ये निदर्शकांनी ठाणच मांडलं. अशातच ग़ोनिमला आंतरराष्ट्रीय दबावाखाली सोडून देण्यात आलं. तो परत आला तो हिरो बनून आणि नव्या जोमानं नवा लढा उभा करायचं ठरवून. ग़ोनिमनं तहरीर चौकात लोकांना प्रोत्साहन देत राहण्याचं आणि संयत संदेश देत राहून ती भावना कायम ठेवण्याचं महत्वाचं कार्य केलं. ग़ोनिमचा लढा हा नव्या युगाचा लढा असल्याचं काही लोकांनी निरिक्षण नोंदवलंय. एव्हाना इंटरनेटही पूर्ववत झालं होतं. मुबारकवरचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
मुबारक इस्रायलचे हितसंबंध जपण्यासाठी अत्यंत महत्वाचा माणूस होता, त्यामुळे अमेरिकेला चटकन त्याच्या विरूद्ध जाता येईना. इतक्या वर्षांचं अप्पलपोटं धोरण क्षणात कसं बदलणार. पण जगासमोर उभं केलेलं महान देशाचं सोंगही सोडून चालणार नव्हतं. मग हळूहळू हो नाही करत आठवडाभरामध्ये अमेरिकेची भूमिका सूचकपणे मुबारकला जायला सांगण्याइतपत बदलली. आता अमेरिकेनंही हात झटकायची तयारी केली म्हटल्यावर मुबारकचे जवळपास सगळेच मार्ग बंद झाले. तरी तो काहीतरी व्यवस्था करण्यात मग्न होता.
ह्या सगळ्या गोंधळामुळे येमेनमध्ये निदर्शनं वाढू लागली होती. त्यामुळे घाबरून तिथल्या ३० वर्षं असलेल्या राष्ट्राध्यक्षानं २०१३ मध्ये संपणारा पुढचा कार्यकाल अजून पुढे न वाढवण्याची आणि आपल्या मुलालाही त्यावर्षीच्या निवडणुकीला उभं न करण्याची दांभिक घोषणा केली. ज्यामुळे तिथलीही आग विझण्याऐवजी अजूनच भडकली.
इकडे एक दिवस पुन्हा बातमी आली की मुबारक देशासमोर अजून एक भाषण करणार आहे. पण त्या भाषणात त्यानं सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची घोषणा केली. आणि नवे संवैधानिक बदल घडवून राष्ट्राध्यक्षानं पाचहून अधिक वर्षं सत्तेत राहू नये अशी तरतूद करण्याचा मानस व्यक्त केला. ह्या दांभिकपणामुळे तर असंतोषाचा भडका उडाला. तहरीर चौकात न भूतो न भविष्यति अशी गर्दी लोटली. लोक मागे हटायला तयारच नव्हते. काही ऐकूनही घ्यायला तयार नव्हते. पस्तीसच्या आसपास वर्षांच्या कार्यकालात कधीही उपराष्ट्राध्यक्षाची गरज न पडलेल्या मुबारकनं शेवटचा महिनाभर तो ही ठेवला होता. शेवटी जनमतापुढे झुकून निदर्शनांच्या १८व्या दिवशी मुबारकनं पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पण एव्हाना तो स्वतःची व्यवस्था लावून बसला होता. तो सहकुटुंब गुपचूप शर्म-एल-शेखला निघून गेला. तो कुठे गेला हे सैन्याशिवाय कुणालाही ठाऊक नाही. पण इजिप्शियन जनतेला त्याची पर्वा नाही. तो गेला ह्यातच ते धन्यता मानतात. त्यांना तो देशात राहण्यावरही आक्षेप नाही. ह्यावरून इजिप्शियन क्रांती थोडीशी जवाबदार अन प्रौढ वाटते. मुबारकच्या लंब्याचौड्या कारकीर्दीमुळे त्याला उपहासाने 'फॅरो' म्हणतात. 'फॅरो' हे प्राचीन इजिप्तमध्ये सूर्याच्या वंशज मानलेल्या राजाला म्हणत असत.
इजिप्तच्या बर्‍यापैकी खुलं असण्याचा अन जगासमोर असण्याचा क्रांती घडवण्यास बराच हातभार लागला. इजिप्तचं भौगोलिक आणि राजकीय स्थानदेखील ह्या सगळ्या घटनांना कुठे न कुठे कारणीभूत ठरलं. पण ठळकपणे समोर आला तो ग़ोनिमचा भावपूर्ण, देशप्रेमी लढा. इजिप्तच्या नागरिकांची चिकाटी आणि एकजूट. अर्थातच प्रो-मुबारक निदर्शनकार्‍यांनी घातलेला गोंधळ आणि पर्यटनावर पोट असणार्‍या नागरिकांचा निदर्शकांवर असणारा रोष अशी काही तुरळक उदाहरणं सोडता लढा एकसंध आणि एकजीव होता. सैन्यानं बाळगलेलं परिस्थितीचं भानदेखील लक्षात घेण्याजोगं आहे.
पण इजिप्तमध्ये सध्या सैन्याच्या हातीच सत्ता आहे. सहा महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची घोषणातरी झालेली आहे. पण सध्यातरी संविधान निलंबित स्थितीत आहे. पण अजूनही नागरिकांमध्ये विजयोन्माद आणि सुटकेचा निश्वास आहे. लवकरच भानावर येऊन सैन्यावरही दबाव ठेवणं भाग आहे. नाहीतर नवा मुबारक बनायला वेळ लागणार नाही.
ट्युनिशिया आणि इजिप्त हे दोन गड तर सर झाले. पण ह्या दोघांच्यामध्ये वसलेला आणि सर्वांत घट्ट अशा पोलादी मुठीत जखडलेला आफ्रिकेतील सर्वाधिक तेलसाठे असलेला लिबिया अजून बाकी आहे. तिकडे एव्हाना घमासान सुरू झालंय. आणि कर्नल गद्दाफी क्रौर्याच्या सगळ्या सीमा पार करत स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बर विमानाचे हल्ले करवतोय. तिथली स्थिती पुढच्या वेळेस!

(ह्या सर्व घटना घडत असताना अधाश्यासारखं टीव्हीवर मिळेल ते पाहून अन विकिपीडिया वाहून मिळालेली बहुतांश माहिती हाच वरील लेखाचा आधार आहे. ट्युनिशियाबद्दलही बरंच लिहायची इच्छा होती पण आवरली. पण इजिप्तच्या बाबतीत नाट्य जास्त असल्यानं आवरू नाही शकलो स्वतःला :) )

2/23/2011

क्रांतीची मशाल -१ -एका फळविक्याने...

१७ डिसेंबर, २०१० रोजी सिदी बुझिद शहरात मुहम्मद बुअज़िज़ी नामक फळविक्याची फळ विकायची गाडी एका पोलिस बाईनं अनधिकृत म्हणून उचलली. त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं. संपूर्ण कुटुंबाचा एकमेव पालनहार असलेल्या त्याची गाडी ह्यापूर्वीही उचलून नेली गेली होती आणि भ्रष्टाचारानं पोखरलेल्या यंत्रणेनं काही रकमेची लाच घेऊन त्याची गाडी सोडली होती. त्या अनुभवाला अनुसरूनच त्यानं त्या पोलिसबाईला पैसे द्यायचा प्रयत्न केला. पण त्या पोलिस बाईनं त्याचा सर्वांसमक्ष इतका अपमान केला की त्याला जिणं मुष्किल होऊन गेलं. तो अपमानित अवस्थेतच स्थानिक महापालिका कार्यालयात गेला, पण तिथेही त्याची कुणी दाद लावून घेतली नाही. अपमानानं जळत राहण्यापेक्षा त्यानं पोलिस चौकीसमोर प्रत्यक्ष आगीमध्ये जळून जाऊन मरणं पसंत केलं. आणि आत्मदाह करून घेतला. पण तो जागच्या जागी गेला नाही. तो इस्पितळात दाखल केला गेला.
पण त्याच्या ह्या व्यथेविरूद्ध स्थानिक नागरिकांनी सर्वप्रथम आवाज उठवला, पोलिसांनी दंडुकेशाही करण्याचा वापर केला. त्यामुळे अजून निदर्शनं झाली. सोशल नेटवर्क्सवरून बरीच चर्चा होऊन मुहम्मद बेकारीनं अन गरिबीनं त्रस्त ट्युनिशियन तरूणाईचा एक प्रतिनिधी बनला आणि लोकमत त्याच्या बाजूनं संघटित होऊ लागलं. विविध पातळ्यांवरून आवाज उठू लागला. घडत असलेल्या घटनांनी उशीराच का होईना, राष्ट्राध्यक्ष बेन अलीला जाग आली आणि त्याने इस्पितळात जाऊन त्याची भेट घेतली. आश्वासनं दिली (काही साम्य दिसतंय का आपल्याकडे?) आणि भेटीचे फोटो पेपरांमध्ये छापून आले. पण आग लागलेली होती आणि ती एव्हढ्या तेव्हढ्यानं विझण्यालायक राहिली नव्हती. ती शासनव्यवस्थेचा बळी घेऊनच शांत होणार होती. लढा सुरू असतानाच ४ जानेवारी, २०११ ला मुहम्मदचा मृत्यूही झाला. पण त्याचं बलिदान वाया गेलं नाही. त्याच्या शरीरावर पेटलेल्या आगीनं त्याच्याच देशातल्या भ्रष्ट शासनयंत्रणेचाही घास घेऊनच दम घेतला.
राष्ट्राध्यक्ष बेन अलीची मालमत्ता मोजण्याच्याही पलिकडे होती. त्याची द्वितीय पत्नी असलेली लैला बेन अली ही विविध सामाजिक कार्य करीत असल्याचे डंके पिटले जायचे. तीच बाई सत्ता जाणार असे दिसताच सर्वप्रथम ट्युनिशियाच्या राष्ट्रीय बँकेत जाऊन दीड टन सोनं आणि बरीच रक्कम काढून घेऊन देशाबाहेर पळाली. स्विस बँकेनं दांभिकपणे तिची लाखो डॉलर्स असलेली खाती गोठवत असल्याची घोषणा केली. बेन अलीचे अन तिचे कित्येक नातेवाईक, जे सरकारच्या विविध पदांवर बसून मलिदा खात होते, ते मिळेल ती रक्कम घेऊन देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नाला लागले. देशाचं सैन्य एव्हाना पलटून नागरिकांच्या बाजूनं झालेलं होतं, त्यामुळे काहीजण पळताना पकडलेही गेले अन काहीजण पळण्यात यशस्वी झाले. ट्युनिशियामध्ये बरेच खटले भरले गेले आहेत.
राष्ट्राध्यक्ष अन त्याची बायको सर्वप्रथम फ्रान्समध्ये आश्रयास गेले. ट्युनिशिया ही फ्रान्सची एकेकाळी वसाहत होती, त्यामुळे इतर पूर्व-फ्रेंच वसाहतींप्रमाणे इथल्या राजकारणातही फ्रान्सचा अप्रत्यक्ष सहभाग होताच. पण आता जगासमोर बेन अलीला आश्रय देणं प्रतिमा डागाळून घेण्यासारखं असल्यामुळे फ्रान्सनं हात झटकले. पण पॅन-इस्लामिझमचं नाव घेत सौदी अरेबियानं मात्र बेन अलीला आश्रय दिला, बेन अलीच्या सर्व करामती जगासमोर असतानादेखील!
सध्या ट्युनिशियात अराजकसदृश स्थिती आहे. बेन अली गेला, पण आता काय? हा प्रश्न लोकांसमोर आहे. बरेच लोक सीमा ओलांडून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकांनीतर भूमध्य समुद्र ओलांडून इटलीमार्गे युरोपात प्रवेश करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कुठल्याही क्रांतीनंतरचा हा काळ मोठा महत्वाचा असतो. क्रांती घडवणं सोपं असतं, पण ती टिकवून ठेवणं महाअवघड. आग नेहमीच लावायला सोपी असते, पण तिच्यावर नियंत्रण मिळवलं तरच ती उपयुक्त ठरते, नाहीतर लावणार्‍यासकट सर्वांनाच स्वाहा करू शकते. त्यामुळे सध्या ट्युनिशियन लोकांनी एकत्र राहणं अन त्यांच्यातून योग्य अन समर्थ नेतृत्व पुढे येणं फारच आवश्यक आहे. तिथे सध्या विरोधक आणि बेन अलीचेच काही बंडखोर अनुयायी ह्यांचं काळजीवाहू सरकार आहे. त्यामधल्या पाच मंत्र्यांनी काही दिवसांतच अंतर्गत बाबींमुळे राजीनामा दिला. मग लोकांनी पुन्हा निदर्शनं केली आणि बेन अलीच्या सर्व लोकांना हाकलायला लावलं. तरीही पंतप्रधान अजूनही जुनाच आहे. ६० दिवसांमध्ये निवडणुका होण्याची घोषणा झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव ठेवून लवकरात लवकर निवडणुका करवून घ्यायला हव्यात. पण आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणजे अमेरिका अन युरोप, जे स्वतःच्या हितसंबंधांपलीकडे काहीही पाहत नाहीत. पण सध्या ह्या गोंधळामुळे त्यांच्याकडेच निर्वासितांचे लोंढे येण्याच्या शक्यता असल्यानं, तेही चांगल्यासाठीच प्रयत्न करण्याच्या शक्यता दिसताहेत. एकंदरच परिस्थिती ट्युनिशियाच्या बाजूनं आहे, पण त्यांना त्यादिशेनं पावलं टाकणं आवश्यक आहे.
ही फळविक्यानं लावलेली आग क्षणभर दम घेण्यासाठी थांबल्यागत झाली, पण तिनं ट्युनिशियाच्या सीमा ओलांडल्या अन नव्या दमानं जोर वाढवायला तिनं सुरूवात केली. आता तिला मिळणार्‍या समिधाही वाढल्या होत्या. मशालीप्रमाणे ती एका हातातून दुसर्‍या हातामध्ये पसरू लागली. फळविक्यानं पेटवलेली ही आग एका सॉफ्टवेअर इंजिनियरनं मशाल बनून इजिप्तमध्ये कशी भडकवली ते उद्या.

2/20/2011

आरसा

मी जिथे काम करतो तिथे विविध देशांमधल्या विविध यंत्र बनवणार्‍या कंपन्यांची माणसं येत असतात. अन त्यातल्या बहुतेक कंपन्या अन त्यांची माणसं गेली कित्येक वर्षं आमच्या कंपनीत येताहेत. त्यामुळे त्यांना आमच्या मुंबई ऑफिसातून येणार्‍या इंजिनियर्सबद्दल माहिती असते. त्यामुळे इटालियन कंपनीच्या ऑफिसात भारतीय माणूस चर्चेसाठी बसलेला पाहून कुणालाही सहसा आश्चर्य वाटत नाही, किंबहुना आम्ही भारतीय आहोत हे त्यांना आधीपासूनच ठाऊक असतं (हे आधीच स्पष्ट करण्याचं कारण पुढे कळेल). तशातच मध्यंतरी एका जुन्याच इटालियनच कंपनीची माणसं चर्चेसाठी आली होती. नेहमीप्रमाणे दुपारी जेवायला मी त्यांच्याचबरोबर गेलो. माझा सहकारी इटालियनच असल्याने सगळे त्यांच्या भाषेत सुरू होते. माझ्यासमोर त्यांच्यातला एक मनुष्य बसला होता. तो माझ्याशी बोलू लागला. त्यानं पहिल्याच प्रश्नावर माझी दांडी उडवली अन बर्‍यापैकी पुढे वैचारिक असं आमचं संभाषण झालं. ते असं -
(मी संवाद मराठीमध्ये अनुवादित केला आहे)

तो- माफ कर पण मला एक सांगा, तू नक्की कुठला आहेस? (मला पहिला यॉर्कर, माझा घास घशातच अडकला)
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत) भारत.
तो- ओह, भारत! (हे वाक्य एखाद्या मुंबईतल्या अमेरिकन कॉन्सुलेटच्या फेर्‍या मारून थकलेल्या व्हिजाकांक्षी तरूणानं 'ओह, अमेरिका!' म्हणावं, त्या थाटात तो म्हणाला, जे अर्थातच खोटं असल्याचं मला ठाऊक होतं.)
मी- (मला का कुणास ठाऊक असं वाटलं की त्याला मी भारतीय आहे हे ठाऊक आहे अन तो शहर विचारत होता म्हणून लगेच म्हटलं) मुंबई!
तो- (मगाचच्याच थाटात) ओह, मुंबई!
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत फक्त केविलवाणा हसलो)
तो- मग तुला मिलानचं ट्रॅफिक आणि मुंबईचं ट्रॅफिक ह्यांच्यात काय चांगलं वाटतं? (मला दुसरा यॉर्कर! काय संबंध ह्या प्रश्नाचा?)
मी- (पूर्ण गोंधळल्याचे भाव चेहर्‍यावर) मिलान! (तो मिलानचा नसून ऑस्ट्रियन बॉर्डरवरच्या एका छोट्या अन अजून सुबक शहरातला असल्याचं मला ठाऊक होतं)
तो- (आता तो गोंधळला) हे आश्चर्य आहे! तू पहिला माणूस भेटलास मिलानच्या ट्रॅफिकला चांगलं म्हणणारा! (बहुतेक त्याला आजवर युरोपबाहेरचा कुणी भेटलाच नाही)
मी- तू मुंबईला आला नाहीयेस बहुतेक अजून. मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे सावळागोंधळ असतो.
तो- ओह, मला फिरण्याची फारशी आवड नाही. मी फक्त इटलीच्या उत्तरेकडेच फिरतो, तेही जास्त करून फार उत्तरेकडचा युरोप, स्कॅन्डेनेव्हिया वगैरे. मला फारसं आवडत नाही अजून कुठे जायला.
मी- (मनातल्या मनात - चूलकोंबडा आहेस म्हण ना! अन बाहेर) ओह, छान! चांगलं आहे.
तो- इटली अन उत्तरेकडच्या देशांचा फरक लगेच कळतो रे!
मी- माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह त्यालाही दिसलं.
तो- म्हणजे स्वच्छता, शिस्त, टापटीप.
मी- ह्म्म!(माझ्यासाठी आधीच मिलानदेखील, स्वच्छ अन टापटीप आहे. अर्थात इतर युरोपच्या मानानं इटली गलिच्छ म्हणता येईल. पण एका इटालियन माणसानंच इटलीची अशी अब्रू काढावी हे माझ्यासाठी नवल होतं.)
तो- अरे हायवेवरून जाताना कळत माहितीय. तू हायवेला कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये थांब अन तिथल्या स्वच्छतागृहामध्ये जा!(मी कान देऊन तो पुढे काय बोलतो ते ऐकत होतो अन मनातल्या मनात ह्या सुट्टीमध्ये फूडमॉलमध्ये एशियाड थांबली असतानाच्या आठवणी जागवत होतो) तुला माहितीय ऑस्ट्रियामध्ये लहान मुलांसाठी सेपरेट स्वच्छतागृह असतात?
मी- अच्छा!(मधेच ह्याच्या गाडीनं हायवेवर टर्न घेतला. अन मुलांसाठी स्वच्छतागृह तर मी मिलानमधल्या मॉलमध्ये पण पाहिल्याचं मला स्मरत होतं (बहुतेक मुंबईतल्यापण).)
तो- हां, तर ऑस्ट्रियातली हायवे रेस्टॉरंट्सची स्वच्छतागृह बघ अन इटलीतली बघ, फरक लगेच कळतो.
मी- एक सहमतीचं हास्य.
तो- अरे इटलीतली इतकी गलिच्छ असतात की जावंसं वाटत नाही, अन ऑस्ट्रियातली अशी असतात की तू ऍक्च्युअली त्यांना लिव्हिंग रूम समजून तिथेच राहू शकतोस.
मी- आयला हो? (इथे इंग्रजीतलं 'रियली?' असं होतं. अन मी मनात म्हटलं की बरंय बाबा हा भारतात नाही आला.)
तो- माझ्या मते सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो.
मी- खरं आहे! (स्वामीजींनी एक जबरदस्त 'पते की बात' फायनली केली होती. त्याचं वाक्य मला पुरेपूर पटलं होतं.)

माझ्या शेवटच्या 'खरं आहे!' मधली सत्यता त्यालाही जाणवली अन तो खुष झाला. आणि मग स्वच्छतागृह पुराण थांबवून कामाची थोडी चर्चा करू लागला. मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो.

2/17/2011

अनुवाद -२

'मॅन'स सर्च फॉर मीनिंग' चाच अजून एक उतारा अनुवादित करायचा प्रयत्न आहे. ह्यापुढे दुसर्‍या कुठल्या पुस्तकातील करण्याचा प्रयत्न करेन.

मूळ उतारा -

The medical men among us learned first of all: "Textbooks tell lies!" Somewhere it is said that man cannot exist without sleep for more than a stated number of hours. Quite wrong! I had been convinced that there were certain things I just could not do: I could not sleep without this or I could not live with that or the other. The first night in Auschwitz we slept in beds which were constructed in tiers. On each tier(measuring about six-and-a-half to eight feet) slept nine men, directly on the boards. Two blankets were shared by each nine men. We could, of course, lie only on our sides, crowded and huddled against each other which had some advantages because of the bitter cold. Though it was forbidden to take shoes up the bunks, some people did use them secretly as pillows in spite of the fact that they were caked with mud. Otherwise one's head had to rest on the crook of an almost dislocated arm. And yet sleep came and brought oblivion and relief from pain for a few hours.
I would like to mention a few similar surprises on how much we could endure: we were unable to clean our teeth, and yet, in spite of that and a severe vitamin deficiency, we had healthier gums than ever before. We had to wear same shirts for half a year, until they had lost all appearance of being shirts. For days, we were unable to wash, even partially, because of frozen water-pipes, and yet the sores and abrasions on hands which were dirty from work in the soil did not suppurate (that is, unless there was frostbite). Or for instance, a light sleeper, who used to be disturbed by the slightest noise in the next room, now found himself lying pressed against a comrade who snored loudly a few inches from his ear and yet slept quite soundly through the noise.
If someone now asked of us the truth of Dostoevski's statement that flatly defines man as a being who can get used to anything, we would reply, "Yes, a man can get used to anything, but do not ask us how." But our psychological investigations have not taken us that far yet; neither had we prisoners reached that point. We were still in the first phase of our psychological reactions.

अनुवाद -

आमच्यातले वैद्यकीय व्यावसायिक सर्वप्रथम एक गोष्ट शिकले, "पाठ्यपुस्तकं खोटं सांगतात!" कुठेतरी असं म्हटलं गेलंय की माणूस ठराविक तास झोपल्याखेरीज जिवंत राहू शकत नाही. अगदीच चूक! मी काही ठराविक गोष्टी करू शकत नाही अशी माझी पक्की खात्री होती : मी अमुक गोष्टीशिवाय झोपू शकत नाही किंवा मी तमुक गोष्टीशिवाय राहू शकत नाही. ऑशविट्झमधल्या पहिल्या रात्री आम्ही एकाहून अधिक स्तर असलेल्या पलंगांवर झोपलो. प्रत्येक स्तरावर (साडेसहा बाय आठ फूट आकाराचा) नऊ माणस, थेट लाकडावरच. दोन शाली नऊ माणसांसाठी मिळून. साहजिकच आम्ही सर्व एका अंगावर होऊन, एकमेकांना बिलगून गर्दी करूनच झोपू शकत होतो, ज्याचा कडाक्याची थंडी असल्याने थोडा फायदाही होत होता. जरी बूट आपल्या पलंगावर नेणं निषिद्ध होतं, तरीही काहीजण त्या चिखलानं भरलेल्या असूनही चोरून त्यांचा वापर उशीसारखा करायचे. नाहीतर त्याला आपलं डोकं जवळपास निखळलेल्या हाताच्या घडीवर ठेवणं भाग होतं. आणि तरीही झोप यायची अन काही तासांसाठी अलिप्तता अन वेदनांपासून मुक्ती द्यायची.
मी इथे आमच्या सहनशीलतेबद्दलच्या ह्यासारख्याच आश्चर्यकारक अनुभवांचा उल्लेख करेन : आम्हाला दात साफ करणंही जमत नसे आणि त्यातच जीवनसत्वांची भयानक कमतरत असं असतानाही आमच्या हिरड्या आधीपेक्षा जास्त मजबूत होत्या. आम्ही एकच सदरा जवळपास सहा महिने घालत असू, अगदी तो सदरा आहे असं वाटेनासं होईस्तोवर. कित्येक दिवस आम्हाला आंघोळही करता येत नसे, अगदी हातपायही धुता येत नसत, कारण पाण्याचे पाईप थंडीनं गारठून जात आणि तरीही हातावरचं खरचटलेलं किंवा छोट्या जखमा ज्या दिवसभर मातीत काम केल्याने अस्वच्छ असत कधीच चिघळल्या नाहीत (अर्थातच, तो हिमदंश नसेल तर). किंवा उदाहरणार्थ, एखाद्याची झोप हलकी असेल, ज्याला पलिकडच्या खोलीत आलेल्या थोडक्याशाही आवाजानं जाग येत असेल, तो आता त्याच्या कानात मोठ्यानं घोरणार्‍या साथीदाराला बिलगून अगदी शांत अन प्रगाढ झोपलेला सहज दिसेल.
जर तेव्हा आम्हाला कुणी डोटोव्हस्कीच्या त्या विधानातलं सत्य विचारलं असतं, ज्यामध्ये तो सरधोपटपणे माणसाची व्याख्या, 'एक असा जीवजंतू जो कशाशीही जुळवून घेऊ शकतो' अशी करतो, तर आम्ही उत्तर दिलं असतं की, "हो, मनुष्यप्राणी कशाशीही जुळवून घेऊ शकतो, पण कसा ते आम्हाला विचारू नका." पण आपले मानसशास्त्रीय शोध आपल्याला अजून तिथवर घेऊन गेलेले नाहीत, आणि आम्ही कैद्यांनीही अजून ती पातळी गाठली नव्हती. आम्ही अजूनही आमच्या मानसशास्त्रीय प्रतिक्रियांच्या पहिल्याच पातळीवर होतो.

2/15/2011

शोध

कधी कधी असं होतं की खूप खूप लिहावंसं वाटतं. खूप काही सुचतंय असं वाटतं अन बाह्या सरसावून लॅपटॉपसमोर ठाण मांडलं की एकत्रित येणार्‍या विचारांचा कल्लोळ उठतो. पण काहीच सुसंबद्ध बाहेर पडत नाही. एकदम आभाळ भरून यावं, कुंद कुंद वातावरण व्हावं अन पाऊसच पडू नये तद्वत. विचारांचा कल्लोळ पार थकवून टाकतो. ऑफिसातल्या कामाच्या रगाड्यापासून ते प्रियतमवियोगाच्या दुःखापर्यंत अन बँकेत जमा न झालेल्या पगारापासून ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपर्यंत, सर्व तर्‍हेचे अन सर्व प्रकारचे विचार एकत्रितच येतात.
मला लहानपणी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, की शून्य वैचारिक अवस्था कशी गाठावी, तर एकाच वेळी निरनिराळे विचार करायला सुरूवात करावी. आपोआपच सगळे विचार एकमेकांना कॅन्सल करू लागतात आणि थोड्या वेळाच्या अशा कठोर उपासनेनंतर मेंदू शांत शांत होऊ लागतो. माझ्याबाबतीत तसं सहसा घडत नाही. मी निरनिराळे विचार करू लागलो की मी अजून भंडावून जातो. बहुतेक माझा प्रोसेसर फारच ऍडव्हान्स असावा अन उपरोल्लेखित उपाय हा जुन्या प्रोसेसर्सवर उपयोगी असावा. मला शून्य वैचारिक अवस्था तेव्हा लाभते, जेव्हा मला खरंच विचार करावासा वाटतो. माझ्या मेंदूमध्ये बहुदा 'नॉट गेट' (इंजिनियर्सच्या भाषेत) बसवलेलं आहे. म्हणजे कुठलीही आज्ञा दिली की तो अगदी विरूद्ध कृती करतो. मी ठरवलं की आज अमुक एका विषयावर लिहायचं, म्हटलं की विचार करणं आलं अन विचार करणं म्हटलं की मला लाभलीच शून्य वैचारिक अवस्था.
पण एरव्ही कसलेही अपूर्व विचार कधीही सुचतात. उदाहरणार्थ, एके दिवशी मी मेट्रोमध्ये चढलो. अन नेहमीप्रमाणे चार सीट्सच्या बाकड्याची कोपर्‍यातली सीट पकडली. अन नकळतच पुढच्या स्टेशनांवर चढणार्‍यांचं निरीक्षण करू लागलो. प्रत्येकजण पहिल्यांदा कोपर्‍यातली सीट पकडायचा प्रयत्न करतो. दोन माणसांच्यामध्ये बसणं सहसा लोक टाळतात. मला माझीच सवय जाणवली. मीसुद्धा नेहमी कोपर्‍यातली जागा घेतो. विमानात आवर्जून येण्याजाण्याच्या मार्गाबाजूची सीट मागतो. एकदा दोन माणसांच्या मध्ये बसावं लागलेलं तर बराच वेळ मी अवघडलेला होतो. कॉलेजात असताना केमिस्ट्रीच्या प्रोफेसरांनी इलेक्ट्रॉन्सबद्दल शिकवताना सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये कसे भरायचे, तर रिकाम्या बसमध्ये लोक चढले की कसे बसतात तसे. म्हणजे पहिल्यांदा सगळ्या विंडो सीट्स भरतात आणि मग त्यांच्या बाजूच्या सीट्स. थोडक्यात माणूस पहिल्यांदा एकटाच राहणं पसंत करतो. नंतर पर्याय नाही तर दुसर्‍या माणसाजवळ. हे वागणं थोडं विचित्र भासतं, जेव्हा आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणतो तेव्हा.
पण खरंच माणूस सामाजिक प्राणी आहे कारण एका पातळीनंतर त्याला समाजाची गरज भासते. पण ती एका पातळीनंतर. त्याआधी प्रत्येक माणूस एकटा असतो. आणि त्याला तसंच राहायला आवडतं. अर्थात प्रत्येकाची ही पातळी वेगळी असते. पण असतेच. ज्याला आपण पर्सनल लाईफ म्हणतो. वैयक्तिक आयुष्य. त्यामध्ये कधीकधी जीवनसाथीलादेखील स्थान नसतं. ही पातळी नकळतच अस्तित्वात असते प्रत्येकामध्ये.
महाराजी नावाचे एक प्रवचनकार आहेत. झीटीव्ही यूकेवर अशी बरीच प्रवचनं लागतात. रविवारी सकाळी जाग आल्यावर डोळे चोळत चाळा म्हणून टीव्ही लावावा तर हाच प्रकार चालू असतो. मी सहसा मनोरंजन म्हणून पाहतो पण कधीकधी एखादा चांगला विचार कानी पडतो. तसंच त्यादिवशी महाराजींचं प्रवचन चालू होतं, तेव्हा ते म्हणाले. "प्रत्येक माणसाची दोन जगं असतात. एक जग बाहेरचं ज्यामध्ये तो जगत असतो. आणि दुसरं त्याच्या आतमधलं जे त्याच्याआत जगत असतं. बाहेरच्या जगात कितीही सुखं आणि दुःखं असली तरी त्याच्या आतमधल्या जगामध्ये फक्त एकच सुख आणि एकच दुःख असतं. ते सुख काय आहे ह्याच्या शोधातच तो आयुष्यभर असतो आणि ते सुख मिळत नाही हेच त्याचं एकमेव दुःख असतं."
अतिशय गोंधळात टाकणारा अन अशा विदेशांमध्ये पैसे घेऊन प्रवचन देणार्‍या हायफाय बाबाला शोभणाराच विचार आहे. पण त्यामध्ये मला थोडंसं तथ्य जाणवलं. आपल्या आतलं जग, ज्याला आपण वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ज्याला प्राणपणानं जपण्यासाठी आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वतःतच राहतो, त्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा ते एक सुख शोधत असतो. आणि ते मिळत नाही ह्याचं दुःख बाळगत बाहेर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असतो.
काही नशीबवान माणसं ह्या शोधाच्या शेवटापर्यंत पोचतात. त्यांना ते सुख सापडतं किंवा नाही हा भाग अलाहिदा, पण ते असफल शोधाचं दुःख मात्र संपवण्यात यशस्वी होतात.

2/06/2011

काऊन्सिलिंग

..असं झालं रे
म्हणून त्यानं बोलणं संपवलं
नजर वर करून माझ्या डोळ्यात
उत्तर शोधायला बघितलं
मी शांतपणे ग्लासातून
अजून एक घोट घेतला
अन फक्त त्याच्या खांद्यावर
दोन क्षण हात ठेवला
हसू त्याच्या चेहर्‍यावर
जणू सहजच उमललं
काऊन्सिलिंगचं गमक मला
अचानकच उमगलं
रोजच्या रोज आता
नवीन लोकं भेटू लागले
मी घोट घेता घेता
उसासे सोडू लागले
माझे कान ऐकोत न ऐकोत
हात खांद्यावर पडत होता
उत्तरं नको होती कुणाला
असण्यानंच फरक पडत होता
एक हात खांद्यावर होता
अन दुसरा कायम ग्लासावर
पण त्याच्या असण्याचा कधी
प्रभाव नसावा माझ्यावर
आज मात्र भलतंच माझं
मन खायला उठलंय
पण माझं काऊन्सलिंग करायला
कुणाला काय पडलंय
आणि लक्ष गेलं माझं
फडताळावर तो बसला होता
नक्की आठवत नाही आत्ता
पण माझ्याकडे पाहून हसला होता
..असं झालं रे
म्हणून मी बोलणं संपवलं
नजर वर करून त्याच्याकडे
उत्तर शोधायला बघितलं
तो स्थितप्रज्ञासारखा टेबलावर
समाधीस्थ बसला होता
काऊन्सिलिंगचा खरा मानकरी
बहुतेक कायम तोच होता!

2/04/2011

समान शत्रू

काल मित्रांसोबत कॉफी घेताना नेहमीप्रमाणेच 'चिंता करितो विश्वाची' चाललं होतं. विषय होता 'इजिप्त'. मी म्हटलं, 'वेस्टर्न मीडिया सध्या लोकशाहीवादी अन मुस्लिम ब्रदरहूड ह्या दोन विरोधी पक्षांमध्ये कसे मतभेद आहेत हे दाखवण्यात गुंग आहे. अन खरंच गंमत होणार आहे सगळी. कारण मुस्लिम ब्रदरहूड हा कट्टरवादी पक्ष आहे अन बाकी लोकशाहीवादी आहेत. पण दोघेही होस्नी मुबारकच्या मात्र विरूद्ध आहेत.'
तेव्हा एका मित्रानं एका सामाजिक प्रयोगाबद्दल सांगितलं, ज्यामध्ये दोन युवकांचे गट बनवण्यात आले अन त्यांना एका कॅम्पवर ठेवण्यात आलं. अन काही कारणांचं निमित्त करून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण करण्यात आलं. मग त्यांचं आपापसातलं वैमनस्य मिटवायचे प्रयत्न सुरू केले गेले. पण वैमनस्य मिटेना. मग त्यांच्या धर्मांचे धर्मगुरूही बोलावले गेले. धर्मगुरूंचं सांगणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं अन त्यानंतर त्यांनी आदरपूर्वक वैमनस्य संपवायला नकार दिला. निर्वाणीचा उपाय म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या ह्या गटांच्या कॅम्पचं पाणीच तोडून टाकण्यात आलं. दोनेक दिवस उलटल्यानंतर पाण्याची समस्या गंभीर बनली. अन मग थोडा शोध घेता दोन्ही गटांच्या लक्षात आलं की पाण्याचा मुख्य पाईपच कापण्या आलाय अन आता तो पाईप दुरूस्त करण्यासाठी सगळ्यांना एकत्र काम करावं लागेल. मग त्या दोन्ही गटांनी मिळून एकत्र तो पाईप दुरूस्त केला अन कॅम्पवरचं संकट टळलं. पण इतक्या उपायांनीही शक्य न झालेलं काम म्हणजे दोन्ही गटांचं मनोमिलन पाणीटंचाईनं घडवलं. अर्थात नंतर त्यांच्यात पुन्हा भांडणं झाली का वगैरे तपशील मला ठाऊक नाहीत. पण तात्पर्य हे की, समान शत्रू नेहमीच दोन किंवा अधिक गटांना एकत्र आणतो.
मी कॉलेजात असताना डब्ल्यू डब्ल्यू एफच्या कुस्त्या पाहायचो (अजूनही वेळ मिळेल तेव्हा पाहतो). त्यात जेव्हा ट्रिपल थ्रेट किंवा फोर-वे अर्थात निघांचा किंवा चौघांचा सामना असायचा, तेव्हा सर्वांत ताकदवान एकासमोर बाकीचे सगळे एक व्हायचे अन सर्वप्रथम सगळ्यांत ताकदवान प्रतिस्पर्ध्याला बाहेर काढण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग ते आपापसात लढून पुढचा निर्णय घ्यायचे. तसंच काहीसं इजिप्तमध्ये चालू आहे. होस्नी मुबारकच्या ३० वर्षांच्या एकछत्री सत्तेला विरोध करण्यासाठी सगळेच अतृप्त गट उभे राहिलेत. मग समान शत्रू मुबारकला प्रथम हटवण्यासाठी ते सगळे आपापसांतले मतभेद भांडणंदेखील बाजूला ठेवून एकत्र लढत आहेत.
त्यावरनं पुढे थोडी विवादास्पद चर्चा झाली. ती म्हणजे भारतासारखा प्रचंड विरोधाभासी देश फक्त दहशतवाद, पाकिस्तान ह्यांसारख्या समान शत्रूंमुळे अजूनही एकत्र उभा आहे. ज्या दिवशी ही कारणं संपतील, त्यादिवशी आपले तुकडे पडणं निश्चित आहे. मला स्वतःला हे विधान फारसं पटलं नाही, पण एक क्षण अंगावर काटा आला. म्हणजे, ज्या गोष्टीसाठी पाकिस्तानातल्या अनेक शक्ति अक्षरशः आकाशपाताळ एक करताहेत, ते फक्त त्यांना स्वतःला संपवून मिळू शकतं? पण मग आपले लोक निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी, अंधश्रद्धा असल्या समान शत्रूंविरूद्ध का एक होऊन लढू इच्छित नाहीत? असा एक काव्यात्म विचारही माझ्या मनात आला. पण पुढच्या क्षणी ते कोडंसुद्धा सुटलं, कारण जर ह्या समान शत्रूंविरूद्ध आपण लढलो, तर आपण एक होऊ अन आपल्यातल्या दुहीचा फायदा घेणारी माणसं आयुष्यातून उठतील. त्यामुळे सध्या ते सगळे (वाचा राजकारणी) आपापसातले मतभेद विसरून फक्त त्यांचा समान शत्रू म्हणजे सामान्यांमधली जागृती, एकी ह्याविरूद्ध लढताहेत अन लोकांसमोर अस्तित्वात नसलेला शत्रू उभा करून आपला कार्यभाग साधताहेत. सध्यातरी ते त्यात यशस्वी होतानाच दिसताहेत. महाराष्ट्रात ह्याचं जिवंत उदाहरण पुतळे, समाध्या अन चित्रांवरून निर्माण होणार्‍या दंगलसदृश स्थितीच्या रूपात समोरच आहे.