2/26/2010

रितीच घागर नशिबी माझ्या..!

माझ्या नटरंग पुराणामुळे आता माझे मित्र, माझे घरचे सगळेच पकले आहेत, पण नटरंग बद्दल ऐकून, वाचून, पाहून आणि त्यातली गाणी ऐकून मी मात्र अजूनही पकलो नाही आहे. आणि कधी पकेनसं वाटत नाही. (अर्थात मतभेद असु शकतात).गाण्यांचा तर रतीब घालतोय मी स्वतःला. जवळपास सगळीच तोंडपाठ झाली आहेत. असो, मुद्दा तो नाही. प्रत्येक गाण्याचे श्रेय जितके अजय-अतुल चे आहे, तितकेच गुरु ठाकूर चे आहे. नुसतीच सुंदर शब्दरचना नाही तर, पात्राची मनस्थिती, काळ ह्या सगळ्याचं अप्रतिम मिश्रण जवळपास प्रत्येक गाण्यात आहे. मी प्रत्येक गाण्याबद्दल वेगळी नोंद लिहू शकतो, पण ते नंतर, आत्ता ज्या गाण्याबद्दल लिहिण्यासाठी कित्येक दिवसांपासून ठरवतोय, त्या गाण्याबद्दल.
'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' हे गाणं म्हणजे एक गवळण आहे. हे गाणं चित्रपटामध्ये गुणा कागलकरच्या पहिल्या तमाशातील आहे. गुणा शेतातील विहिरीचे पाणी काढून द्यायचे काम करतो. पण शेतांमध्ये विहिरीवर मोटर बसवल्याने गुणाला दुसर रोजगार शोधणे भाग पडते. आणि तो आपल्या कलेचा उपयोग करायचं ठरवतो.  पण परिस्थितीमुळे त्याला नाच्या बनावं लागतं. आता पहिलवान गुणा नाच्या बनलाय आणि आपल्या गावातल्यांसमोर, स्वतःच्या बायको-मुलासमोर आपला तमाशाचा धंदा सुरु करतोय - नाच्याच्या रूपात. अशा वेळी त्याच्या गवळणीतल्या ओळी असतात.
"नकोस फोडू कान्हा माझी, घागर आज रिकामी। हसेल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी॥
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे। रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले॥"
ह्या ओळींमधून तो देवाकडे लाज राखण्याचं आवाहन करतो. एक म्हणजे धंद्याची लाज आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाची(तो नाच्या बनल्यामुळे). अर्थात, हे सगळं सूज्ञ वाचकांना ठाउकच असेल, पण मला केव्हाचं डाचतंय आणि आज दोनदा गाणं ऐकल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही.
पुन्हा गुरू ठाकूर पाणी भरणार्‍या गुणा कागलकरच्या तोंडी रिकाम्या घागरीचं उदाहरण देतात, तेव्हा आपोआप दाद जाते. वाह!

No comments:

Post a Comment