5/09/2011

चारोळ्या - पुन्हा एकदा

चालत्या बोलत्या दुःखांना
मधेच वाचा फुटते
एकमेकांचं ऐकून
ओठांवर हास्याची लकेर उमटते

----

उडत्या पक्ष्याला कधीकधी
जमिनीचा विसर पडतो
जागा कळून पुन्हा ओळख पटताना
चार-दोन पंखांचा बळी जातो

----

वेड्या वार्‍याला आपल्या शक्तीचा
पुरेसा अंदाज नसतो
समुद्राबरोबरच्या निरागस खेळात
कुणाचा उभा संसार कोलमडतो

----

एकदा गिरक्या घेता घेता
उकाड्यानं पृथ्वीला चक्कर आली
लाख-दोन लाख माणसं मेली अन
शे-दोनशे खडबडून जागी झाली

----

खोटं बोललं म्हणून शिक्षा भोगायला
मी काय आता लहान आहे?
खरं बोललो तर शिक्षा होईल भाऊ
माझा भारत महान आहे

----