6/11/2010

भ्रूण

निवेदन : प्रस्तुत नोंद ही एक कथा असून, पूर्णतया काल्पनिक आहे. हा माझा अनुभव नाही. नोंद टाकली तेव्हा लक्षात नाही आलं, पण काहीजणांचे गैरसमज होत आहेत असं जाणवलं म्हणून हे निवेदन. झालेल्या-न झालेल्या गैरसमजाबद्दल
क्षमस्व.

मी भोपाळला जाणार्‍या गाडीत चढलो आणि माझा बर्थ शोधत हळू हळू पुढे सरकू लागलो. ही माझी नेहमीची सवय आहे, मी कधीच फर्स्ट किंवा सेकंड एसीने जात नाही, सर्वसामान्य माणसं सहसा तिथे भेटत नाहीत. माझी सीट आणि बर्थ मिळाल्यावर मी माझी छोटी बॅग सीटखाली सरकवून शांतपणे जीएंचं एक पुस्तक काढून वाचत बसलो. आत्ताशी संध्याकाळ होती, त्यामुळे इतक्यात बर्थवर जाण्याचा प्रश्न नव्हता. आता वाट पाहायची होती सहप्रवाश्याची. मला एकच सहप्रवासी मिळणार होता, कारण मी दोन सीटांच्या बाजूला होतो. हळूहळू ट्रेन भरत होती. मी पुस्तकात चांगलाच गुंतलो होतो. एव्हढ्यात, समोर येऊन कुणीतरी बसल्याचं जाणवलं. मी मान वर करून पाहिलं. एक पंचविशीचा पोरगेलासा युवक माझ्यासमोर बसला होता. माझ्याकडे पाहून त्याने हलकं स्मित केलं, मी ही.

"आप भोपालके हैं?" त्यानं भाबडेपणानं विचारलं. त्याच्या नाजूक, गोर्‍या, देखण्या चेहर्‍यावर एक अशक्तपणा जाणवत होता.

"नहीं, लेकिन कामके सिलसिलेमें अक्सर वहां जाना होता है. क्यूं?" मी.

"नही, मैं असलमें वहीं का हूं, लेकिन कभी गया नही आज तक." माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे म्हणाला, "मतलब, मेरे मां-बाप वहीं के हैं, मेरी पैदाईश मुंबईकी है! अप्रैल, १९८५"

माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"आप क्या काम करते हैं?" त्याच्या पुढच्या प्रश्नाने मी भानावर आलो.

"मैं डॉक्टर हूं, 'संभावना' जानते हो? उनके क्लिनिक के लिये काम करता हूं थोडा-बहुत, मेरा रिसर्च सब्जेक्ट है"

"सॉरी आपका नाम?"

"अरे हां, वो तो बताया ही नहीं, ...."

"तुम्ही पण मराठी?" तो प्रफुल्लित चेहर्‍याने म्हणाला.

"तुम्ही पण?" मी.

"हो, माझे बाबा तिथे नोकरीला होते तेव्हा. " मग अचानक त्याच्या चेहर्‍यावर शोककळा पसरली.

"डॉक्टर, तुम्ही श्वसनाच्या विकारांचा इलाज करता का हो?" त्याने भाबडेपणाने विचारलं.

"हो, थोडंफार, पण मी ऍक्च्युअली संशोधन करतोय, इलाज करणारे वेगळे असतात."

"..."

विषय बदलावा म्हणून मी सहज विचारलं, "भोपाळला काही विशेष?" आणि एकदम मी जीभच चावली.

त्याचा चेहरा एकदम वेदनाग्रस्त झाला. आणि मग हळूहळू तो मोकळा होत गेला आणि माझ्या बर्‍याच शंकांचं खात्रीत रुपांतर होत गेलं.

तो ६ जून होता, ७ जूनला न्यायालयात भोपाळ गॅस दुर्घटना खटल्याचा निर्णय होता आणि हा भोपाळ गॅसपीडित तिथे पहिल्यांदाच चालला होता, न्याय घेण्यासाठी!

डिसेंबर २, १९८४ ची रात्र होती. भोपाळच्या एका कोपर्‍यात शांत झोपलेले एक नवरा आणि गरोदर बायको. युनियन कार्बाईडने हाहाकार माजला आणिइतर अनेकांप्रमाणेच हे छोटं कुटुंबही उद्ध्वस्त झालं. मग तसेच विकार घेऊन ते मुंबईत आले आणि नव्या उमेदीने संसार सुरू केला. पोटातल्या भ्रूणावरही त्या गॅसचा आघात झाला होता. आईच्या पोटातच आजार जडलेला तो निष्पाप भ्रूण माझ्यासमोर बसून मला आपली कर्मकहाणी सांगत होता. त्याचे उसासे वाढले की त्याला दम लागायचा. माझ्या पोटात कालवाकालव होत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच मला आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं.

८ जूनची सकाळ. मी सेकंड एसीमध्ये आपली सीट शोधत होतो. हातामध्ये सवयीने जीए आले आणि अचानक शेजारच्या सीटवरच्या माणसाच्या पेपराकडे लक्ष गेलं. सगळ्या बातम्या माहितीतल्याच होत्या. दुर्दैवाने सगळ्याच. पातळ कागदामुळे पहिल्या पानावरच्या बातम्या आणि दुसर्‍या पानावरच्या बातम्या मिसळून गेल्यासारख्या दिसत होत्या. 'युनियन कार्बाईडचे दोषी कर्मचारी फक्त दोन वर्षांची शिक्षा घेऊन जामीनावर सुटल्याची व गोर्‍या अधिकार्‍यांना निर्लज्जपणे सोडल्याची' आणि 'भ्रूणहत्येची' बातमी मिसळून एकच होऊन गेली होती.

कदाचित त्याच ट्रेनच्या सेकंड क्लासमध्ये एक भ्रूणावस्थेतच हरवलेलं आयुष्य, न मिळालेल्या न्यायाचा शोक करत असेल, आणि गोर्‍यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ही लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल.

19 comments:

  1. शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
    बाकी काही बोलू इच्छीत नाही...

    ReplyDelete
  2. "आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं"....

    आपल्या अज्ञानाची जाणीव हिच खरी पहिली पायरी आहे, काहीतरी अधिक चांगलं करावं याची निकड वाटण्याची. त्यातूनच आपल्या लोकांना अधिक चांगली व्यवस्था निर्माण होण्यासाठी काहीतरी होउ शकतं.

    गरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची.


    हा अनुभव सगळ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला ही खरंच चांगली गोष्ट आहे.

    ReplyDelete
  3. तुम्ही कधीच सेकंड एसी ने जात नाही म्हणता नं....? मग?
    आपणच जिथे पहिल्या व शेवटच्या परिच्छेदां मध्ये सुद्धा सातत्य दाखवू शकत नाही तिथे इतरांकडून नुसत्या कोरड्या अपेक्षा का ठेवायच्या? फुकटचा शहाण पणा!

    ReplyDelete
  4. धन्यवाद आनंद.
    मला जे सांगायचं होतं, ते थोडंफार तरी पोचलं हे वाचून बरं वाटलं...

    ReplyDelete
  5. प्रशांत,
    ब्लॉगवर स्वागत. तुमची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. पण, तुमचा गैरसमज झालाय, हा माझा अनुभव नाही, ही कथा आहे. ती माझीच चूक होती, की मी कुठेही लिहिलं नाही...म्हणून आता निवेदन टाकलंय.
    बाकी
    >>गरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची
    अगदी खरंय...
    प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  6. आंबट-गोड,
    सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत.
    तुम्ही मायबोली किंवा सकाळ मुक्तपीठवर असता का हो ताई?
    तुमचा एकंदर आविर्भाव पाहून तसंच वाटलं, बाकी मी मुक्तपीठ आणि मायबोली दोन्हींचा फॅन आहे.
    असो, तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की तुम्हाला कथेतले छुपे अंतर्प्रवाह(सटल अंडरटोन्स) एकतर कळले नाहीत, किंवा तुम्ही ते मलाच कळले की नाही ह्याची परीक्षा घेताय.
    कारण माझ्या कथेत कुठेही इन्कन्सिस्टन्सी नाही, तो दुसरा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे. बाकी कदाचित तुम्हाला कुठला दुसरा अंतर्प्रवाह दिसला असेल, जो माझ्याच नजरेतून सुटला आहे, तर मी पामर काय करू.
    बाकी, मी इतरांकडून काय अपेक्षा ठेवल्या हे माझ्या गज़नीबुद्धीला स्मरत नाहीये. आणि ठेवल्याच असतील, तर असला शहाणपणा मी पुन्हा करणार नाही ह्याची खात्री बाळगा!
    आणि हो, तुम्हाला हा माझा खरा अनुभव वाटला असेल तर गैरसमजाबद्दल क्षमस्व! ही कथा आहे!

    ReplyDelete
  7. एक चांगला विषय हातळलाय आपण..
    पण माझ्या अल्पमतीला सेकंड एसीचं कोडं कळलं नाही..

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. विषण्ण !!! पराकोटीच्या हतबलतेचं अनुभव !! :(

    ReplyDelete
  10. फार अस्वस्थ झाले वाचून. निकाल कळला त्यादिवशी पुन्हा एकवार न्याय आंधळा असतो याची खात्री पटली. विद्याधर, अतिशय अंडरटोन ठेवून लिहिलेली चांगली कथा.

    ReplyDelete
  11. बातमी वाचून मी ही क्षणभर विषण्ण झालो होतो हेरंब..
    अक्षरशः! मग त्यानंतर कोडगेपणाचं कोड पुन्हा मनावर पसरलं...

    ReplyDelete
  12. भाग्यश्रीताई,
    खरंच न्यायदेवता आंधळीच असते, पण त्यातही, सर्वसामान्य लोकांसाठी तर अगदी ठार आंधळी. थोडक्यात एक कथा लिहून मनातली खिन्नता मांडायचा प्रयत्न केला.
    एका कसलेल्या कथालेखिकेकडून एक कौतुकाची थापही मोलाची आहे! :)

    ReplyDelete
  13. शेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...
    बाकी काही बोलू इच्छीत नाही...

    +1
    निशब्द..अन वांझोटा संताप

    ReplyDelete
  14. Anonymous1:55 PM

    आज २६ वर्षानंतरसुदधा न्याय मिळाला तो सुदधा असा xxxxx ...बाकी काय बोलु...

    ReplyDelete
  15. अनामिक,
    तुला काय उत्तर देऊ ह्याचाच विचार मी कालपासून करतोय, त्याकारणे हा उशीर.
    अरे त्या सेकंड एसीच्या मागे सगळे हात धुवून मागे का लागले हे कळत नाही. शेवटाकडे मुख्य व्यक्तिरेखा पिडितांच्या नजरा टाळण्यासाठी सेकंड एसीने जातो, एव्हढ्या साध्या विचाराने लिहिलं, पब्लिकने फुल 'क्लास वॉर' केलं त्याला.
    जाऊ दे.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  16. खरंच सागर,
    >>वांझोटा संताप
    अगदी चपखल शब्द!

    ReplyDelete
  17. देवेन,
    न्याय कमी आणि चेष्टा जास्त झाली! :(

    ReplyDelete
  18. "गोर्‍यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ही लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल." एकदम पटलं. कथा परिणामकारक झाली आहे.
    -निरंजन

    ReplyDelete
  19. धन्यवाद निरंजन!
    वांझोटा संताप आणि त्यातून येणारी हतबलता! :(

    ReplyDelete