9/19/2010

बॉईज डोन्ट क्राय!

काल परवाच नदाल आणि फेडरर ह्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? ह्या निरर्थक चर्चेचं गुर्‍हाळ चालू असताना अचानक, फेडरर एकदा पाच सेटची फायनल हरल्यावर ढसाढसा रडला होता, आणि ते कसं चूक होतं, अखिलाडू होतं ह्यावर चर्चा सुरू झाली. सर्वप्रथम मला हा मुद्दा बाद वाटला. कोर्टवर रडणं न रडणं हा चांगला किंवा वाईट खेळाडू किंवा चांगला किंवा वाईट माणूस असण्याचा क्रायटेरिया असू शकत नाही.

दुसरा मुद्दा हा की इतकी वर्षं कोर्टावर(टेनिसच्या) घालवल्यानंतर फेडररमध्ये एव्हढी खंबीरता आणि खिलाडूवृत्ती यायला हवी होती की त्यानं मोठ्या मनाने नदालला त्याच्या विजयाचा आनंद लुटू द्यायला हवा होता. २८ वर्षांच्या १३ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या फेडररला २२ वर्षांचा ३-४ स्पर्धा जिंकलेला नदाल सांत्वन देत होता आणि पुन्हा, "विजयावर त्याचाही हक्क होताच ना!", इतकं प्रगल्भ विधानही करत होता.

ओके. आता मी काही बोलू ह्यावर? एखाद्याची मरमर मेहनत वाया गेल्यावर त्याने रडूही नये काय? त्याच्या रडण्याचा आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या आनंद साजरा करण्याचा काय संबंध? तो न रडून काय मोठेपणा दाखवणार होता? तो २८ वर्षांचा होता, ही त्याची चूक होती का? मनाची खंबीरता आणि रडणं ह्यात काही थेट संबंध आहे का? एखादे क्षणी फुटतो बांध माणसाचा, त्यात लगेच इतक्या वर्षांचा अनुभव, खंबीरपणा ही लेबलं कशाला लावायची? नदाल हा खंबीर आहे आणि वयाच्या मानाने प्रगल्भही, म्हणून लगेच फेडररला दोष देऊन मोकळं व्हायचं? नदालने फेडररची सांत्वना केली, म्हणून लगेच फेडरर खुजा झाला? पाच सेट्सची मॅच तो ही खेळला होताच ना? शेवटच्या क्षणापर्यंत तो ही लढला होताच! हरला तो, त्याची १४ वी ग्रँडस्लॅम तीन महिने अजून दूर गेली! त्याला अपार दुःख झालं असेल. त्याचा स्वतःबद्दलचा विश्वासच उन्मळून पडला असेल. त्यानं रडूही नये? त्याचा स्वतःबद्दलचा विश्वास उन्मळून पडायचं नदाल फक्त एक कारण होता, लगेच, तो नदालबद्दल इन्सिक्युअर झालाय वगैरे ठरवून लोक मोकळे! त्यानंतर त्यानं आठपैकी फक्त दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या! फक्त दोन? बरं, मग लगेच, त्या दोन्ही मध्ये नदालशी तो खेळला नाही हे आर्ग्युमेंट. बरं.. फेडरर नदालबद्दल इन्सिक्युअर आहे, रडका आहे!(इथे मला 'सचिन संपला' स्टाईलचे लेख आठवतात) आय रेस्ट माय केस! बस फेडरर एकदा परत जिंकेस्तो! असो, विषयबदल होतोय.

हाच फेडरर वयाच्या २३ व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा ग्रँडस्लॅम जिंकला, तेव्हा कोर्टवर ढसाढसा रडला होता! त्याचं संवेदनशीलता म्हणून कौतुक झालं होतं. तोच फेडरर १३ ग्रँडस्लॅम जिंकला, मोठा झाला, म्हणून रडका ठरला. का तर पहिल्यांदा तो जिंकल्यावर रडला आणि नंतर हरल्यावर! तो माणूस आहे, हेच कुणाला मान्य नाही. त्याचेच चाहते त्याला अखिलाडू ठरवून मोकळे झाले! अशाच एका ठिकाणची चर्चा वाचताना, एका माणसानं, एक मुद्दा मांडला. तो म्हणाला, हेच जर स्टेफी ग्राफ कोर्टवर हरल्यावर रडली असती, तर कुणाला वाईट वाटलं असतं? इथे फेडरर, एक पुरुष रडला, म्हणून लगेच सगळ्यांनी त्याला अखिलाडू ठरवलं. मी विचारात पडलो.

खरंच, कदाचित असंही असू शकतं. नुसती भारतीय नाही, तर ही जागतिक मानसिकता आहे. 'बॉईज डोन्ट क्राय!' पुरुषांनी रडायचं नाही. मागे एकदा महेंद्रकाकांनी एक पोस्ट लिहिली होती सारख्याच विषयावर. पुरुषाची संवेदनशीलता कधी विचारातही घेतली जात नाही. त्यालाही मन असतं, तो ही माणूस असतो. इथे स्त्रियांना चूक-बरोबर ठरवत नाहीये मी. मी फक्त एक सामाजिक समजूत मांडतोय.

क्लासिक केस म्हणजे 'राम'. 'मर्यादा पुरुषोत्तम राम'! आधुनिक काळात सगळ्या स्त्रीवाद्यांनी आणि विचारवंतांनी रामाला धारेवर धरलं. त्यानं धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला त्यागलं. त्याच्या मर्यादा पुरूषोत्तम असण्यावरच प्रश्न उठले. पण कुणालाच त्याच्या बाजूनं एकदा विचार करावासा वाटला नाही. एकतर कट्टर आंधळे भक्त नाहीतर टीकाकार! राम ह्या पात्राचा कुणीच विचार केला नाही.

एक असा राजा ज्याच्यावर हजारो अपेक्षा होत्या. त्याच्यावर जगातला सर्वांत अवघड निर्णय लादला गेला. पत्नी किंवा राज्य! त्यानं राजाची कर्तव्य पूर्ण करणं इष्ट मानलं. कारण तो राजा आधी होता आणि पती नंतर. त्यानं यःकश्चित धोब्याच्या बोलण्यावरून पत्नीला त्यागलं, कारण त्याचा तिच्यावर संशय होता म्हणून नव्हे, तर तो चुकीचा का असेना, राजधर्म होता म्हणून. सीतेच्या माथी कलंक लागला, पण राम काय सुखी झाला का त्यामुळे? तो चुकला होता, पण तेच त्याचं प्रारब्ध होतं. सीता गेल्यावर त्यानं हजारो विनंत्या धुडकावल्या. तो सीतेशिवाय एकटाच राहिला. त्यानं दुसरं लग्न केलं नाही. त्याला शक्य नव्हतं का? त्यानं देखील तिच्याबरोबरीनंच वनवास केला, फक्त तो महालात राहून! आधी सीता रावणाच्या ताब्यात राहिली आणि महत्प्रयासाने तिला सोडवल्यावरही तिला त्यागणं रामाच्या नशीबी आलं. त्याच्या मनाला झालेले क्लेष कुणाला दिसले नाहीत. तो सामान्य माणूस असता, तर त्याचा निर्णय कदाचित वेगळा असता, पण तो राजा होता. हा फरक कुणी लक्षात घेत नाही. एक त्याच्या राजा असण्याने त्याच्यातल्या माणसाची, संवेदनशील पुरुषाची झालेली कुचंबणा कुणाला दिसत नाही. त्यानं महालातल्या एकांतात घालवलेले अश्रू कुणाला दिसत नाहीत. तो 'मर्यादा पुरूषोत्तम' होता. परिपूर्ण, अचूक नव्हता!

असो. मी कुठून कुठे भरकटत आलो. पण विचार आले की लिहून टाकावेत आणि लिहून झालं, की उगाच चेक न करता पोस्टून टाकावं!

45 comments:

  1. काही होत नाही रडण्याने वा न रडण्याने. प्रत्येकाची प्रवृत्ती निराळी. व्यक्त झालेलं मत मीडियाचं असतं, त्या माणसाचं नाही.

    ReplyDelete
  2. लेख आवडला, विद्याधर. नदालप्रेमी मित्रांशी यावर मागे साधारण ह्याच धर्तीवर वादही झाला होता. तेव्हा त्याच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये व्हर्डास्कोविरूद्ध पाच सेट्सचा अटीतटीचा सामना खेळताना, आपल्या सर्व्हच्यावेळी नदाललाही भर कोर्टवर आपले अश्रू आवरता आले नव्हते; हे उदाहरण दिलं आणि वाद थांबवला :). अर्थात तुझा युक्तिवाद अधिक सयुक्तिक आहे. (इथे कपिल देवची ’डेव्हिल्स ऍडव्होकेट’ मधली मुलाखत आठवली)

    हेच उदाहरण पुढे वाढवून हिलरी क्लिंटन वि. ओबामा यांच्यातल्या लढतीबद्दल म्हणता येईल. खंबीरपणा दाखवला तर यंत्रवत/रुथलेस असल्याचा आरोप आणि त्याउलट वागलं तर स्त्रीत्वाचं भांडवल केल्याचा/अध्यक्ष होण्यास अपात्र असल्याचा आळ अशा द्विधा अवस्थेत कॅम्पेन सापडलं होतं, अशी कबुली अलीकडेच तिच्या चमूतील एकाने दिली त्याची आठवण झाली.

    ReplyDelete
  3. कड्डक बसलाय पोस्ट... कोणी कसं वागावं ह्याच्या चर्चा रंगवणं सोपं असतं पण स्वतःला त्याजागी उभं करुन एवढा सारासार विचार करणं महाकठिण. खुप कौतुकास्पद लेख आहे हा... खुप आवडला... :)

    ReplyDelete
  4. लेख आवडला. वाटलं ती मॅच संपल्यावर एक चर्चा रंग घेतेय. सगळे मुद्दे पटले.... आता दिवस जसा चढत जाईल तशी ही चर्चा रंगत जाईल.... :)

    ReplyDelete
  5. पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही मनावरून पूर्णपणे गेला नसल्याने पुरूषाने रडणं, हे कमजोरपणाचं लक्षण मानलं जातं. उदा. बायकांसारखा काय रडतोस, हाता बांगड्या भरल्यात का इ. वाक्य. असो. सांगायचा मुद्दा हा की पुरूषालाही भाव भावना असतात पण त्याने त्या चार चौघांसमोर व्यक्त करताना मात्र त्याच्यावर बंधन येतात, ते असू नये असं मलाही वाटतं. मेहनत वाया गेल्यामुळे उद्वेगाने रडणं अत्यंत साहजिक आहे. टेनिस मी पहात नाही, जास्त कळत नाही म्हणून त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण तू क्लासिक केस म्हणून रामाचं उदाहरण दिलंस ते काही पटत नाही.

    प्रतिक्रिया लांबतेय पण मला स्पष्टीकरण दिल्याशिवाय रहावत नाही. ज्या सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवल्यानंतर तिच्या पावित्र-अपवित्रतेची परिक्षा पहाण्यासाठी रामाने ताबडतोब अग्निपरिक्षा द्यायला लावली, त्याच सितेला तो अयोध्येत घेऊन गेल्यावर त्यागतो? तेही एका धोब्याच्या आपल्या बायकोसोबत केलेल्या वर्तनाचा दाखला घेऊन? धोब्यात शिक्षणात आणि रामाच्या शिक्षणात काही फरक होता की नाही? धोब्याप्रमाणेच सीता सुद्धा रामाच्या प्रजाजनांपैकी एक होती. ती त्याची पत्नी असली तरिही!... आणि समजा, रावणाने सीतेला भ्रष्ट केलेलं जरी असतं, तरी तो सितेचा गुन्हा होता? मग तिने उगाच रामाने रावणाशी युद्ध करण्याची वाट पाहिली! रामाने सीतेला त्यागल्यावर जर अनेक विनंत्या धुडकावल्या असतील, तर त्याने सीतेला वनात धाडल्यावर तिचं काय झालं हे पहाण्याचेसुद्धा कष्ट घेतले असतील. तो संवेदनशील होता तर आपल्या गरोदर बायकोला आपला भाऊ कुठे सोडून आला, तिथे जाऊन निदान अलपून छपून तरी आपल्या बायकोचा हालहवाल घेत रहावा असं वाटलं असावं. पण तसं काही झालं नसावं म्हणूनच त्याला लव-कुश आपलीच मुलं आहेत हे उशीरा लक्षात आलं. लव-कुशांना भेटल्यानंतर रामाने पुन्हा त्यागलेल्या सीतेला अयोध्येला नेण्याची तयारी दाखवली.. का? त्याने तिला त्यागलं होतं ना! जर धोब्याच्या बोलण्यावरून त्यागायचं होतं तर इतक्या वर्षांनी परत कशाला न्यायचं? परत नेतानाही अग्निपरिक्षेची अट होतीच.... तीच अग्निपरिक्षा सितेने लंकेतून बाहेर पडल्या पडल्या दिली होती...मग धोब्याच्या सांगण्यावरून तिला त्यागलं का? शेवटी सीतेने पुन्हा अग्निपरिक्षेची अट ऐकून वैतागून जीव दिला. राम राजा म्हणून चांगला असावा, तो संवेदनशीलही असावा पण वैयक्तिक आयुष्यात तो निर्णय क्षमता शून्य होता, असंच मला वाटतं.

    तू सीता सिंग्ज द ब्लूज हा चित्रपट पाहिला आहेस का? काही आक्षेपार्ह (हिंदू संस्कृतीत न पटणार्‍या दृश्यांमुळे - प्रत्यक्षात चित्रपटात ती प्रतिकात्मक म्हणून वापरली आहेत) वादग्रस्त आहे. मिळाला तर पहा.

    ReplyDelete
  6. आवडला लेख. पूर्णतः सहमत.. पण शेवटचा परिच्छेद संपूर्ण अमान्य... कारणं कांचनने दिली आहेत तीच सगळी. जशीच्या तशी.. !!

    ReplyDelete
  7. बाबा पोस्ट उत्तम.... पहिले दोन पॅरा पुर्णत: मान्य.... बाकि कांचनशी सहमत.... रामाबाबत म्हणशील तर मला कांचनची मतं पटतात!!!

    ReplyDelete
  8. खरे तर पुरूषांनी रडणं ’अनैसर्गिक’ असतं तर त्यांना अश्रुग्रंथी कशाला असत्या? - जसे त्यांना गर्भाशय नाही तसेच अश्रुग्रंथीही नको होत्या मग! असो. आपण strong आहोत असा पुरूषांचा समज ’घडवला’ जातो म्हणून रडणं दुबळेपणाच वाटायला लागतं उठसूट रडण मात्र वाईटच - मग ती बाई असो की पुरूष!

    रामाबाबत कांचनच्या मताशी पूर्ण सहमत. आता या blog वरील चर्चेवरून काही पेटू नये अशी अपेक्षा! सध्या तसेही अयोध्या निकालाच्या प्रतीक्षेत येथे वातावरण जाणीवपूर्वक तापवले जात आहेच, त्यात आणखी काही भर नको!

    ReplyDelete
  9. एक सामान्य माणूस आणि एक राजा ह्यांना निर्णय घेताना नेहेमीच वेगवेगळी मापे लावावी लागतात. रामाच्या दुर्दैवाने तो राजा होता. ही लढाई हृदय आणि बुद्धी ह्यातील कदाचित असावी. आणि आपण नेहेमीच हृदयाचा निर्णय मानत असतो. राजा म्हणून जेंव्हा मी निर्णय घ्यावयास बसतो, त्यावेळी मला त्या निर्णयाचे दूरगामी परिणाम विचारात घ्यावे लागतात. मी स्त्री आहे. सीतेचे दुखः माझे हृदय जड करून जाते. परंतु आपल्याप्रिय गरोदर पत्नीला वनात सोडण्याची आज्ञा, भावाला देताना रामाची अवस्था काय झाली असेल... हे मला ह्या कथेची दुसरी बाजू म्हणून दिसते. म्हणजे घटना एकच...फक्त रंगमंच फिरवला आणि रामाच्या खुर्चीत जाऊन बसल्यासारखे...

    ReplyDelete
  10. कांचनच्या मताशी सहमत... बाकी फेडररबद्दल लिहिलेलं योग्य आहे.

    ReplyDelete
  11. ओंकार,
    धन्यवाद भाई!
    >>व्यक्त झालेलं मत मीडियाचं असतं, त्या माणसाचं नाही.

    ReplyDelete
  12. नंदन,
    नदालचे अश्रू मला आठवत नाहीयेत..पण खरंच माणसाला माणूस म्हणून एव्हॅल्युएट केलं जात नाही ह्याचं दुःख होतं!

    ReplyDelete
  13. सौरभ,
    अरे आपण नेहमीच चहाच्या टेबलावर चर्चा करतो...कधीतरी स्वतःवर येतं.. मग जाणवतं!

    ReplyDelete
  14. अनघा,
    चर्चा रंगणार ह्याची कल्पना मला लिहितानाच आली होती. पण बरेच दिवसांपासून जे मनात खदखदत होतं, ते लिहिण्यावाचून गत्यंतर नव्हतं!

    ReplyDelete
  15. कांचनताई,
    राम चुकला होता किंवा राम बरोबर होता, हे विधान मी कधीच करणार नाही. कारण, इसवीसनाच्याही कित्येक वर्षं पूर्वी घडलेले किंवा कल्पिलेले निर्णय आजच्या सामाजिक स्थितीवरून पारखणं मला मान्य नाही हे एक आणि दुसरं, रामाच्या मनात काय घालमेल चालली होती हे मी काय कुणीच समजू शकणार नाही हे दुसरं!
    आता रामानं सीतेला अग्निपरीक्षेनंतरही का त्यागलं, तिची खबरबात का घेतली नाही? हे प्रश्न मी उत्तरणं हा आगाऊपणा होईल, पण कदाचित जो मनुष्य आपल्या वडलांच्या वचनासाठी चौदा वर्षं वनवासात गेला असावा, तो घेतलेल्या निर्णयाला अपार नाईलाजानं का होईना चिकटून राहिला असावा.
    मला मान्य आहे, की वैयक्तिक पातळीवर त्याचा निर्णय चुकीचा वाटत असेल आणि पुन्हा त्याच्या निर्णयानं कुणाचंही भलं झालं असावं हीदेखील शक्यता नाही, पण त्याला काय विवंचना होत्या, हे आपण ठरवू शकतो का?
    तो वैयक्तिक आयुष्यात निर्णयक्षमता शून्य होता हे विधान मला खटकतं. कारण त्याला वैयक्तिक आयुष्यच नव्हतं. त्यानं आपलं आयुष्य सीतेशी लग्न होण्यापूर्वीच सामाजिक करून टाकलं होतं. आणि ह्या गोष्टीची सीतेलाही कल्पना होती.
    सीतेवर अन्याय झाला हे शंभर टक्के सत्य जरी असलं, तरी तो अन्याय तितकाच रामावरही झाला होता.
    पुन्हा सांगतो, माझं म्हणणं, 'सीतेवर अन्याय झाला नाही' हे नाहीये, माझं म्हणणं आहे, रामाचा विचार कुणीच केला नाही हे आहे! सीतेची बाजू मांडायला सगळेच आहेत आणि प्रजाजनांची बाजू मांडायलाही, पण रामाची बाजू कुणीच समजून घेतली नाही. बाकी, रामाची बाजू मला समजली असं मी म्हणत नाही. रामाला पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर म्हणणं हे योग्य नाही, असंच माझं मत आहे! रामाला देव म्हणून नव्हे, तर एक राजा असलेला माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे.
    एकच चष्मा लावून बघणं, हा त्याच्यावर अन्यायच ठरतो आणि नेमकं तेच मला खटकतं!
    मला अजून किती काय लिहावं हे कळत नाहीये...पण रामावर अन्याय झालाय. केवळ तो पुरूष होता म्हणूनच तो झाला असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यावर परिस्थितीकडून, नातेवाईकांकडून, प्रजाजनांकडून अन्यायच झाला. त्याला समजून घेण्याचा, त्याचीही एक बाजू होती हे जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. आणि त्यानंतरही कळत नकळत सगळ्यांकडून तेच घडलं...हे मला कायमच वाटत राहिल.
    बाकी, प्रत्येकाच्या मतांचा आदर मला आहेच!
    जुन्या लोकप्रवाहामध्ये एक वाक्य आहे, "कह गये भैया लोग सयाने, राम की बातें राम ही जाने!"

    ReplyDelete
  16. वरची प्रतिक्रिया आवरा लांब झाली.. :D
    दुसरी ब्लॉगपोस्टच लिहायला हवी होती... :P
    अनघा,
    तुमची दुसरी प्रतिक्रिया नंतर दिसली, त्यामुळे वेगळं उत्तर देतो :)
    >>परंतु आपल्याप्रिय गरोदर पत्नीला वनात सोडण्याची आज्ञा, भावाला देताना रामाची अवस्था काय झाली असेल... हे मला ह्या कथेची दुसरी बाजू म्हणून दिसते.
    बस हेच आणि एव्हढंच मला सांगायचं होतं...
    आणि मी फुका वरती एव्हढं उत्तर लिहिलंय :)
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  17. सागर,
    आय स्मेल ब्लड इन युअर स्मायली! ;)

    ReplyDelete
  18. हेरंबा, तन्वीताई आणि आनंदा,
    कांचनताईला उत्तर लिहून बोटं दुखायला लागलीत! :)
    तेच गोड मानून घ्या!

    ReplyDelete
  19. सविताताई,
    चर्चा पेटणार नाही... कारण चर्चा 'पेटते' तेव्हा, जेव्हा वादातली कोणतीही एक बाजू पूर्ण चुकीची असते किंवा असमंजस असते. इथे तशी केस नाही!(स्वस्तुती वाईट, तरीही ;) )
    बाकी, माझं उत्तर लिहायचा प्रयत्न केलाय मी... मला पूर्ण विश्वास आहे, ते कुणालाही पटणार नाही! :D

    ReplyDelete
  20. सुरेख लेख, आवडला. जाता जाता मिळालेले वळणही सुखावून गेले.
    थोडेसे रामायणाबद्दल....
    खरेतर मुळात रामायण खरोखर झाले का> हा प्रश्न आहे. झाले असेलच तर रामायणाबद्दल अनेक दंतकथा आहेत कुठली खरी मानायची हाही एक प्रश्न आहे.
    कुठल्यातरी एका रामायणात अशीही दंतकथा आहे की सीतेचे अपहरण होणार ही गोष्ट तिला आणि रामालाही ठाऊक होते. (जर राम खरेच देव / अवतार असेल तर त्याला माहीत असायलाच हवे) तर या सगळ्याला सामोरे जाण्यासाठी म्हणुन रामाने आधीच एक उपाय करुन ठेवलेला होता. सुवर्णमृगाच्या मागे जाण्यापूर्वीही सीतेने एकदा अग्नीप्रवेष केला होता. त्यावेळी अग्नीदेवतेने सीता आपल्याजवळ ठेवून घेतली, रावणाने अपहत केली ती केवळ सीतेची प्रतीमा होती. रावणवधानंतर रामाने अग्नीप्रवेशाच्या माध्यमातुन सीता परत मागुन घेतली. अर्थात ही एक दंतकथाच आहे. जर रामायण खरे असेल तर हेही खरे असु शकते.

    ReplyDelete
  21. Anonymous1:47 AM

    Wow विशाल,

    रामाची Idea मला आवडली, पण जर तसे असेल तर रामाने सीतेचा त्याग करणे चुकीचे ठरायला हवे.

    बाकी ही दंतकथा आहे समजून रामाबद्द्ल अनघाने म्हटलेले बरोबर वाटतयं स्वतःच्या गरोदर पत्नीला स्वतःपासून दूर करणे दुखःप्रद नक्कीच आहे.

    आणि नदालची पंखा (Fan) असूनही फेडररच्या रडण्यावर काहीही आक्षेप नाही.

    -प्रिया

    ReplyDelete
  22. Anonymous4:24 AM

    कांचन शी पूर्णतः सहमत. लेख छान लिहिला आहे.

    ReplyDelete
  23. विशालदादा,
    खरोखर. रामायण झाले की नाही, इथपासूनच सुरूवात आहे. पण म्हणूनच, घेतलेले किंवा कल्पिलेले निर्णय असंच मी नेहमी म्हणतो...
    आपल्याकडच्या अपरिमित दंतकथांमुळे कुठलं व्हर्जन ओरिजिनल असाच प्रश्न पडतो.
    दंतकथा भारीच आहे! :)

    ReplyDelete
  24. प्रिया,
    ब्लॉगवर स्वागत!
    >>रामाबद्द्ल अनघाने म्हटलेले बरोबर वाटतयं स्वतःच्या गरोदर पत्नीला स्वतःपासून दूर करणे दुखःप्रद नक्कीच आहे.
    >>आणि नदालची पंखा (Fan) असूनही फेडररच्या रडण्यावर काहीही आक्षेप नाही.

    वाचून मला बरं वाटलं! :)
    प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
    अशाच भेट देत राहा!

    ReplyDelete
  25. अनुजाताई,
    खूप धन्यवाद गं!

    ReplyDelete
  26. रामभाऊ यांना मध्ये ण घेता मी एवढच म्हणेन आपण रडाव पण एकट्यात ..फार फार तर जिवलग मित्र /मित्रीनिसमोर ...
    कारण शेवटी बॉईज डोंट क्राय...
    अन जर ते पब्लिकली क्राय तर मग गर्ल व बॉय मध्ये फरकच काय?

    ReplyDelete
  27. <>


    साबा अरे गर्ल व बॊय मध्ये इतर बरेच फरक असतात. सगळे इथे समजावून सांगणे शक्य नाही. एकतर कीचकट जीवशास्त्रीय भाषा वापरावी लागेल शिवाय ते ’सेन्सॊर्ड’ होऊ शकतात..

    ReplyDelete
  28. इमोशनल होणा पुरुषाला शोभत नाही असाच नियम आहे असा म्हणतात...पण मुळात इमोशन एक्सप्रेस करण्याला कारण, वेळ, परिस्थिती आणि ज्याच्यासमोर आपण ते एक्सप्रेस करतोय त्याला मी महत्त्व देतो. नादालने जे केला ते एक वे ऑफ एक्सप्रेशन होत आणि त्यात काही चुक नाही. काही क्षणिक गोष्टींमुळे जर आपल स्वप्न दुभंगल असेल तर अश्रू आले तर काय बिघडला?
    ज्यांना ते बालिश वाटला त्यांना इमोशन्सची कदर नाही असा माझा मत आहे...रामाच्या बद्दल जे लिहल आहेस काही प्रमाणात सहमत, पूर्ण नाही :)
    मस्त झालीय पोस्ट नेहमीप्रमाणे

    ReplyDelete
  29. साबा,
    बॉईज डू क्राय!!
    आणि ते कमजोरपणाचं किंवा बायकीपणाचं लक्षण बिलकुल नाहीये!
    तेव्हा... निर्धास्त रडत जा! ;)

    ReplyDelete
  30. चेतन,
    आवरा!!! :D

    ReplyDelete
  31. सुहास,
    तू थोडाफार का होईना सहमत आहेस..बरं वाटलं..
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  32. फेडरर बद्दल च्या विधानावर पूर्णपणे सहमत...:)

    दुसरा वाद "कोंबडी आधी की अंडी" यासारखाच आहे, म्हणून त्यापासून अलिप्त ...:P

    ReplyDelete
  33. मी हया दोघांचाही पंखा...फ़ेडररच्या रडण्यात मलाही काही गैर वाटत नाही...बाकी रामाचा निर्णयाबद्दल तर इथे खुप चर्चा झालीये पण खरच हा निर्णय घेताना त्याच्याही जीवावर आलच असेल अस वाटते...

    ReplyDelete
  34. The Prophet, आजच्या चर्चेचा विषय दिला नाहीस तू अजून? :)

    ReplyDelete
  35. विभि...पोस्ट फ़क्कड झाली आहे...आभाळ दाटुन येत ...जोराच्या सरी बरसतात..त्यानंतर काळ्या ढगांच मळभ दुर होत...मग मिळत अगदी निरभ्र आकाश...तसच काही वेळा मनातील भावनांचे ढग अश्रुं द्वारा बरसल्याशिवाय मन शांत होत नाही...पुरुष असो किंवा स्त्री भावनिक दृष्ट्या दोघेपण सारखेच आहेत अस मला वाटत.

    अन राम अन सीता म्हणशील तर काही मत तुझी पटतात तर काही कांचन ताईची.....त्या दोघांच्या मनापेक्षा त्यांच्यासमोर उभी राहिलेली परिस्थिती त्यांच्या निर्णयाला जास्त कारणीभुत आहे....राम अस वागला कारण त्याने परिस्थितीनुरुप निर्णय घेतला...प्रत्येक वेगळी निरनिराळे प्रसंग उभे राहिले अन त्यातुन तो वागत गेला...त्याला त्याच्या आजुबाजुला घडलेल्या परिस्थितीनेच जास्त घडवल अस मी म्हणेन....बाकी राम जाने.. :) :)

    ReplyDelete
  36. manmauji barobar sahamat !!!

    ReplyDelete
  37. संगमनाथ,
    ब्लॉगवर स्वागत!
    कोंबडी आधी की अंडं :)
    प्रतिक्रियेबद्दल खूप आभार!
    असाच लोभ असू द्या!

    ReplyDelete
  38. देवेन,
    बस..त्याच्या जीवावर आलंच असेल...एव्हढं तरी तुला पटलं..आनंद वाटला...
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  39. अनघा,
    आजचा चर्चेचा विषय... :))
    अजून कालचीच उतरायचीय...चर्चा!!! ;)
    दोनेक दिवसांत काढू नवा विषय! :D

    ReplyDelete
  40. योगेश,
    >>पुरुष असो किंवा स्त्री भावनिक दृष्ट्या दोघेपण सारखेच आहेत अस मला वाटत.

    >>त्या दोघांच्या मनापेक्षा त्यांच्यासमोर उभी राहिलेली परिस्थिती त्यांच्या निर्णयाला जास्त कारणीभुत आहे....

    बस...हेच बेसिक..
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  41. माऊताई,
    :)

    ReplyDelete
  42. Anonymous6:54 AM

    Raam barobar hota ki chuk, yaa var yethe jya jya hindunni post takala ahe, tyatil Aka tari hinduu ne Raamayan vachale ahe ka ? he jar musalaan ani catholic yaana tyanchya dharma vishaE vicharal, tar te swadharmache sandharm positivly sangatil, tehi joraat. Raamchya sarkha 1 tari baan marun dakhava. nastya uthatev karu naka, jyaana raam chukicha vatato tyaani khushaal babarachya maandivar jaaun basave..ani suntha karun ghyavi...Vidhyadhar maza post ajibaat delet karu nakos...vachude nishkriy, janm hindu na..

    ReplyDelete
  43. विद्याधर, तुझे हे पोस्ट खरंच खरंच छान आहे. मांडलेले मुद्दे खरंच विचार करायला लावणारे आहेत.

    या पोस्टने मी खूपच इम्प्रेस झालेलो पण बाबाचं रहस्य वाचून तुझ्याबद्दल मला इतका आदर वाटू लागलाय. आजपासून मी तुझा फॅन झालोय!!!

    @ अनघा, तुझे आभार! (मला या ब्लॉगचा पत्ता दिल्याबद्दल)

    ReplyDelete
  44. Anonymous,
    अरे इथे राम मंदिराचा मुद्द उगाच आणला आहेस तू. तो स्वतंत्र मुद्दा आहे!
    बाकी धर्माविषयी बोलण्याबाबत.. तर ते आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, की आपण देवांबद्दलही खुलेपणाने वाट्टेल ते बोलू शकतो..हे चांगलं की वाईट ते बघणार्‍यावर आहे!

    ReplyDelete
  45. श्रीराज,
    ब्लॉगवर स्वागत!
    तुम्हाला ब्लॉग आवडला हे वाचून बरं वाटलं!
    तुमचे खूप खूप आभार!
    आणि अनघा तुमचे देखील! :)

    ReplyDelete