9/05/2010

सकाळ

कधी कधी लिहायला बसलं, की एकदम रिकामं वाटतं. जी शून्य वैचारिक अवस्था गाठण्यासाठी लोक तप करतात, ती कधी कधी लेखक बनू इच्छिणार्‍या लोकांना आपोआप मिळते, पण फक्त लिहायला बसल्यावर. म्हणजे बघा, जेव्हा झोप येत नसते, तेव्हा जर अभ्यासाचं किंवा कुठलंही जड पुस्तक हातात घेतलं, की कशी मस्त झोप डोळ्यांवर झुलायला लागते, तद्वतच!

आत्ताही अशीच शून्य वैचारिक अवस्था लाभलीय. लिहायला बसलोय आणि काही सुचतच नाहीये. पण लिहायचा सोस भारी. त्यामुळे जबरदस्तीनं विचार करायला लागलो. आणि एकदम एक चमकदार (!) कल्पना सुचली. आपण शाळेत कसे निबंध लिहितो, एक काहीतरी विषय दिला की आपण आपल्या कल्पनेचं वारू मोकाट सोडून देतो. आता ब्लॉगमध्येही दुसरं काही आपण करत नाही, फक्त विषय निवडायचं काम आपण करतो आणि ते रोजच्या जीवनातले असतात. मग आत्ता मी एकदम ठरवलं, की आपण जो शब्द पहिला डोक्यात येईल त्याच्यावर निबंध सॉरी ब्लॉग लिहायचा. हे म्हणजे लोककथांमध्ये असतं ना, 'जो वेशीतून पहिला माणूस येईल त्याला राजा बनवायचं.' तसलाच प्रकार. मग आधी मी स्वतःलाच विरोध केला. पण आत्ता 'झी टीव्ही'वर 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' हा कार्यक्रम चालू आहे. त्यात सलमान खान पाहुणा म्हणून आलाय. त्याला बघून, त्याच्या 'वॉन्टेड' सिनेमातला माझा फेव्हरेट डायलॉग मला आठवला, 'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता'. आधी मी स्वतःलाच 'आवरा' म्हटलं आणि मग मी स्वतःचं न ऐकता पहिला शब्द शोधायला लागलो. आणि पहिलाच शब्द डोळ्यासमोर आला तो 'सकाळ'.

आता 'सकाळ' हा शब्द का डोक्यात यावा हा प्रश्न मला सर्वांत आधी पडला. काहीही लॉजिक नाही. उगाच. अक्षरशः रॅन्डम. आधी मी बरीच डोकेफोड केली, की हा शब्द आला कुठून आणि मग ह्यावर डोकेफोड केली, की लिहायचं काय? मग अचानक जाणवलं, की ह्या शब्दाला अनेक फाटे फुटतात. (फाटा म्हटलं, की आधी मला शीळफाटा आठवतो. आणि त्यानंतर राजू परूळेकर. असो.) खूप कंगोरे असलेली विचारचक्र सुरू होतात. मग म्हटलं, क्रमवार एकेक करून लिहू.

१. सकाळ म्हटल्या म्हटल्या पहिल्यांदा माझ्या डोक्यात, 'सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरूसी वंदावे, जीवेभावे।' हा श्लोक आला. कुठल्यातरी एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये संचालक म्हणाले होते, 'आपण स्वतःलाच वारंवार चकित करत असतो'. ह्याचा प्रत्यय मला वारंवार येतो, पण ते सहसा नकारात्मक चकित असतं, आज मी चक्क सकारात्मक चकित झालो. मला असलं चांगलं, साजूक आणि सोज्वळ आठवावं, हे माझं मलाच आधी पटलं नाही. मला भरून यायला सुरूवात झाली होती, पण तेव्हढ्यात ह्याचंच ऐकलेलं एक बाळबोध शाळकरी विडंबन आठवलं आणि माझा आश्चर्याचा भर लगेच ओसरला. 'सकाळी उठोनि देवासी भाजावे, गुरूसी वधावे, जीवेभावे।' अत्यंत ऍमॅच्युअर विडंबन आहे, शुद्ध मराठीत हौशी विडंबन म्हटलं तर तेसुद्धा एक विडंबनच होईल. असो पाचकळपणा पुरे. पण खरंच हे जे विडंबन आहे ते सुचल्यामुळे एक गोष्ट झाली, मी अजून नॉर्मल आहे आणि एकटेपणाचा माझ्यावर अजून काहीही परिणाम झालेला नाही हे कन्फर्म झालं.

जाता जाता - 'गुरूसी वधावे' नंतर 'जीवेभावे' येतं ना राव, तो किलर टच आहे विडंबनातला, शब्दशः सुद्धा!

२. दुसरा वैचारिक फाटा फुटला तो म्हणजे आजची सकाळ. आज सकाळी मी काय केलं. ७.३० ला जागा झालो. ८ वाजेपर्यंत गादीतून आळसावत बाहेर आलो. ८.३० च्या आसपास चहा वगैरे उरकून घरी मिस्ड कॉल दिला, आणि स्काईप चालू करून आईची वाट बघत बसलो. जाऊ द्या. हे सगळं लिहून काय होणार आहे. 'जाऊ द्या' च्या आधीची तीन वाक्य इग्नोअर करा, दुर्लक्षित करा, मला बॅकस्पेस मारायचा कंटाळा आलाय. तर मी सकाळी काहीतरी टाईमपास करत असताना ऑर्कुटवर काहीतरी कीडे करत होतो. जेव्हा मी ऑर्कुट नवं जॉईन केलं होतं, तेव्हा जोशात येऊन वाट्टेल तेव्हढ्या कम्युनिटीज जॉईन केल्या होत्या. माझ्या जवळपास ९९ कम्युनिटीज आहेत आणि मी एकावरही काहीही करत नाही. रोज उजवीकडच्या विंडोत ९-१० ऍक्टीव्ह कम्युनिटीज दिसतात. सहसा मी बघतही नाही(कबुली - समीरा मखमलबाफ ची कम्युनिटी असली की तिकडे सहसा लक्ष जातं). पण आज चक्क तिची कम्युनिटी दिसत नसतानाही लक्ष गेलं. 'ओल्डबॉय' ची कम्युनिटी दिसली आणि डोक्यात हजारो घंटा वाजायला लागल्या. जवळपास ५ वर्षांपूर्वी पाहिलेला सिनेमा. आजही त्याच्या फ्रेम्स डोक्यात घर करून आहेत. ती क्लॉ हॅमर, ते पिंजारलेले केस आणि तो शेवटून दुसरा लिफ्टमधला सीन. त्यानंतर मी आवरलं, म्हणजे आंघोळ वगैरे हो. आजची सकाळ संपली.

३. अजून एक वैचारिक फाटा. रोजची सकाळ. रोज सकाळी मी काय करतो. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत मी सकाळी उठोनी, चालायला जायचो. १५ मिनिटं ते अर्धा तास मधलं जे काही उठण्याच्या वेळेला सूट करेल. पण हल्ली जाम थंडी पडायला लागलीय सकाळी, त्यामुळे बंद केलंय. आता संध्याकाळी जातो. पण संध्याकाळ हा आजचा विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी. तर चालून आल्यावर मी चहा बनवतो. हल्ली उठल्या उठल्या चहा बनवतो, कारण चालण्याची वेळ झोपेच्या वेळेला अधिकारिकरित्या जोडण्यात आलेली आहे. चहा झाला की आन्हिकं उरकून बस पकडायला नेमाने(नेमाडे नव्हे. ओके ओढून ताणून केलेला विनोद होता. सॉरी.) धावतो. मग बस, मग मेट्रो आणि मग चालतो. थोडक्यात वाहतुकीचे सगळे प्रकार होतात. मग गुगल सुरू होतं आणि माझी रोजची सकाळ संपते.

४. हा मात्र खराखुरा वैचारिक फाटा बरं का. सकाळ वृत्तपत्र. सकाळ म्हटलं की मला सर्वप्रथम त्यांचं ओळखचिन्ह डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदाच बघणार्‍यांना ते 'सुकाळ' असंही वाटू शकतं (हे मला एकदा बाबांनी दाखवलं होतं). मग 'सुकाळ' म्हटलं की मला 'गाढवाचा गोंधळ अन लाथांचा सुकाळ' ही म्हण आठवते. आणि 'गाढव' म्हटलं की मला बाबांनीच केव्हातरी सांगितलेला एक 'मुद्राराक्षसाचा विनोद' अर्थात प्रिंटींग जोक आठवतो.

"एकदा एक पत्रकार एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी मुलाखतीसाठी जातो. तेव्हा नेता झोपलेला असतो. तर तो पत्रकार परत येऊन बातमी तयार करतो. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढ व शांत झोपलेले होते.'

पेपरात दुसर्‍या दिवशी छापून येतं. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढव शांत झोपलेले होते.' "

मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले) आणि शरद पवार आठवल्यावर त्यांचा पेपर 'सकाळ' आठवला. थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झालं.

५. किती विचित्र. मला सकाळवरून मुक्तपीठ आठवायला इतका वेळ लागला. ५व्या क्रमांकावर चक्क! तिथल्या प्रतिक्रिया हल्ली कमी झाल्यात हे एक कारण असेल किंवा एकंदरच तिथे हल्ली मजा येत नाही हे दुसरं. किंवा एकंदरच आपण आपल्या माणसांना गृहित धरतो म्हणून असेल. पण मुक्तपीठ आठवलं हे महत्वाचं! मागच्या वाक्यात मी 'आठवले' असं लिहिणार होतो. पण मग म्हटलं, नपुंसकलिंगी आहे त्यामुळे 'आठवलं' ऍप्रॉप्रियेट आहे आणि पुन्हा 'आठवले' लिहिलं की श्लेष होतो आणि मला पाचकळ राजकीय विनोद करावेसे वाटतात. पण मग ह्या नपुंसकलिंगावरून मला एक झकास शाळकरी विनोद आठवला.

एकदा एक मुलगा रडत रडत घरी येतो. बाबा विचारतात काय झालं. मुलगा म्हणतो, 'बाबा, मास्तरांनी मारलं.' बाबा विचारतात 'काय केलंस?' तो म्हणतो मास्तरांनी विचारलं, "मराठी भाषेत लिंग किती आणि कुठली?" मी सांगितलं, "तीन. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग." बाबा म्हणतात, "मग? बरोबर तर उत्तर दिलंस. मग मारलं का मास्तरांनी?" त्यांनी पुढे विचारलं, "उदाहरणं दे!" मी दिली, "तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर!"

तर 'सकाळ' ह्या शब्दावरून आत्तापर्यंतच मला एव्हढं काय काय सुचलं आणि आधी एक ओळ तरी खरडता येईल का ह्या काळजीत होतो मी. मेंदूच्या खोलीत अडकलेल्या विचारांना मुक्त करायची ही शाब्दिक चावी बरी वाटली. "रूठी हुई प्रतिभा(टॅलेंट ह्या अर्थी) को मनाने का अच्छा आयडिया है।" "व्हाट एन आयडिया सरजी।"

44 comments:

  1. मस्त टीपी. बर्याच दिवसांनी थोडंसं हलकंफुलकं (किंवा पाचकळ) लिहिलंस.
    "शुद्ध मराठीत हौशी विडंबन म्हटलं तर तेसुद्धा एक विडंबनच होईल." - मेटा-विडंबन ! लोळ !

    अरे आणि तुझ्या ब्लॉगवर आता लायसन्स टाक रे. (लहानपणी तो शब्द लायसन होता.) टाळाटाळ नको.

    ReplyDelete
  2. जर लायसन नाही टाकलंस तर निदान अलताईसारखा डिटेक्टिव्ह तरी हो. म्हणजे काही दिवसांनी अजून एक पर्दाफाशचा झकास पोस्ट येईल.

    ReplyDelete
  3. बाबा महाराज की जय!!

    ReplyDelete
  4. हा हा हा विभी, कमाल आहे तुझी. कुठल्याही (आणि नसलेल्या) विषयावर लिहु शकतोस तु. सही टि.पी.

    ReplyDelete
  5. विभी, आजची तुझी हलकीफुलकी सकाळ माझी रात्र छान घालवेल. :) सहीच रे! प्रिटींग जोक मस्तच. बाकी सगळे वैचारिक मुद्दे/फाटे पुन्हा विचारास चालना देणारे. :D

    ReplyDelete
  6. बाबा रे (म्हणजे तू ’बाबा’ किवा जनरल बाबा रे या अर्थाने... कसंही घे तुझ्या सोयीने) तू ’सकाळ’ नावाने पोस्ट टाकली आणि लागले माझे विचार मुक्त धावायला... पण हुश्श रे बाबा (वरचा कंस आठव आणि आपली सोय बघ पुन्हा)..

    मस्तच झालीये रे पोस्ट... शब्दछल तुझा हुकुमी एक्का :).. मजा आली वाचताना...

    >>> 'सकाळी उठोनि देवासी भाजावे, गुरूसी वधावे, जीवेभावे।' वरून कालच गौराबाईने म्हटलेले शुभंकरोती आठवले...

    तीने म्हटले होती , "घरातली ईडापीडा बाहेर जावी बाहेरची ’ईडापीडा’ घरात यावी "... मी मनात मोरयाला म्हटलं ह्या तान्हा बाळाची विनंती नको रे बाबा (कंस आठवू नकोस ;) )मनावर घेऊन...

    थोडक्यात काय यथा मामा तथा भाचे ;)

    ReplyDelete
  7. Anonymous12:19 AM

    बाबा,हल्काफ़ुल्का मस्त लेख...तुझी विचारशॄखंला भारीच....

    ReplyDelete
  8. सकाळ वाचून त्याशी यमक जुळणारा कपाळ शब्द मला आठवला. कपाळावर आठ्यांचे तरंग उठतात. त्याला राग येणे म्हणतात. तेव्हा माणुस गरम होतो. मग त्याला ताप येणे म्हणतात. कपाळाला हात लावून ताप आलाय की नाही हे तपासलं जातं. हा ताप कपाळात जास्तवेळ राहिला तर माणुस ढगात जातो. ह्याला कपाळमोक्ष म्हणतात का??? डोकं दुखायला लागल्यावर कपालभारती करावी, नाहितर कपाळावर बाम लावावा. बाम वरुन झंडु बाम आठवला. सद्ध्या मुन्नी झंडुबाम हुई डार्लिंग तेरेलिए हे गाणं बरच गाजतय. बाप मी काय कपाळकरंटा आहे. काहिही प्रतिक्रिया देतोय... :-S

    ReplyDelete
  9. बाबा...मस्त टीपी आहे...


    ॒ सौरभ..लय भारी रे.

    ReplyDelete
  10. :) :)
    :) :) :) :)
    :) :) :) :) :) :)
    :) :) :) :) :) :) :) :)
    :) :) :) :) :) :)
    :) :) :) :)
    :) :)

    सुसकाळ ,शुभसकाळ ,सुप्रभात.

    ReplyDelete
  11. अल्टी! मुक्तपीठ शेवटी आठवल्याबद्दल निषेध!!!

    पण हे ही खरं असावं "किंवा एकंदरच आपण आपल्या माणसांना गृहित धरतो म्हणून असेल."

    खुप आवडली पोस्ट!

    ReplyDelete
  12. रच्याक, म्हणजे असं बघ, जर हा लेख मी लिहिला असता तर सकाळ म्हंटल्यावर मला समोरचा वॉशर मधून पाणी गळणारा नळ आठवलं असतं. नंतर मग बायकोचा चिडका चेहेरा, ’कधिची सांगितलंय पण तुम्ही काही प्लंबरला बोलवत नाही’ नंतर मग समोरच्या घरातला तो सुकट बोंबील आणि त्याची किंग फिश सारखी बायको...
    जाउ दे, कैच्याकै होतंय.

    ReplyDelete
  13. बाबा
    मस्तच सकाळ :)

    @सौरभ

    जबरदस्त कपाळ :P

    ReplyDelete
  14. ahsya kahi weglya idea mala pan de...blog war kahi tari khardayala hoil ka asa wichar karte...
    pan tujhi matra ultimate jhali aahe post....chya mari dharun fatkyaak............

    ReplyDelete
  15. :) असं आपण केलं तर?? असा कोणी एखाद्याने एक शब्द सोडावा... आणि मग प्रत्येकाने त्या शब्दावर लिखाण कारावं? बरी आहे का आयडेची कल्पना??
    आणि सौरभ, कपाळ मस्त!
    :D

    ReplyDelete
  16. ओंकार, धन्यवाद रे भाऊ!
    अरे फार जड जड लिहिलं की एकदम रितेपण येतं...मग हलकंफुलकंच लिहावं लागतं ;)
    अरे लायसन म्हणजे तू कॉपीराईटसाठीच म्हणतोयस ना...ती माझ्या साईटवर, जिथे आधी पब्लिश होतं, तिथे आहे ऑलरेडी..पण इथे पण एक टाकायचा विचार आहे! :)

    ReplyDelete
  17. यशवंत,
    बर्‍याच दिवसांनी आलास भाऊ! बरं वाटलं!
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  18. अभिलाष,
    अरे...खरंच एकदम म्हणजे एकदम ब्लँक झालो होतो. आणि एकदम अचानकच 'सकाळ' झाली! ;)
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  19. श्रीताई,
    अगं असंच कैच्याकै सुचत गेलं! :)
    वैचारिक फाटे उगाच फार त्रास देतात गं! :P
    खूप आभार!

    ReplyDelete
  20. तन्वीताई,
    गौराबाई ही अशीच का.. छान छान... मेजॉरिटी आहे आमची! :)
    आय ऍम शुअर ती मोठी झाल्यावर माझ्याबरोबर मुक्तपीठ मुक्तपीठ खेळेल!
    आणि मी गौरासारखाच तुला कित्ती घाबरतो माहितीय ना :P
    कदाचित म्हणूनच मुक्तपीठ एकदम शेवटी आठवलं! ;)

    ReplyDelete
  21. देवेन,
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  22. सौरभ,
    प्रचंड भारी!
    मला कपाळवरून कुठल्यातरी न्यूज चॅनेलवर लागणारी 'काल-कपाल-महाकाल' ही सिरीज आठवली! :P
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  23. योगेश,
    मंडळ लय भारी आपलं आभारी आहे! ;)

    ReplyDelete
  24. सचिन,
    सत्कारणी लागलेली सकाळ! :P
    लय आभारी आहे!

    ReplyDelete
  25. आनंदा,
    खरंच ते 'आपलं माणूस' हेच कारण असण्याची दाट शक्यता आहे! ;)

    ReplyDelete
  26. महेंद्रकाका,
    >>सुकट बोंबिल आणि किंग फिश सारखी बायको
    ह्या प्रचंड भारी उपमा आहेत! :D
    धन्यवाद काका!

    ReplyDelete
  27. विक्रम,
    :D:D:D

    ReplyDelete
  28. अपर्णा,
    रिकाम्या डोक्यात असल्या कल्पना येतात. तू पण प्रयत्न करून बघ कधी... डोक्यावर नको तितका जोर द्यायचा..डोकं काहीतरी मार्ग काढतंच ;)
    किंवा मग असाच एखादा सुचेल तो शब्द घेऊन खरड! :D
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  29. अनघा,
    मस्तच आहे कल्पना! शाब्दिक खो-खो किंवा अंताक्षरी!!
    पण सुरूवात कोण करणार?
    मी हे लिहित असताना ऑलरेडी श्रीताईचे आणि मीनलचे डोळे वटारलेले असतील! :P
    'कुर्बानी देगा कौन?' ;)

    ReplyDelete
  30. मस्त मस्त मस्त

    सुवासिनींनी विमानतळावर मंत्री महोदयांना आवळले.

    Oops

    सुवासिनींनी विमानतळावर मंत्री महोदयांना ओवाळले.

    मुद्राराक्षसाचा विनोद

    ReplyDelete
  31. >>मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले) आणि शरद पवार आठवल्यावर त्यांचा पेपर 'सकाळ' आठवला. थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झालं.

    मस्तच !!! :-D :-D

    ReplyDelete
  32. बाबा, भन्नाट.. पवार साहेबांची आणि आठवले साहेबांची मस्त तासली आहेस...

    रच्याक, मीही आता साहेब हा शब्द घेऊन लिहू का? ;)

    ReplyDelete
  33. सागरा,
    लय भारी रे! :D

    ReplyDelete
  34. क्षितिज,
    ब्लॉगवर स्वागत!
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद!
    असाच भेट देत राहा! :)

    ReplyDelete
  35. हेरंबा,
    नेकी और पूछ पूछ?
    लिहून टाक! :)

    ReplyDelete
  36. बाबा,
    खर तर सकाळीच "सकाळ" वाचायचं होत पण वाचू वाचू म्हणता म्हणता रात्र झाली पण रात्रीची सकाळ करून "सकाळ"वाचून काढलं.बाळबोधपणे "गाढव"आवडलं म्हणण्यात मुळात गाढवपणा नाहीच्चे.
    ता.क.
    तुझ्या सकाळ मुळे तुला पवारांची आठवण झाली नि मला परुळेकरांची नि जोगांची.कै.एड्व्होकेट प्र.बा.जोग(म्हणजे पुण्यातील जोग क्लासेस वाल्या सरांचे वडील नि आत्ताच्या मराठीतील तरुण दमाचा नायक पुष्कर जोगचे आजोबा)हे पुण्यातील विलक्षण हुशार पण अति फटकळ व्यक्तिमत्व होते.ते पुणे कोर्पोरेशनच्या बऱ्याच निवडणुकात नगरसेवक पदा साठी अपक्ष म्हणून उभे राहायचे नि पडायचे.त्यांचे डिपोझीट हि बऱ्याच वेळा जप्त व्हायचे.त्या वेळी "सकाळ" चे संस्थापक नि संपादक कै.ना.भि.परुळेकर ह्यांचा नागरी संघटना हा पक्ष होता.बऱ्याचदा त्यांच्या उमेदवारा कडून ह्यांचा पराभव व्हायचा त्या मुळे जोगांचा "सकाळ"नि परुळेकरांवर पुढील निवडणुकीत रोष असायचा नि ते भर सभेत त्यांना चिडून प्रत्येक वेळी "नाभिक"परुळेकर म्हणूनच संबोधायचे.परुळेकर हि ते खिलाडू वृत्तीने घ्याचे.खरे तर हि व्यक्तिमत्वे इतकी मोठी होती तरी अब्रू नुकसानी वगैरे भानगडी त्या वेळी नव्हत्या.नाही तर आत्ता.सालं, ज्यांना अब्रू हा शब्द सुद्धा लिहिता येत नाही ते दावे ठोकायची भाषा करतात.असो.लिहिता लिहिता सकाळ उजाडायची.

    ReplyDelete
  37. क्या भन्नाट लिवा है रे तूने. आडस...

    ReplyDelete
  38. mynac दादा,
    होय ना! खिलाडूवृत्ती सरली... आता बडेजावाचे दिवस आले!
    अत्र्यांचे अग्रलेख, बाळासाहेबांचा कुंचला...सगळं फक्त वाचण्याजोगं राहिलं!

    ReplyDelete
  39. सिद्धार्थ,
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  40. संकेत आपटे12:12 PM

    मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले).... हाहाहा.. लई भारी!!

    मला सकाळ म्हटल्यावर वृत्तपत्रं आठवतात. त्यावरून मला महाराष्ट्र आणि पर्यायाने माझं घर आठवतं. त्यानंतर मला माझा जॉब आठवतो. आणि हे सगळं आठवल्यावर अचानक मला ’आज आपण उशीरा उठलेलो आहोत आणि त्यामुळे ऑफिसला जायला उशीर होणार आहे’ ही गोष्ट आठवते... आणि मग पुढच्या सगळ्याच आठवणी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागतात...

    ReplyDelete
  41. संकेत,
    >>आणि हे सगळं आठवल्यावर अचानक मला ’आज आपण उशीरा उठलेलो आहोत आणि त्यामुळे ऑफिसला जायला उशीर होणार आहे’ ही गोष्ट आठवते
    पेटंट! ;)

    ReplyDelete
  42. मला आपल्या लेखावरून शन्नांनी लिहिलेले वाक्य आठवले .. सकाळ ही शहाणी असते आणि रात्र ही असयमी आणि वेडी असते
    आवडले .

    ReplyDelete
  43. जेडी,
    ब्लॉगवर स्वागत!
    शंनांचं लेखन मस्त असतं..
    प्रतिक्रियेबद्दल खूप आभार!
    असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  44. This comment has been removed by the author.

    ReplyDelete