3/20/2012

एका सत्यकथेचा शेवट

राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास दोन आठवडे लोटलेत. जेव्हा त्यानं पत्रकार परिषद बोलावली, त्याक्षणीच त्याच्या निवृत्तीचे कयास मांडले जाऊ लागले आणि खूप विचित्र वाटू लागलं. मन सगळ्या इतर शक्यतांचा विचार करू लागलं. कदाचित एक शेवटची मालिका खेळून निवृत्ती घेण्याची घोषणा असेल असं स्वतःला समजावत होतो. कारण, द्रविडला स्टीव्ह वॉ सारखा ग्रँड समारोप मिळावा अशी माझी इच्छा होतीच. पण समारोप कशासाठी? इतकी कसली घाई? असले निरर्थक प्रश्नही पडत होते. पण मग निवृत्तीसाठी अशी अडनिडी वेळ का? हे ही कळत नव्हतं. पण मग त्यानं अत्यंत साधीसुधी निवृत्ती घेतली आणि सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं. ऑस्ट्रेलियातली दुर्दैवी टेस्ट सिरीज संपल्यावरच त्याच्या निवृत्तीच्या बातम्या फिरू लागल्या होत्या, पण तेव्हा त्यानं त्या स्पष्ट शब्दांत नाकारल्या होत्या, ते का हे आता लक्षात येतं. कारण अख्खी वनडे मालिका शिल्लक होती आणि द्रविडसारख्या खेळाडूची निवृत्ती सहजपणे अख्ख्या ड्रेसिंगरूमला झाकोळून टाकू शकत होती. त्याचसाठी त्यानं ऑस्ट्रेलिया दौरा संपवून सगळे खेळाडू परत घरी येईपर्यंत वाट पाहिली आणि मग निवृत्ती जाहीर केली.
निवृत्ती काय त्याच्यासाठी सोपी असेल? आपण आपले इथे बसून मोठ्या गप्पा करतो, पण योग्य ठिकाणी थांबणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.
"If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story."
असं ऑर्सन वेल्सचं एक वाक्य आहे. राहुल द्रविडची कथा अशीच आहे. त्यानं फुलस्टॉप जिथे दिलाय, तिथे तो त्याला हवा आहे. पण मला तो थोडा त्याआधी हवा वाटतो, इतर कुणाला अजून कुठेतरी हवासा वाटेल.
१९९६ मध्ये मला क्रिकेटची अक्कल फार होती अशातला भाग नाही, पण जबरदस्त वेड मात्र होतं. मी भारतीय संघाच्या हारजितीशी खूपच भावनात्मकरित्या जोडला गेलेला होतो. एरव्ही ज्याला बघून कबूतरही उडून जाणार नाही त्या वेंकटेश प्रसादनं ज्याक्षणी आमिर सोहेलला क्लीन बोल्ड केलं होतं, तो क्षण आजही अंगावर तितकंच रोमांच उभं करतो. प्रसाद त्यादिवशी अढळपदी जाऊन बसला. त्याआधी किंवा त्यानंतर त्यानं काहीही केलं तरी त्याच्या पुढच्या सात पिढ्या त्या एका क्षणावर मिशांना तूप लावून फिरतील, रादर त्यांना हक्क असेल. असो, मुद्दा तो नाही. तर प्रसादचा तो अविस्मरणीय चेंडूनंतर मला झालेला आनंद असो, किंवा श्रीलंकेकडून चारीमुंड्या चीत होताना इडन गार्डन्सवर झालेल्या प्रकारानंतर कांबळीसोबतच माझ्याही डोळ्यांतून आलेले अश्रू असोत, क्रिकेट नसांतून वाहत होतं. तो माझ्या अन क्रिकेटच्या प्रेमप्रकरणाचा सुरूवातीचा कालखंड होता. त्याच्याच आसपास गांगुली आणि द्रविडनं 'त्या' लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केलं. आणि शतकवीर गांगुलीपेक्षा थोडक्यात शतक हुकलेला कमनशिबी राहुल द्रविड मला जास्त जवळचा वाटला. त्याचा अतिशय शांत आणि सालस आविर्भाव की काय माहित नाही, पण काहीतरी वेगळं पाणी होतं. सामान्य कमनशिबी मध्यमवर्गीयाला जवळचं वाटेल असं बरंच काही त्याच्या पुढील १६ वर्षांच्या कारकीर्दीत पाहायला मिळणार होतं, ती इंग्लंडमधली सिरीज केवळ एक झलक होती.
राहुल द्रविडबद्दल एकंदर मतप्रवाह हा बराच नकारात्मक असण्याचा कालखंड होता. आणि माझ्यासारख्या मुंबईकरासाठी तर अजूनच. कारण तेव्हाच्या वर्तमानपत्रांतील स्तंभलेखकांच्या मते दक्षिण विभागाच्या निवड समिती सदस्याचा अमोल मुजुमदारशी छत्तीसचा आकडा होता, कारण अमोलनं त्याला काहीतरी असं करताना पाहिलेलं होतं, जे त्यानं पाहायला नको होतं. आणि केवळ ह्या वैमनस्यातून अमोलनं आयुष्य भारतीय संघाच्या दरवाज्यात बसून काढलं. आणि अमोलपुढे जायला मिळालेल्यांपैकी एक म्हणजे राहुल द्रविड होता, जो दक्षिण विभागाकडून खेळत असे. त्यामुळे समस्त मुंबईकरांच्या रोषाचं कारण अगदी पहिल्यापासूनच तो होता. त्यातच तेव्हा विनोद कांबळीची घसरण सुरू झाली आणि कांबळीच्या करियरच्या विझणार्‍या ज्योतीवर राहुल द्रविडच्या कारकीर्दीची मेणबत्ती पेटवली गेली, असा अजून एक मतप्रवाह मला स्पष्टपणे स्मरतो. राष्ट्रीय संघातल्या निवडीचं श्रेयही त्याला स्वतःला, त्याच्या खेळाला न मिळता खेळातल्या राजकारणाला मिळावं, ह्यापरता दैवदुर्विलास कोणता? आणि ह्याच वशिल्याच्या तट्टूनं पुढली १६ वर्षं राष्ट्रीय संघाचा भार वाहिला.
ती एक गोष्ट आहे ना, की एक मनुष्य स्वर्गात गेल्यावर देवला विचारतो, की माझ्या आयुष्याची जी पावलं वाळूत उमटली आहेत, त्यामध्ये नेहमी तू माझ्यासोबत होतास, म्हणून सगळीकडे पावलांच्या दोन जोड्या दिसतात, पण माझ्या वाईट काळात एकच जोडी दिसते. हे कसं काय? वाईट काळात तू कुठे होतास? तेव्हा देव हसून म्हणतो, ती जोडी माझ्या पावलांची आहे, मी तुला खांद्यावर घेऊन चालत होतो. द्रविड त्या देवासारखा कायम संघासोबत होता, वाईट काळात त्यानं संघाला खांद्यावर घेतलं, पण जगाला फक्त पावलांची एकच जोडी दिसली. ती पावलं माझी आहेत, हे सांगायची द्रविडला कधी गरज पडली नाही.
ऑफ कोर्स, कर्नाटकाकडून पर्यायाने दक्षिण विभागाकडून खेळण्याचा द्रविडला नक्कीच फायदा झाला, कारण पश्चिम विभागातल्या तीव्र स्पर्धेला त्याला सामोरं जावं लागलं नाही. पण ती काय त्याची निवड होती? तो लहानाचा मोठाच कर्नाटकात झाला. तो संघात निवडीची संधी मिळावी म्हणून बडोद्याकडून, बंगालकडून किंवा महाराष्ट्राकडून खेळला नाही. जसजशी दानं पडत गेली, त्यानुसार तो वाट चालत गेला. त्याच्यावर हळू खेळण्याबद्दल प्रचंड टीका झाली आणि त्याला वनडे संघातून वगळलं गेलं, तेव्हा मला किती वाईट वाटलं होतं हे आजही स्मरतं. लहानपणापासूनच मला सशापेक्षा कासव जास्त आवडतं आणि म्हणूनच संजय मांजरेकर आणि नंतर त्याचा वारसदार म्हणून द्रविड माझे फार आवडते. पण द्रविड इतका मोठा झाला की संजय काजवा वाटू लागला. पण द्रविडनं त्याच्या खेळावर काय अन किती मेहनत घेतली कळायला मार्ग नाही, पण तो जो परत आला तो राहण्यासाठीच. १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये तो टॉप स्कोअरर होता, हे त्याचे टीकाकार सोयीस्कररित्या विसरतात. त्यानं कात नव्हती टाकली, त्याला त्याचा खेळ बदलायची गरज नव्हती, त्यानं तो फक्त असा वळवला की त्याचा एकदिवसीय खेळात अडथळा न होता उपयोग होईल. तो तेव्हाही टेक्स्टबुक बॅटिंगच करत होता, फक्त त्यानं तिला कपडे वेगळे घातले होते. ग्राऊंड स्ट्रोक्स फील्डर्सकडे न जाता गॅप्समध्ये जात होते आणि एरियल स्ट्रोक्स फक्त अतिशय गरज असेल तेव्हाच तो डोळे मिटून मारत होता. स्वतःच्या पांढर्‍याशुभ्र कपड्यांवर स्लॉग स्ट्रोक्सचे डाग त्यानं पडू दिले कारण त्याला ठाऊक होतं की तेच त्याला आणि पर्यायानं संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात.
२००३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं विकेटकिपींग केली त्याची कारणं दोन होती. एक म्हणजे संघाला खरोखर गरज होती आणि दुसरं म्हणजे सर्व काही करूनही पुन्हा एकदा त्याच्यावर टेस्ट फलंदाज म्हणून शिक्के मारण्याची सुरूवात झालेली होती आणि अचानकच तथाकथित अष्टपैलूंचं पीक येऊ लागलं होतं. त्यामुळे यष्टिरक्षण करून द्रविड संघासाठी इन्डिस्पेन्सेबल झाला आणि गांगुलीचाही एका अतिरिक्त फलंदाजाचा प्रश्न सुटला. २००३ वर्ल्ड कपनंतर सर्व अष्टपैलूंच्या फुग्यांमधली हवा निघाली आणि द्रविडला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा देण्याची गरज राहिली नाही. त्याबरोबरच त्यानं यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज उतरवून ठेवले आणि गांगुलीच्या अपयशातून मार्ग काढण्यासाठी इतके दिवस त्याच्या सावलीसारखा फिरणार्‍या द्रविडच्या डोक्यावर निवड समितीनं कर्णधारपदाचा काटेरी मुकुट ठेवला.
त्यानं तो घेतला आणि ग्रेग चॅपलच्या बदनाम काळामध्ये संघाचं तारू हाकारायला सुरूवात केली. कारकीर्दीच्या प्रत्येक पडावावरच त्याच्या नशीबी उपेक्षा लिहिलेली होती. आधी तो मुजुमदारच्या ऐवजी वशिल्यानं संघात शिरलेला खेळाडू होता, नंतर कांबळी पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये खोर्‍यानं रन ओढत असताना संघातली जागा अडवून बसलेला बोअरिंग खेळणारा टेस्ट फलंदाज होता, त्यानंतर तो सचिनच्या आधी बॅटिंगला येऊन वेळ खाणारा बॅट्समन होता आणि आता तो लोकप्रिय कर्णधाराला त्याच्याइतकाच इगो असणार्‍या कोचसोबत झालेल्या भांडणानंतर काढून टाकल्यावर रिप्लेस करणारा कर्णधार होता.
गांगुली कर्णधार असताना नागपूरला कसोटी सामन्याच्या वेळेस क्युरेटरनं हिरव्या खेळपट्टीवरून गवत काढण्यास नकार दिला (वास्तविक अशी विनंती करण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे यजमान कर्णधाराला अधिकार असतो), त्यामुळे चिडून गांगुली अनफिट झाला आणि ऐनवेळी द्रविडनं कर्णधारपद भूषवलं होतं. आणि तोच द्रविड गांगुलीच्या ऐवजी कर्णधार झाला (चॅपेलची चाटून कर्णधार झाला) म्हणून त्यानंतरच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यासाठी ईडन गार्डन्सच्या क्युरेटरनं मुद्दाम हिरवी खेळपट्टी दिली. द्रविड काही न बोलता खेळायला उतरला. भारतीय प्रेक्षक दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं आणि द्रविडच्या विरूद्ध घोषणा देत होते. तो सामना दक्षिण आफ्रिकेनं १० गडी राखून जिंकला. सामना संपल्यावर द्रविड एका शब्दानं काहीही वावगं बोलला नाही, पण दक्षिण आफ्रिकन मार्क बाऊचर म्हणाला, "आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर सामना असल्यासारखं वाटत होतं." ईडन गार्डन्सवर झालेल्या अनेक अखिलाडू प्रसंगांपैकी हा प्रसंग मला खरोखर घृणास्पद वाटला होता. त्यापुढची मॅच वानखेडेवर होती, द्रविडनं ती मॅच एकहाती जिंकून दिल्यावर थोडासा भावूक होऊन प्रेक्षकांना दोनतीनदा बॅट फिरवून दाखवली आणि सामना संपल्यावर प्रेक्षकांचे खासकरून आभार मानले. २००७ वर्ल्ड कपपर्यंत संघात इतके भाग पडले होते की द्रविडसाठी सगळंच अवघड होऊन बसलं होतं. त्याच्या आवाक्यात होतं ते सगळं त्यानं केलं. दुफळी माजलेल्या संघाबरोबर आणि अतिशय इगोइस्टिक असलेल्या कोचसोबत त्यानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका जिंकून दाखवल्या. सलग यशस्वी पाठलागांचा रेकॉर्ड बनवला आणि कर्णधार असतानाचा त्याचा बॅटिंग ऍव्हरेज त्याच्या करिअर ऍव्हरेजपेक्षा जास्त होता, हे फार कमी लोकांना जमलं.
पण सर्वच गोष्टी जमणं अवघड असतं, त्याप्रमाणेच त्याला संघाला एकत्र ठेवणं जमलं नाही. दुफळी आणि बेशिस्तीनं कळस गाठला आणि भारत वर्ल्ड कपमधून पहिल्याच फेरीत गारद झाला. तो ही बांग्लादेशकडून हरून. पण बांग्लादेशचा तमिम इक्बाल ज्यानं त्या सामन्यात तुफान फलंदाजी करून भारताला बाहेर फेकलं होतं, तो त्यादिवशीची आठवण सांगतो. मॅच हरल्यानंतर द्रविड तमिमला भेटायला गेला आणि त्यानं त्याचं कौतुक केलं. त्याच्या फलंदाजीची तारीफ केली आणि काही टिप्स दिल्या. तमिम सांगतो की त्याचं आश्चर्र्य ओरसतच नव्हतं. द्रविडच्या खिलाडूवृत्तीनं आणि माणूसपणानं तो भारावून गेला होता. खेळाबद्दलचं सच्चं प्रेम म्हणजे काय असतं ह्याचं हे एक आदर्श उदाहरण ठरावं.
पण वर्ल्ड कपच्या फियास्कोनंतर एक गोष्ट चांगली झाली की निवड समितीनं तडकाफडकी द्रविडला काढलं नाही, त्याऐवजी त्यांनी द्रविडला एक तरूण टीम दिली. द्रविडनंही जवाबदारी घेतली आणि इंग्लंड टूरवर गेला. तिथे तो २८ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकला आणि मग त्यानं शरद पवारांना थेट आपला राजीनामा कळवला. ह्यामुळे निवड समिती अध्यक्षांचा इगो दुखावला गेला आणि त्यांनी त्यानंतर द्रविडचा वनडेमध्ये किती आणि कसा अपमान करता येईल ह्याची पुरेपूर काळजी घेतली. आणि नव्या कर्णधाराचा आधार होताच ह्या सर्वाला.
थोडक्या बॅड पॅचवर तो वनडे संघाबाहेर गेला. पण तो रणजी आणि दुलीपमध्ये दमदार द्विशतकं झळकावतच राहिला. आयपीएलमध्ये प्रशंसनीय कामगिरी झाल्यावर अचानकच चंँपियन्स ट्रॉफीच्या वेळेस सगळ्या इतरांचे बॅड पॅचेस सुरू असताना सर्वांना त्याची आठवण झाली. तो इमानदारीत खेळला आणि उत्तम सरासरीसकट खेळला. पाकिस्तानविरूद्ध हरलेल्या मॅचमध्ये त्याचे एकट्याचे ८७ नाबाद होते. पण ते पुरेसे नव्हते. कदाचित त्याच्यासाठी स्पेशल हाय स्टँडर्ड्स होते. तो पुन्हा बाहेर गेला आणि मग त्याला वर्ल्ड कप प्रॉबेबल ३० मध्येही जागा न देऊन त्याच्या अपमानाचा अजून एक अंक सादर झाला होता. शेवटचा अपमान अजून व्हायचा बाकी होता. वर्ल्ड कप विजेत्या संघात असण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता पण तोही नाकारला गेला, पण अत्यंत अनडिझर्व्हिंग अशा कित्येक जणांना तो मान मिळाला.
टेस्टमध्ये त्याला हात लावण्याची कुणाची हिंमतही नव्हती कारण सेहवागच्या दोन ३०० धावांच्या इनिंग्जमधल्या सर्व इनिंग्ज सावरण्याचं काम त्याच्याशिवाय कुणी करत नाही हे सर्वज्ञात होतं. पण वनडेसाठी फ्रेम ऑफ रेफरन्स दुर्दैवानं कोणतीच नव्हती आणि धूर्त कर्णधार, इगो दुखावलेला निवड समिती अध्यक्ष आणि वाढतं वय ह्या गोष्टी त्याच्याविरूद्धच जात होत्या. पण गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौर्‍यावर चमत्कार झाला. द्रविडच्या निवृत्तीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. आणि त्याच वेळेस इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळू लागली. फक्त भारताच्या अभेद्य भिंतीला तडा गेला नाही. तो एकटाच खेळपट्टीवर उभा राहून शतकामागे शतकं ठोकू लागला. हिरव्या आणि जलद खेळपट्ट्यांवर सगळं नवं रक्त पांढरं पडत होतं पण तंत्र आणि निष्ठा असल्या गोष्टींची मिंधी नसते. आयुष्यातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटीपासून ज्या 'लॉर्ड्सवरील शतकानं' त्याला हुलकावणी दिली ते शेवटी त्याच्या शेवटच्या इंग्लंड दौर्‍यावर लागलं आणि ब्रिटीशांनीही त्याला उठून उभं राहून मानवंदना दिली. द्रविडच्या नावाशिवाय लॉर्ड्सवरचा ऑनर बोर्डही अधुराच राहिला असता, त्याला पूर्णत्व मिळालं आणि द्रविडचा शेवटचा अपमान करायची संधी निवड समितीनं घेतली. दाणादाण उडालेल्या फलंदाजीमुळे द्रविडचं वनडेत पुनरागमन झालं. पण ते त्याला लागलं. आपल्याला गृहित धरलं गेलं ह्याचं त्याला किती वाईट वाटलं असावं. तो नाही म्हणू शकत होता, पण ते त्याला शोभलं नसतं. तो खेळला पण ती स्पर्धा संपताच वनडेतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा करून.
त्यानंतर जणू त्याचा पर्पल पॅच होता. घरी येऊनही त्याची शतकं थांबत नव्हती, म्हणूनच त्यानं ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊनही ब्रॅडमन ओरेशनमधला पहिला नॉन ऑस्ट्रेलियन वक्ता ठरला आणि नुसतं तिथेच त्याचं वेगळेपण संपलं नाही तर त्याच्या त्या भाषणामध्ये त्याच्या अभ्यासू आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे इतके पैलू दिसले की लोकांची तोंड स्तुती करून थकत नव्हती. पण काहीतरी बिनसलं आणि पहिल्या डावात निर्दोष अर्धशतक करूनही अचानकच त्याचा खेळ ढासळला. तो पुढच्या प्रत्येक डावात थोडक्यात क्लीन बोल्ड झाला. तो काही त्याच्या कारकीर्दीचा शेवट नव्हता, तो त्यातनंही निश्चित बाहेर आला असता. पण कदाचित त्याच्यासाठी कथेचा शेवट तिथे होता. टीममधली राजकारणं, दुफळी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कळसास पोचली होती. कदाचित आता हे सर्व पाहत स्वतःचा खेळही सांभाळण्याचे कष्ट घ्यावेत का हा प्रश्न त्याला पडला असावा. इतकी वर्षं सगळी राजकारणं, सगळे दुर्दैवी अंक आणि अर्थातच एक छोटंसं सुवर्णयुग पाहत तो खेळला. आणि नुसताच खेळला नाही, तर उपकर्णधार आणि कर्णधार ह्या पातळीवरून त्यानं ते सगळं काही जवळून पाहिलं, अनुभवलं. पण अजून एका परीक्षा द्यायची गरज त्याला वाटली नसावी. त्याची कारणं त्याच्याजवळ आहेतच आणि ती त्यानं कुणाला सांगायची गरज नाही.
मी फॅनबॉय नाही. मी चाहता अनेक व्यक्तिंचा आहे, पण वेडा मी फार कमी लोकांबद्दल आहे. अशी दोन माणसं म्हणजे मिथुनदा आणि राहुल द्रविड. "बाबा"च्या भिंतीतला बाबा मिथुनदा आहेत आणि भिंत म्हणजे राहुल द्रविड हे स्पष्टीकरण पुरेसं आहेच. मला कधी कुणाचे पोस्टर्स घरात लावावे वाटले नाहीत, फक्त राहुल द्रविडचा अपवाद वगळता. ह्या दोन माणसांबद्दल मी वेडा फॅनबॉय आहे, हे मला तेव्हा लक्षात आलं जेव्हा मी एका शनिवारी ऑफिसात असताना बाबांचा अचानक फोन आला, "राहुल द्रविड आलाय इथे, लवकर येऊ शकशील काय?"
माझ्या छातीत धडधडायला लागलं. माझे वडील रिटायरमेंटनंतर एका स्पोर्ट्स क्लबमध्ये मेंटेनन्सचं काम पाहतात. आणि तो क्लब माझ्या ऑफिसच्या समोर आहे. तिथे राहुल द्रविड एका प्रायोजकाच्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. मी चटकन तिथे गेलो. नशीबानं मी त्यादिवशी वडलांच्या क्लबचा एक टीशर्ट घातला होता. त्यामुळे मी जेव्हा द्रविडच्या दिशेनं चालत गेलो तेव्हा त्याला वाटलं मी क्लबचा माणूस आहे, त्यामुळे तो बसल्याजागी थोडासा पुढे झाला. माझ्या दैवताला असा समोर प्रत्यक्ष पाहून माझी बोलतीच बंद झाली होती. मी हात पुढे केला आणि त्यानं हात मिळवला. मी कृतकृत्य झालो होतो. त्यानं प्रश्नार्थक चेहरा केला.
"आय ऍम युअर बिग फॅन सर." माझ्या तोंडून जेमतेम शब्द निघाले.
"ओह्ह. ओके." तो थोडं हसून म्हणाला.
बस. मला अजून काही सुचलं नाही. जाताना किती काय काय विचार करून गेलेलो.
हरकत नव्हती. पुरेसं होतं देवदर्शन!
द्रविडच्या कारकीर्दीपासून आणि त्याच्या एकंदरच वर्तनापासून सर्वांनाच शिकण्यासारखं खूप काही आहे. मी जर काही शिकायचा प्रयत्न करतो तर ते हे की कुठल्याही स्थितीत टिकून राहायचं. तुमच्याकडे ते असामान्यत्व नसेल, पण तुमची टिकून राहण्याची, मेहनत करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती तुमचं असामान्यत्व बनू शकते. सचिन सुपरमॅन असेल तर द्रविड बॅटमॅन होता. त्याच्या शक्ती त्यानं स्वतः बनवल्या आणि त्यांवर काम केलं. आजही जेव्हा कधी अतिशय नैराश्य येतं तेव्हा मी द्रविडचा विचार करतो. आणि लढण्याची नाही तरी किमान टिकून राहण्याची प्रेरणा पुन्हा एकदा मिळते. टिकून राहणं महत्वाचं, योग्य चेंडूची वाट पाहत.
राहुल द्रविडला पुन्हा कधी भेटेन की नाही ठाऊक नाही. पण कधी भेटलोच तर अजिबात हक्क नसतानाही काही गुस्ताख प्रश्न विचारेन. एक म्हणजे निवृत्तीचा निर्णय नक्की कशामुळे. आणि दुसरा म्हणजे त्यादिवशी सचिन १९४ नाबाद असताना नक्की त्यानं डाव का घोषित केला. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व पाहता, नक्कीच 'त्या' निर्णयामागेही काही पटण्यासारखं कारण असेल असा विश्वास वाटतो. पण महत्वाचं म्हणजे हे विचारेन की इतकं प्रचंड यश मिळूनही पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे तो आजच्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या होणार्‍या पोरांना शिकवेल का? आणि 'ज्यांना कधी संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी तरी मी चांगलं खेळलंच पाहिजे' इतका परिपक्व विचार नक्की आला कुठून?
द्रविडची कारकीर्द म्हणजे परीकथा नव्हती. एका सामान्य माणसाच्या असामान्यत्वाकडच्या वाटचालीची कथा होती. म्हणून ती सत्यकथा होती. त्याच्या निवृत्तीनं ती कथा संपली. सत्यकथांचा शेवट सर्वांना हवाहवासा किंवा अगदी सर्वांना अश्रूपाताकडे लोटणारा शोकांतही नसतो. तो वेगळाच असतो. खराखुरा. म्हणूनच ती सत्यकथा असते.

22 comments:

  1. द्रविडबद्द्ल तू जे मांडलंस ते अगदी अगदी मनातलं.....त्यात ती "देवाची पावलं" ची उपमा अगदी अगदी यथार्थ....
    शेवटच्या परिच्छेद खूप काही सांगुन जातो....मला वाटतं द्रविडसाठी जितके वाद मी त्यावेळी घरी/मित्र-मैत्रीणींमध्ये घातलेत ते आता आठवत पण नाहीत..पण तो खूप भावला होता आणि आहे...अगदी ज्या शांतपणे तो निवृत्त झाला त्यासाठीसुद्धा असं आता दोन आठवडे झाल्यावर वाटतं...

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      द्रविडमध्ये एक सटल क्वालिटी आहे... इट जस्ट अपील्स टू एव्हरीवन! त्याचे फॅन्स नेहमीच फॅन्स फॉरेव्हर असतात! :)
      धन्यवाद!

      Delete
  2. शब्दातीत...

    एकदम जबरदस्त पोस्ट विभी. व्यक्तिपूजक आणि चाहता यामध्ये जी अस्पष्ट रेषा असते ती आज तुझ्या पोस्टमधून ठळकपणे दिसून आली. द्रविडच्या संपूर्ण कारकिर्दीचा इतका सखोल आणि द्रविडच्या खेळीसारखा निर्दोष आढावा घेणे एखाद्या व्यावसायिक क्रीडासमीक्षकालादेखील कदाचित जमणार नाही. द्रविडच्या निवृत्तीनंतर अनेक बातम्या, ब्लॉग वाचण्यात आले. भावनेच्या भरात किंवा आपली प्रतिक्रिया आंतरजालावर उठून दिसाण्यासाठी द्रविडला नाना विशेषणे लावून प्रचंड शब्दछल झाला. पण द्रविडसारख्या अभ्यासू आणि गुणी खेळाडूबद्दल तुझ्यासारख्या निस्सीम चाहत्याने लिहलेली ही पोस्ट म्हणजे द्रविडच्या अजोड कामगिरीला खरीखुरी मानवंदना. त्याला लौकिकार्थाने ग्रँड समारोप मिळाला नसला तरी तुझ्या पोस्टमधून तू त्याला खांद्यावर घेऊन त्याची पूर्ण कारकीर्द फिरून आलास.

    Hats Off to Rahul Dravid and his TRUE Fan!!!

    ReplyDelete
    Replies
    1. द्रविड निवृत्त झाला त्यादिवशी मला फारसं काही जाणवलं नाही.. पण बहुतेक दोन दिवसांनी अचानक सकाळी उठलो आणि लक्षात आलं की आता द्रविडचं नाव कुठल्याही बॅटिंग ऑर्डरमध्ये दिसणार नाही.. आणि एकदम पोटात खड्डा पडला. पण मी मुद्दाम उशीरानं लिहायचं ठरवलं कारण त्याच्या रिटायरमेंटपाठोपाठ त्याच्यावरच्या लेख/ब्लॉग्जचा पूर येईल ह्याची कल्पना होती आणि मला ते सगळे लेख/ब्लॉग एन्जॉय करायचे होते (काही अति असले तरीही) :)
      आणि ही गॅरंटी होती की मी कितीही दिवसांनंतर लिहिलं तरी द्रविडबद्दल मला जे जे वाटतं ते यत्किंचितही कमी होणार नाही!
      आणि खरं सांगायचं तर तुझी प्रतिक्रिया वाचली आणि पोस्ट लिहिल्याचं समाधान वाटलं!
      धन्यवाद रे भाऊ! :)

      Delete
  3. वा!...सचिनचं १००वं शतक झाल्यावर द्रविडवर पोस्ट बघायला मिळणं हा सुखद धक्का होता!
    Rahul Dravid..Take a bow!!

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      सचिनचं शतक थोडं आधी लागलं असतं, तर द्रविडच्या रिटायरमेंटलाही बातम्यांत कमी जागा मिळाली असती कदाचित! पण काय फरक पडतो? न द्रविडला न त्याच्या फॅन्सना :D
      धन्यवाद चैतन्य!

      Delete
  4. सचिन सुपरमॅन असेल तर द्रविड बॅटमॅन होता. त्याच्या शक्ती त्यानं स्वतः बनवल्या आणि त्यांवर काम केलं.>>> Claps....

    ReplyDelete
    Replies
    1. अरे कुठेतरी वाचली होती ही ऍनॉलॉजी! मी फक्त पेरलीय :)
      धन्स भावा!

      Delete
  5. मस्त! पक्क्या द्रविडवेड्याने लिहिलंय, हे जाणवतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      एकदम पक्क्यांतला पक्का!
      धन्यवाद गौरी!

      Delete
  6. खास... एका मुलाखतित हर्षा भोगलेला सचिन 194वर असताना मॅच घोषित करण्याच्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असताना तो म्हणाला, मी त्यासाठी उठून टाळ्या वाजवल्या. कारण पहिल्यांदा कोणा कर्णधाराने निर्णय एका व्यक्तीसाठी नं घेता संघासाठी घेतला होता. सामना अमुक दिवशी अमुक वेळी घोषित करण्याचा निर्णय झाला होता.
    Dravid is legend....

    ReplyDelete
    Replies
    1. आयला ह्या मुलाखतीबद्दल कधी वाचनात आलं नव्हतं! इंटरेस्टिंग आहे.. :)
      Dravid is legend +द्रविड! :D

      Delete
  7. मस्त रे. द्रविडबद्दल इतकं भरभरून तूच लिहू शकतोस :) :)

    मला शीर्षक प्रचंड आवडलं, एकदम समर्पक ....

    ReplyDelete
    Replies
    1. यप्प... अख्खा लेख लिहून झाल्यावर सुचलंय ते शीर्षक! :)
      धन्स भाऊ!

      Delete
  8. 'तुमच्याकडे ते असामान्यत्व नसेल, पण तुमची टिकून राहण्याची, मेहनत करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती तुमचं असामान्यत्व बनू शकते.'
    सुंदर. :)

    ReplyDelete
  9. हे वाक्य मात्र माझंच आहे! :D
    धन्स गं ताई! :)

    ReplyDelete
    Replies
    1. Anonymous9:11 AM

      _/\_ :) :)

      भिंतीवर वॉलची पोस्ट म्हटल्यावर क्या कहेने :)

      तू ब्लॉगिंगमधला द्रविड आहेस बाबा :)

      Delete
    2. :)
      ताई.. केव्हढी मोठी कॉम्प्लिमेंट! :)

      Delete
  10. सॉरी. पण हे आता माझ्या बाबतीत एवढ्या रेग्युलर व्हायला लागलंय की मी खरोखरच थापा मारतोय असंच सगळ्यांना वाटायला लागलं असेल.. पण खरंच सांगतो मी या पोस्टवरही कमेंट दिली होती आणि ती मला आता इथे दिसत नाहीये :(((
    असो पुन्हा एकदा टाकतो.

    बाबा, जितकी सुंदर, अप्रतिम, भावस्पर्शी आणि वास्तवदर्शी पोस्ट टू लिहिली आहेस त्याच्या १/१० चांगली मला कमेंटही देता येणार नाही.. जिओ !!

    ReplyDelete
    Replies
    1. भावा, तुझी कॉमेंट मला मेलबॉक्समध्ये मिळाली होती.. पण इथे दिसतच नव्हती! :(
      मला वाटलेलं ब्लॉगर गंडलंय आणि दिसेल दोनतीन दिवसांत! असो..
      :)

      Delete
  11. जबरदस्त रे. कधी सचिनबद्दल पण लिहिशील असच. फार छान लिहितोस तू.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संचित!
      सचिनबद्दल खूप जणांनी खूप लिहिलंय.. पण खरं सांगायचं तर सचिनबद्दल तितकं आतून मला वाटत नाही.. मी त्याचा चाहता आहे.. पण तितकंच! :)

      Delete