2/01/2010

झेंडा

ही नोंद झेंडा चित्रपटामुळेच लिहित आहे मी, पण ही फक्त झेंडाबद्दलच नाही.  कालच मी झेंडा सिनेमा पाहिला. पाहिल्यावर मनात संमिश्र भावना होत्या. मराठी मनाची चलबिचल टिपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, असं झेंडाचं साधारण वर्णन होऊ शकतं. झेंडा काही मोठे आणि कळीचे प्रश्न उभे करतो. पण त्या प्रश्नांची जी उत्तरं तो देतो, ती सगळ्यांनाच पटतील असं नाही. झेंडा कमालीचा अस्वस्थ आणि त्याहूनही जास्त निराशावादाकडे झुकणारा सिनेमा आहे. अर्थात कुठल्याही सिनेमाचे असतात तसे झेंडाचेसुद्धा स्वतःचे असे क्षण आहेत. आणि ते अतिशय छान जमलेत ते कलाकारांच्या तितक्याच सरस अभिनयामुळे. "विठ्ठला" हे गाणं अप्रतिमच. राजेश सरपोतदारचं पात्र निभावणारा राजेश शृंगारपुरे आणि संतोष जुवेकर हे माझ्या मते अप्रतिम आणि सिनेमातले काही चांगले हलके-फुलके प्रसंग चिन्मय मांडलेकरला मिळाले आहेत आणि तो त्यांच सोनं करतो. बाकी, सिनेमाचा शेवट मला तितकासा पटला नाही, पण प्रत्येकाची आपली मतं असतात.

मी झेंडा पहायला आणि शिवसेना-रा.स्व.संघ वाद पेटायला एकच गाठ पडली. आमचं अख्खं घर संघवाल्यांचं आहे. माझेही सुरूवातीचे संस्कार संघाचे आहेत. पण मी वेगळ्याच विचारांचा आहे ह्याचा प्रत्यय मला वेळोवेळी येत राहातो. तसंच, यावेळीही. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे संघाने यात पडायलाच नको होतं. संघाचे काय विचार आहेत, हे विचारलंय का कोणी? उगाच हात दाखवून अवलक्षण. करूनच्या करून कॉन्ग्रेस नामानिराळी राहिली आणि हे भांडतायत आपापसांत. महाराष्ट्राची इमेज खराब होतेय म्हणून आपले मुद्दे न मांडणे म्हणजे पळ्पुटेपणा आहे. त्या येड्डियुराप्पांना असते का कर्नाटकाची इमेज खराब व्हायची काळजी? करुणानिधिला वाटते का देशभराच्या प्रसारमाध्यमांना तामिळमध्ये मुलाखत देताना लाज? मग आमचे गडकरी कशाला लगेच भाजप प्रांतवादी नाही म्हणून सफाया देत फिरतायत? कोणी विचारलंय का तुम्हाला? आणि असाल तुम्ही प्रांतवादी तर त्याने कुणाला काय फरक पडतोय? त्या आत्महत्या करणा-या शेतक-यांनाही फरक पडत नाही आणि स्फोटांमध्ये मरणा-या सामान्य माणसालाही फरक पडत नाही. तुमचा खेळ होतोय श्रेयासाठी, पण अब्रू मराठी माणसांची जातेय.

आज गेली पन्नास वर्षं "जय हिंद! जय महाराष्ट्र!" म्हणूनही मराठी माणसांना धमक्या दिल्या जात आहेत. आणि मराठी माणसांना एकराष्ट्रीयत्वाचा शहाणपणा कोण शिकवतंय, तर आपले लुंगिशिवाय इतर कोणत्याही पेहरावात न दिसणारे माननीय गृहमंत्री चिदंबरम. आता त्यांना विचारावंसं वाटतं, की तुम्हाला जसा तुमच्या तामिळचा अभिमान आहे, तसा आम्हाला आमच्या मराठीचा आहे, मग तो आम्ही आमच्या राजधानीत दाखवला तर चुकलं कुठं? तुमच्या चेन्नई (सॉरी, आपली नाही का?) पेक्षा तरी आम्ही निश्चितच सहिष्णु आहोत. किमान हिंदीत बोलल्यावर अपमान तरी नाही करत आम्ही!  आणि पुन्हा, आम्ही आज जे थोडे काही जागे झालो आहोत, ते पन्नास वर्षे परप्रांतियांकडून संपूर्ण विकास करून घेतल्यावर (लालू-नितीश असंच कायसंसं म्हणतात). ते ही केव्हा, जेव्हा इकडे मराठी गाणी एफ.एम. वर लावण डाउनमार्केट म्ह्टलं जाउ लागलं. जेव्हा मुंबईतल्या शाळेमध्ये मराठी शिकवण्याच्या सक्तिविरूद्ध कोर्टकेस झाली. जेव्हा दुकानांची बोर्डं मराठीत लावली तर धंद्यावर परिणाम होतो असं म्हणणारे लोक उघड माध्यमांमध्ये स्टार बनवले जाउ लागले. जेव्हा बेरोजगार मराठी पोरांच्या घरी येणा-या पेपरांमध्ये महाराष्ट्रातल्याच भरतीच्या जाहिराती गेली कित्येक वर्षे येत नाहीत, हे तेव्हढीच वर्षे बिहारचे रेल्वे मंत्री झाल्यावर लक्षात आलं. जेव्हा महाराष्ट्रात चाळिस वर्षे राहून, भरभरून पैसे कमावून पुन्हा "हम यूपी वाले हैं, हिंदी में ही बोलेंगे, महाराष्ट्रवाले हमें माफ करें!" असं प्रसारमाध्यमांसमोर आढ्यतेने आणि चेह-यावर छद्मी हसू आणून म्हणण्याची काही अतिशहाण्यांची हिम्मत व्हायला लागली. जेव्हा महाराष्ट्रातून, दोन जागी विधानसभेवर निवडून जाणारा आमदार, जो फक्त प्रक्षोभक भाषणे द्यायचा तो फक्त लोकांना डिवचण्यासाठी हिंदीत शपथ घेण्याची स्टंटबाजी करू धजावला आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये हीरो ठरवला गेला. जेव्हा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी परवाना मिळवतानाही मराठीची सक्ति नको हे सांगयला बिहारचा मुख्यमंत्री उठला आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री (जे स्वतः आणि त्यांचे पूर्वसुरी गेली कित्येक वर्षं दिल्लीत बायकांच्या साड्यांना इस्त्र्या करत आलेत.(अगदी झेंडात म्हटलंय तसं) )सरकारच्या गेले कित्येक वर्ष अस्तित्वात असलेल्या कायद्यावरून मागे फिरले. आणि जेव्हा स्वतः कुठेही कुठल्याही माणसांमध्ये एकमेकांशी अगदी ठासून गुजराती बोलणारे गुजराती आम्हाला आमच्याच राज्यात चारचौघांमध्ये हिंदीत बोलण्याचे धडे द्यायला लागले.

तसं बघायला गेलं तर उशीरच झाला म्हणायचा. आधीच जर हिंदी बोलणा-यांचा अपमान केला असता, तर कमीतकमी दुस-यांकडून प्रगती करून घेतल्याचं पातक तरी लागलं नसतं. बॉम्बेचं मुंबई केल्यावर आपली खिल्ली आवर्जून चेन्नई म्हणणा-या चिदंबरम साहेबांनी तरी कमीत कमी उडवली नसती. अरे हो पण तेव्हा कदाचित चिदंबरम साहेबांना हिंदी आलं असतं.

ता.क. - आता राहुलजी गांधींच्या मते, बिहारी आणि यू.पी. च्या कमांडोनी मुंबईला दहशतवादी हल्ल्यातून वाचवलं. आपण वेडेच की, करकरे, साळसकर आणि कामटे मुंबईला वाचवायला गेलेच नव्हते. तुकाराम ओंबाळे मूळचे बिहारी आहेत. आणि, मेजर उन्नीकृष्णनसुद्धा यू.पी.बिहारचेच. जाउ दे, आपण असल्या मूर्ख आणि अक्कलशून्य वक्तव्यांना कशाला भाव द्यायचा म्हणताय? खरं आहे हो, पण ह्याच गृहस्थांच्या वक्तव्यांना आजच्या तरुणाई्चं प्रतिबिंब मानतात हो.

1 comment: